India vs Australia 4th Test: भारतीय फिरकीपटू आर अश्विनने अहमदाबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली. त्याने ४७.२ षटकात ९१ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. या ६ विकेट्सच्या मदतीने तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. त्याने माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मोडला.

एवढेच नाही तर भारतीय फिरकीपटू म्हणून तो या ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला आहे. मात्र, या ट्रॉफीमध्ये एकूण सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही अश्विनच्या नावावर आहे.

आर अश्विनने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला –

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आर अश्विन आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने अनिल कुंबळेला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत या ट्रॉफीमध्ये २० सामन्यांत ३८ डावांत एकूण १११ बळी घेतले. या ट्रॉफीमध्ये कुंबळेची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात १४१ धावांत ८ बळी, तर सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १८१ धावांत १३ विकेट्स.

आर अश्विनबद्दल बोलायचे झाले, तर त्याने या ट्रॉफीमध्ये आतापर्यंत २२ सामन्यांच्या ४१ डावात एकूण ११३ विकेट घेतल्या आहेत. तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. जरी नॅथन लायनच्या नावावर ११३ विकेट आहेत, परंतु त्याने २६ सामन्यांच्या ४६ डावांमध्ये हा पराक्रम केला. ज्यामुळे आर अश्विन पहिल्या क्रमांकावर आला आहे.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाचा भारतात मोठा पराक्रम; मोडला दहा वर्षे जुना विक्रम

अश्विनने या ट्रॉफीमध्ये एका डावात १०३ धावांत ७ विकेट घेतल्या आणि ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली, तर १९८ धावांत १२ बळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या ट्रॉफीमध्ये अश्विनने ७ वेळा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच एकदा १० विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप तीन गोलंदाज –

आर अश्विन – २२ सामने – ११३ विकेट्स
नॅथन लायन – २६ सामने – ११३ विकेट्स
अनिल कुंबळे – २० सामने – १११ विकेट्स

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाचा भारतात मोठा पराक्रम; मोडला दहा वर्षे जुना विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाचा डाव ४८० धावांवर संपला –

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव ४८० धावांवर संपला. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सवर २५५ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो १७० चेंडूत ११४ धावा करून बाद झाला. अश्विनने ग्रीनला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. त्याच षटकात अश्विनने अॅलेक्स कॅरीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीला खातेही उघडता आले नाही.