भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी त्यांच्या आयुष्यात शिकलेल्या पहिल्या मराठी वाक्याची गोष्ट सांगितली आहे. तसेच आपल्या संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंबद्दलचेही किस्से सांगितले आहेत. ते १९८३ च्या विश्वचषक विजयावरील हिंदी चित्रपट ‘१९८३’ सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

कपिल देव यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच ‘मला मराठी येत नाही’ या मराठी वाक्यापासून केली. ते म्हणाले, “मराठीचं पहिलं वाक्य मी कॅम्पमधील आमच्या पुण्याच्या मित्राकडून शिकलो. मला खाण्याची फार आवड होती. मी त्याला विचारलं, की तु तुझ्या आईला जेवण दे कसं विचारतो. तो म्हणाला, ‘आई मला चपाती दे’. मी विचारलं तू एवढंच म्हणतो का तर तो म्हणाला हो. मी ते पहिलं मराठी वाक्य शिकलो.”

“महाराष्ट्रीय उत्तर भारतात येतात तेव्हा सर्वात आधी शिव्या शिकतात”

“मी अनेक वर्षे मराठी खेळाडूंसोबत खेळलो आहे. त्यामुळे मराठी समजतं. सर्वात आधी आपण भाषेतील शिव्या शिकतो. महाराष्ट्रीय पंजाब किंवा उत्तर भारतात येतात तेव्हा ते सर्वात आधी उत्तर भारतातील शिव्या शिकतात. मराठी ऐकलं की काय बोलत आहेत, कशावर बोलतात याचा बराच अंदाज येतो. तुम्ही शब्दाशब्दाचा अर्थ विचाराल तर त्याचं तेवढं ज्ञान नाही,” असं कपिल देव यांनी सांगितलं.

“३ मराठी लोक आहेत तर ते हिंदीत बोलणार नाही”

“सर्वांची विचार करण्याची पद्धत एकच असते. ३ मराठी लोक आहेत तर ते हिंदीत बोलणार नाही. दिलीप वेंसारकर, संदीप पाटील, सुनिल गावसकर हे एकत्र आले की नैसर्गिकपणे मराठी बोलायचे. मीही मदन किंवा मोहिंदर अमरनाथ, यशपाल हे लोक आले की नकळतपणे पंजाबी बोलायला लागायचो,” असंही कपिल देव यांनी नमूद केलं.

हेही वाचा : १९८३ च्या विश्वचषक विजयात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता होता? कपिल देव म्हणाले, “जेव्हा भारतीय संघात…”

या मुलाखतीच्या वेळी निवेदकांनी कपिल देव यांच्यासोबत गप्पा मारू असं सांगितलं. यावर मुलाखतकारांनी सुरुवातीचं मराठीचं निवेदन समजलं का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना कपिल देव हसत-हसत म्हणाले, ‘हो, मला मराठी निवेदन समजलं. मी गप्पा मारायला आलो नाही, तर गोष्ट सांगायला आलो आहे'”. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला.

१९८३ च्या विश्वचषक विजयात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता होता?

कपिल देव म्हणाले, “विश्वचषक जिंकताना केवळ एकच टर्निंग पॉईंट नव्हता. पहिल्या सामन्यापासूनच टर्निंग पॉईंट सुरू झाले. वेस्ट इंडिजचा संघ त्याआधी कुणाकडूनही पराभूत झाला नव्हता. तेव्हा भारताचा संघ अगदी छोटा होता. वेस्ट इंडिज भारताकडून पराभूत झाला आणि त्यानंतर प्रत्येक सामन्यात काहीतरी घडत होतं. १९८३ चा विश्वचषक जिंकण्यातील भारतीय संघासाठी सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ आत्मविश्वास आला तो होता.”

“त्या दिवशी संपूर्ण खेळ बदलला, नंतर मी कर्णधार नव्हतो”

“अनेकदा आपल्याला आपल्या क्षमतेचा अंदाज नसतो. कुणी चांगला गाऊ शकतो, कुणी चांगला लिहू शकतो तसंच भारतीय संघाला आपल्या संघात दम आहे हे विश्वास आला. त्या दिवशी संपूर्ण खेळ बदलला. त्याआधी मी कर्णधार होतो यात संशय नाही, पण त्या टर्निंग पॉईंटनंतर मी कर्णधार नव्हतो. त्यानंतर संपूर्ण संघच कर्णधार होता. जेव्हा संघ काहीतरी मिळवायचं आहे हे ठरवतो तेव्हा कुणीच थांबवू शकत नाही,” असं कपिल देव यांनी सांगितलं.

“मला ‘या’ दोनच गोष्टींचं दुःख वाटतं”

कपिल देव म्हणाले, “मला दोनच गोष्टींचं दुःख वाटतं. एक सुनिल वॉल्सन खेळू शकला नाही. इतक्या वर्षांनी मी त्याकडे पाहतो तर असं वाटतं की त्याला खेळवलं असतं तर तोही खेळू शकला असता. दुसरं दुःख होतं सुनिल गावसकर त्यावेळी ५० धावा करु शकला असते तर तेही चांगलं झालं असतं. या दोन गोष्टींमुळे फार दुःख झालं.”

हेही वाचा : सचिनचे विक्रम इतक्या लवकर कोणी मोडेल असं वाटलं नव्हतं, कपिल देवकडून विराटचं कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुनिल गावसकरसारखा एवढा मोठा खेळाडू त्याची कामगिरी इतकी कमी कशी असू शकते असं वाटलं. ४० वर्षांनी असं वाटतं की सुनिल वॉल्सनही खेळला असता तर चांगलं झालं असतं,” असंही कपिल देव यांनी नमूद केलं.