R Ashwin accused of ball-tampering: सध्या तमिळनाडू प्रीमियर लीगचे सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेतील अनेक विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी अश्विन बाद झाल्यानंतर महिला पंचांवर संतापलेला दिसला होता, ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला होता. यानंतर आता अश्विनवर टीएनपीएलमधील संघाने मोठा आरोप केला आहे.
आर अश्विन आणि त्याचा संघ दिंडीगुल ड्रॅगन्स संघावर मोठा आरोप केला आहे. आर अश्विन हा दिंडीगुल ड्रॅगन्स संघाचा कर्णधार आहे. त्याच्या संघाने बॉल टेम्परिंग केल्याचा धक्कादायक आरोप तमिळनाडू प्रीमियर लीगमधीस मदुराई पँथर्स संघाने केला आहे.
१४ जून रोजी झालेल्या सामन्यात आर. अश्विन आणि त्यांच्या संघ दिंडीगुल ड्रॅगन्सने चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप मदुराई पँथर्स संघाने केला आहे. त्यांनी टीएनपीएलला अधिकृतपणे पत्र लिहिले आहे. यानंतर तमिळनाडू प्रीमियर लीगच्या आयोजकांनी फ्रँचायझीला पुरावे देण्याची मागणी केली आहे. टीएनपीएलला दिलेल्या तक्रारीत, मदुराई फ्रँचायझीने आरोप केला आहे की गतविजेत्यांनी रसायनांनी युक्त टॉवेल वापरले होते ज्यामुळे चेंडू जड झाला आणि बॅटच्या संपर्कात आल्यावर धातूसारखा आवाज निर्माण झाला.
मदुराई पँथर्स संघाने केलेले आरोप गंभीर असल्याने, टीएनपीएलचे सीईओ प्रसन्ना कन्नन यांनी फ्रँचायझीला घटनांचे पुरावे दाखवण्यास सांगितले आहे. प्रसन्न कन्नन यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगतिलं की, “त्यांनी (मदुराई पँथर्स) तक्रार दाखल केली आहे, जी आम्ही मान्य केली. सामना सुरू झाल्यानंतर २४ तासांत ही तक्रार नोंदवावी लागते पण उशिरा तक्रार केल्याने तरीही आम्ही ती स्वीकारली आहे आणि त्यांच्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
जर आम्हाला त्यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळले तर आम्ही एक स्वतंत्र समिती स्थापन करू. पुरेशा पुराव्याशिवाय, एखाद्या खेळाडूवर आणि दुसऱ्या फ्रँचायझीवर असे आरोप करणं चुकीचं आहे. जर त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत, तर मदुराई संघाला योग्य ती शिक्षा भोगावी लागेल,” असे प्रसन्न यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
टीएनपीएलला लिहिलेल्या पत्रात, मदुराई फ्रँचायझीचे सीओओ एस महेश यांनी लिहिले, “डिंडीगुल ड्रॅगन्स विरुद्धच्या आमच्या अलिकडच्या सामन्यात बॉल टॅम्परिंगचा एक गंभीर प्रकार घडला. वारंवार इशारा देऊनही, डिंडीगुल संघाने चेंडूशी उघडपणे छेडछाड केली, संघाने असे टॉवेल वापरले जे रसायनांनी प्रक्रिया केलेले दिसत होते.”
ही स्पर्धा पावसाळ्यात होत असल्याने, सामन्यांमध्ये पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. सालेममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काहीसा विलंब झाल्यानंतर दोन्ही संघांमधील हा सामना सुरू झाला. त्यानंतर मदुराई संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १५० धावा केल्या, ज्या दिंडीगुलने १२.३ षटकांत आणि ९ विकेट्स शिल्लक असताना सहज पूर्ण केल्या. अश्विन या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. पण फलंदाजी करताना सलामीवीर म्हणून ४९ धावा काढल्या.
ओल्या आऊटफिल्डचा विचार करता, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्रत्येक फ्रँचायझींना टॉवेल देते आणि खेळाडूंना फक्त पंचांसमोर चेंडू सुकविण्यासाठी ते वापरण्याची परवानगी आहे. “संघांना फक्त टीएनपीएलने दिलेल्या टॉवेलचा वापर करून चेंडू सुकवावा लागतो आणि जेव्हा जेव्हा चेंडू षटकारासाठी मारला जातो किंवा बाद झाल्यानंतर आणि ओव्हर-ब्रेकनंतर लगेचच, चेंडू नियमितपणे पंच तपासतात आणि त्यांना सामन्यादरम्यान चेंडूमध्ये कोणतीही समस्या आढळली नाही,” असे कन्नन म्हणाले.