लीड्स : प्रदीर्घ इंग्लंड दौऱ्याच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेट संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भक्कम स्थितीत असूनही अखेरीस हेडिंग्ली कसोटी गमाविणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराविना खेळावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत फलंदाजांना अडचणीत टाकण्यात अपयशी ठरलेल्या भारताला आता २० बळी मिळविण्यासाठी पर्याय शोधावे लागणार आहे.
बुमरा या मालिकेतील पाचपैकी केवळ तीन कसोटीत खेळणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. मात्र, हे सामने कोणते ते स्पष्ट करण्यात आले नव्हते. हेडिंग्ली कसोटीत बुमराने ४४ षटके टाकली. दुसऱ्या डावात तो काही काळ मैदानाबाहेरही बसला. आता तो २ जूलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीला मुकणे अपेक्षित आहे. क्रिकेटची पंढरी अशी ख्याती असलेल्या लॉर्डसवर १० जुलैपासून तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी बुमरा भारतीय संघात पुनरागमन करेल.
बर्मिंगहॅम येथील कसोटी आठवडाभराने सुरू होणार असली, तरी बुमरासाठी इतकी विश्रांती पुरेशी नसल्याचे मानले जात आहे. आता त्याच्या अनुपस्थितीत कामगिरी उंचावण्याची अन्य गोलंदाजांवर जबाबदारी असणार आहे. विशेषत: मोहम्मद सिराजवर अतिरिक्त दडपण असेल. स्वत: सर्वोत्तम कामगिरी करण्यासह त्याला अन्य गोलंदाजांना मार्गदर्शन करावे लागेल. हेडिंग्ली कसोटीनंतर भारतीय संघाने दोन दिवस पूर्ण विश्रांती घेतली. आता सरावाला पुन्हा सुरुवात करताना भारतीय संघाला पहिल्या कसोटीतील पराभव विसरून पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे.
भारताला मालिकेत पुनरागमन करायचे झाल्यास शिस्तबद्ध आणि अचूक योजनेसह गोलंदाजी आवश्यक आहे. पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी बेन डकेट आणि झॅक क्रॉली या इंग्लिश सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही. मात्र, भारतीय गोलंदाज टिच्चून मारा करण्यातही कमी पडले. डकेट आणि क्रॉली आक्रमकतेसाठी ओळखले जातात. परंतु चौथ्या डावात या दोघांनी योजनाबद्ध आणि संयम राखून खेळ केला. त्यांना अडचणीत टाकण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि डावपेच भारतीय गोलंदाजांकडे नव्हते. परिणामी इंग्लंडला ३७१ धावांचे आव्हान यशस्वी पार करताना पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवता आली.
योजनेत बदल गरजेचा
● पहिल्या कसोटीनंतर प्रसिध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांवर सर्वाधिक टीका झाली. हे दोघे अचूक टप्पा राखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनी योजनेत बदल करणे गरजेचे आहे.
● पहिल्या कसोटीत ज्या गोलंदाजांनी चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या जवळ (फूलर लेंथ) ठेवला, त्यांना अधिक यश मिळाले. सचिन तेंडुलकरनेही बुमराने यष्टींना लक्ष्य करण्याचा सल्ला दिला होता.
● टप्पा पुढे असल्यास अशा प्रकारचा चेंडू फलंदाजाला खेळावाच लागतो. यामुळे त्रिफळाचित, यष्टिचित आणि बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाकडे जाणे असे विविध पर्याय खुले होतात.
● पहिल्या कसोटीत बेन डकेट, झॅक क्रॉली, जो रूट, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर आणि शुभमन गिल आदी फलंदाज पुढील चेंडूवरच बाद झाले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत बुमराविना खेळताना भारतीय गोलंदाजांना अचूक योजनेसह मारा करावा लागेल.
कुलदीपला संधी? नवी दिल्ली : बुमराच्या जागी वेगवान गोलंदाजच खेळविण्याचा निर्णय झाल्यास अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल. हर्षित राणाही पहिल्या कसोटीसाठी चमूचा भाग होता. मात्र, आता त्याला मायदेशी पाठविण्यात आले आहे. एजबॅस्टनची खेळपट्टी फिरकीला साहाय्य करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटू खेळविण्याबाबत विचार करू शकेल. भारताकडे कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा पर्याय उपलब्ध आहे. सुनील गावस्कर, संजय मांजरेकर आणि मॉन्टी पानेसर आदी माजी क्रिकेटपटूंनी कुलदीपला संधी देण्याची भारतीय संघाला सूचना केली आहे. त्यामुळे भारतीय संघ काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.