Ravichandran Ashwin reply to Michael Vaughan : भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने मायकेल वॉनच्या टीम इंडियाबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाकडे असलेली संसाधने लक्षात घेता, विशेषत: आयसीसी स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करायला हवी होती, असे वॉनने अलीकडेच म्हटले होते. यावर अश्विन म्हणाला भारतीय संघ समकालीन क्रिकेटमध्ये परदेशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक आहे. त्यामुळे वॉनच्या वक्तव्यावर मला हसू येते.

अश्विनने मायकल वॉनला प्रत्युत्तर दिले –

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विन म्हणाला, “मायकेल वॉनने नुकतेच एक विधान केले होते की भारतीय संघ आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकला नाही. हे खरे आहे की आम्ही काही काळ आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही आणि आम्ही स्वतःला खेळाची महासत्ता समजतो. पण ही नाण्याची एक बाजू आहे.”

टीम इंडिया कसोटीत सर्वोत्तम –

३७ वर्षीय खेळाडूने सांगितले की, भारताने गेल्या काही वर्षांत परदेशात विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तो म्हणाला, “सध्या आमचा संघ विदेशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक आहे. यादरम्यान आम्ही अनेक उत्कृष्ट निकाल दिले आहेत. वॉनच्या टिप्पणीनंतर, आपल्या देशातील अनेक तज्ञांनी भारत हा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणारा संघ आहे की नाही यावर चर्चा सुरू केली. खरे सांगायचे तर, मला यावर हसू आले.”

हेही वाचा – Team India : ‘कर्णधार कोणीही असो, पण…’, टी-२० विश्वचषकात रोहित-विराट खेळण्याबाबत सुनील गावसकरांचे मोठे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिका मालिकेतील उदाहरण दिले –

या संदर्भात अश्विनने दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेचे उदाहरण दिले. ज्यामध्ये भारताने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करण्यात यश मिळवले. तो म्हणाला, “चांगली मानसिक कणखरता आणि मानसिक कौशल्य असलेला क्रिकेट संघ कोणत्याही परिस्थितीत पुनरागमन करु शकतो. या भारतीय संघाने ते वारंवार सिद्ध केले आहे. “होय आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दोन फायनल गमावल्या आहेत. मी ते मनापासून स्वीकारतो पण जोपर्यंत कसोटी मालिकेचा संबंध आहे, तिथे पुनरागमनाची शक्यता नेहमीच असते.”