आयपीएल २०२५ चा विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जेतेपदाचा आनंदाला गालबोट लागलं. आरसीबीने १८ वर्षांनंतर जेतेपद पटकावल्यानंतर संघ विजयाचा आनंद चाहत्यांबरोबर साजरा करण्यासाठी बंगळुरूमध्ये पोहोचला. आरसीबी संघाच्या चाहत्यांनी टीमच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. पण यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. यानंतर आरसीबीच्या संघाच्या मॅनेजमेंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आता कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जचा पराभव करून RCB पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनला. यासह ४ जून रोजी बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान, प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले.

पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी मालक रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेड (आरसीएसएल) विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता. ज्याविरुद्ध आरसीएसएलने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आरसीएसएलचा असा युक्तिवाद आहे की त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने फसववण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्रँचायझीने या कार्यक्रमाबद्दलच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले होते की प्रवेश पास मोफत ठेवण्यात आला होता, पण यासाठी आधी नोंदणी करावी लागेल.

याशिवाय, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) द्वारे आयोजित कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारी कंपनी, DNA एंटरटेनमेंट नेटवर्कने देखील त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पुरेसा पोलिस बंदोबस्त नव्हता, त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. या प्रकरणात, बेंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कचे इव्हेंट मॅनेजर आणि केएससीए व्यवस्थापन आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर, हे प्रकरण सीआयडीकडे पाठवण्यात आले आहे, जे या प्रकरणाची चौकशी करत आहे. याशिवाय, आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसाळे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे, तर उच्च न्यायालयाने सध्या पोलिसांना केएससीए अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे.

या प्रकरणात, बेंगळुरू पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांचे अधिकारी ४ जून रोजी सकाळी ५:३० वाजेपर्यंत स्टेडियमभोवती ड्युटीवर होते. या दरम्यान, कर्नाटक विधानसभेत आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे त्यांनी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली नाही.

पोलिसांच्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की परवानगी नसतानाही, केएससीए, आरसीबी आणि डीएनए यांनी त्याकडे दुर्लक्ष करत कार्यक्रम पुढे नेला. याशिवाय, कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय, ४ जून रोजी, आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया आणि वेबसाइटवर विजयी परेड आणि कार्यक्रमाची घोषणा केली आणि चाहत्यांना त्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर जेव्हा ही बातमी पसरली, तेव्हा आम्ही (पोलिसांनी) आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं आणि त्यांना सुरक्षा आणि आवश्यक व्यवस्था करण्याची विनंती केली. पोलिसांनी असा युक्तिवाद केला की आरसीबीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे परिस्थिती आणखी खराब झाली.