IPL 2025 What Happens if The RCB vs KKR Clash gets Washed Off Due to Rain: आयपीएल २०२५ ला एका आठवड्याच्या स्थगितीनंतर आज म्हणजेच १७ मे पासून सुरूवात होत आहे. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता स्पर्धेला पुन्हा सुरूवात आहे. स्थगितीनंतरचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर काय होईल, जाणून घेऊया.
आयपीएल २०२५ च्या ५८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे सामना रद्दही होऊ शकतो. जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना रद्द झाला तर त्याचे दोन्ही संघांवर मोठे परिणाम होतील. केकेआर अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडेल. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके), सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) आधीच स्पर्धेबाहेर झाले आहेत.
केकेआर सध्या ११ गुणांसह आणि +०.१९३ च्या नेट रन रेटसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, त्यांनी आतापर्यंत १२ पैकी पाच सामने जिंकले आहेत. सामना रद्द झाल्यास आरसीबीला एक गुण मिळेल आणि ते पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचतील. पण पहिल्या स्थानी गेल्यानंतरही त्यांचं प्लेऑफचं तिकिट पक्कं होणार नाही. आरसीबीला अधिकृतपणे टॉप-४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी अजूनही एका विजयाची आवश्यकता असणार आहे.
आरसीबी सध्या १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि ११ सामन्यांपैकी आठ विजयांसह त्यांचा नेट रन रेट +०.४८२ आहे. या हंगामात आरसीबीने इतर संघांच्या घरच्या मैदानावरचे सामने जिंकले असले तरी, घरच्या मैदानावर त्यांना तीन सामन्यांपैकी फक्त एकच विजय मिळवता आला आहे. ईडन गार्डन्सवर झालेल्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने केकेआरचा सात विकेट्सने पराभव केला होता.
RCB vs KKR: बंगळुरूमधील हवामानाचा अंदाज
१७ मे रोजी हवामानाच्या अंदाजाबद्दल बोलायचं तर, संपूर्ण सामन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. रात्री ८ आणि ९ च्या सुमारास पाऊस पडण्याची आणि वादळ येण्याची शक्यता ६०-७५ टक्के आहे. सात संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत असल्याने, लीगचा शेवटचा टप्पा जवळ येत असताना स्पर्धा अधिकच चुरशीची होणार आहे.