Rohit Sharma Mumbai’s dressing room video viral : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईला पोहोचल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर पोहोचला आहे, जिथे रणजी ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या सामन्यात त्याचा घरचा संघ मुंबई विदर्भाशी भिडत आहे. वानखेडे स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित मुंबईच्या खेळाडूंशी बोलताना दिसला. या सामन्यानंतर निवृत्त होणाऱ्या धवल कुलकर्णीशी तो बराच वेळ गप्पा मारताना दिसला. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय कर्णधाराच्या कृतीने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. रणजी ट्रॉफीदरम्यान आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधाराने ड्रेसिंग रूममध्ये पोहोचून खेळाडूंशी बोलणे ही मोठी गोष्ट असल्याचे चाहत्यांचे मत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरही स्टँडवर बसून सामन्याचा आनंद लुटताना दिसला. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

रोहित मुंबईला सपोर्ट करण्यासाठी सज्ज –

रोहितने नुकतेच देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्व अधोरेखित केले होते. आंतरराष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंना जेव्हा संधी मिळेल तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असे त्याने सांगितले होते. आता मुंबईच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तो स्वतः स्टेडियममध्ये दिसला तेव्हा चाहत्यांना आनंद झाला. धर्मशाला येथे इंग्लंड विरुद्ध भारताच्या पाचव्या कसोटी सामन्यामुळे रोहित स्वतः रणजी ट्रॉफी फायनलसाठी मुंबई संघात सामील होऊ शकला नाही, परंतु तो संघाला सपोर्ट करण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये सामील झाला.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : मुशीर खानचे ३ महिन्यांत चौथे शतक, सचिन तेंडुलकरचा मोडला ‘हा’ खास विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या अंतिम कसोटीपूर्वी रोहितने स्पष्ट केले होते की, देशांतर्गत क्रिकेटचे दडपण काही मोजक्या खेळाडूंवर नाही तर सर्व खेळाडूंना लागू होते. रोहितने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की याविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. जेव्हा खेळाडू उपलब्ध असतील, तेव्हा खेळाडूंनी स्वत:ला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही उपलब्ध आणि फिट असाल तर नक्कीच देशांतर्गत स्पर्धा खेळायला हवे.

दुसरीकडे, बोर्ड आणि व्यवस्थापनाने वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली. त्यांना केंद्रीय करारातून काढून टाकले. मात्र, श्रेयस अय्यरने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी स्वत:ला उपलब्ध करून दिले. संघासाठी दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करताना त्याने ९५ धावांची खेळीही खेळली. एक दिवस आधी महान फलंदाज सुनील गावसकर देखील स्टेडियममध्ये पोहोचले होते.

हेही वाचा – MUM vs VID : रणजी फायनलमध्ये मुंबईने विदर्भाला दिले ५३८ धावांचे लक्ष्य, मुशीर-मुलाणीची शानदार खेळी

विदर्भासमोर ५३८ धावांच लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे तर, मुंबई संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ १०५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात मुंबईने मुशीर खानच्या (१३६) शतकासह अजिंक्य रहाणे (७३), श्रेयस अय्यर (९५) आणि शम्स मुलाणीच्या (५०) अर्धशतकाच्या जोरावर ४१८ धावांचा डोंगर उभारला. त्याचबरोबर पहिल्या डावातील आघाडीसह विदर्भाला ५३८ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात विदर्भाने तिसऱ्या दिवस संपेपर्यंत २ षटकानंतर बिनबाद १० धावा केल्या असून ५२८ धावांची गरज आहे. सध्या अथर्व (३) आणि ध्रुव (७) नाबाद आहेत.