सोमवारी दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. सोमवारच्या या सामन्यामधील दोन्ही संघ आधीच बाद फेरीत म्हणजेच प्लेऑफमध्ये पोहचले असल्याने या सामन्यातील विजय हा गुणतालिकेमध्ये अव्वल ठरणारा संघ निश्चित करण्यासाठी होता. मात्र आज आयपीएलमध्ये होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो पद्धतीचा सामना असणार आहे. दोन्ही संघांना स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं अनिवार्य असल्याने या सामना नॉक आऊट पद्धतीचा ठरणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचा हा १३ वा सामना असणार आहे. सध्या मुंबईच्या खात्यात पाच विजय आणि सात पराभवंसहीत १२ सामन्यांत १० गुण आहेत. मुंबई सध्या गुणतालिकेमध्ये सातव्या स्थानी आहे. गेल्या लढतीत दिल्लीकडून पराभव पत्करल्यामुळे मुंबईची निव्वळ धावगती अधिक खालावली आहे. सूर्यकुमार यादवला गवसलेला सूर मुंबईच्या दृष्टीने चांगली बाब असली, तरी मधल्या फळीचे अपयश त्यांना सतावत आहे

दुसरीकडे राजस्थानच्या नावावरही मुंबई इतकेच गुण असून यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या मुंबईकर फलंदाजांकडून त्यांना पुन्हा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार संजू सॅमसननेही छाप पाडली आहे. राजस्थान गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानी आहे. आपल्या १२ सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला असून १० गुणांसहीत ते निव्वळ धावगतीच्या जोरावर समान म्हणजेच प्रत्येक १० गुण असूनही मुंबईहून एक स्थान वर आहेत.

मुंबईला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. म्हणजेच आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यास मुंबई १३ सामन्यांमध्ये ६ विजयांसहीत चौथ्या किंवा पाचव्या स्थानी झेप घेऊ शकते. तर राजस्थानबद्दलही असेच चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आजचा सामना अगदीच अटीतटीचा झाला तरी मुंबईला निव्वळ धावसंख्येच्या दृष्टीने तो फायद्याचा ठरणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई इंडियन्सला पात्र ठरण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यावर त्यांच्या प्लेऑफच्या आशा दुसऱ्या संघावर निर्भर राहतील. तांत्रिक दृष्ट्या मुंबईने हा सामना गमावल्यानंतर पंजाब आणि राजस्थानचा त्यांच्या उर्वरित सर्व सामन्यांमध्ये पराभव झाल्यास मुंबईला संधी मिळू शकते. मात्र आजचा सामन्यामध्ये एकच विजेता ठरणार असल्याने मुंबई किंवा राजस्थान हा एकच संघ आजच्या सामन्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहणार आहे.