भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादमध्ये खेळल्या जाणार आहे. रविवारी २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होण्याआधी तिकीट वाटपात घोळ झाला अशा बातम्या आल्या होत्या. काही जणांनी तर यात काळाबाजार झाला असा आरोपपण केला. त्यानंतर तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपली बाजू मांडली आहे.
मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपली बाजू मांडताना असे म्हटले आहे की, “सिकंदराबाद येथील जिमखाना मैदानावर तिकीट विक्रीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान अनेक क्रिकेट चाहते जखमी झाले. यात असोसिएशनचा कुठलाही दोष नाही जनताच इतक्या मोठ्या संख्येने आली की परिस्थिती हाताळणे अवघड झाले. या घटनेबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला. राज्य क्रिकेट असोसिएशनही जखमींना मदत करेल.”, असेही पुढे त्याने सांगितले.
हेही वाचा : अजिंक्य रहाणेच्या संघाने रचला इतिहास, १९व्यांदा कोरले दुलीप करंडकावर नाव
तिकीट विक्रीत काळाबाजार यावर बोलताना एचसीएचे अध्यक्ष अझरुद्दीनने सांगितले की, एका कंपनीला या सामन्याची संकेतस्थळावर आणि प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर तिकिटे विकण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तिकीट विक्रीत मध्ये कोणताही काळाबाजार झालेला नाही. जर कोणी केला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू. एखाद्याने संकेतस्थळावरून तिकीट खरेदी करून ते काळाबाजारत विकले असेल तर त्याच्याशी एचसीएचा काहीही संबंध नाही.
गुरुवारची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले अझरुद्दीनने बोलताना सांगितले की, हैदराबादला बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोक सामना स्टेडियममध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एचसीएचे सचिव विजयानंद यांनी सांगितले की, तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या घटनेबाबत युनियनने एक समिती स्थापन केली आहे. जखमींना मदत करेल असे आश्वासन दिले.