क्रिकेटच्या मैदानावर आपण अनेक विचित्र घटना पाहिल्या आहेत. एकापेक्षा एक कमालीची फटकेबाजी, भेदक गोलंदाजी, अफलातून झेल, रनआऊट अन् अनोखे विकेट्स पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ९८ धावांवर खेळणाऱ्या फलंदाजाचं नशीब इतकं बलवत्तर निघालं की स्टम्पवर चेंडू आदळूनही तो क्लीन बोल्ड झाला नाही. हे पाहून सर्वच जण अवाक् झाले.

गुजरातमधील सुरत येथे झालेल्या बिग क्रिकेट लीग (BCL) सामन्यादरम्यान एक अविश्वसनीय घटना घडली. फलंदाज चिराग गांधी फलंदाजी करताना एक दुर्मिळ आणि अनोखा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी १५ डिसेंबरमध्ये यूपी ब्रिज स्टार्स आणि एमपी टायगर्स यांच्यातील सामन्यादरम्यान घडलेली ही घटना आहे. या घटनेने खेळाडू, पंच आणि चाहते चकित झाले आणि पंच तर घडलेला प्रकार पाहून हसू लागले.

९८ धावांवर फलंदाजी करत असलेल्या चिरागला फिरकीपटू पवन नेगीने चेंडू टाकला. नेगीने टाकलेला चेंडू थेट स्टम्पसवर जाऊन आदळला. चेंडू आदळल्यानंतर ऑफ-स्टम्प पूर्णपणे हलला आणि मधल्या स्टम्पकडे झुकला, ज्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने विकेट गेल्याचा आनंद साजरा केला. पण त्यानंतर जे घडले ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणार होतं.

चिरागने मागे वळून पाहिलं आणि पंचांना स्टम्प पाहण्याचा इशारा केला. सर्व जण पाहतात तर काय ऑफ स्टम्प मिडल स्टम्पच्या दिशेने पूर्णपणे झुकला होता, पण स्टम्पवरील बेल्स मात्र खाली पडल्या नव्हत्या. तेव्हा मैदानावरील पंचही हे दृश्य पाहून हसताना दिसले. त्यानंतर या क्षणाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. क्रिकेटमधील नियमानुसार जोपर्यंत स्टम्पसवरील बेल्स मैदानावर पडत नाहीत तोपर्यंत तो फलंदाज बाद असल्याचे घोषित होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नशीबाने साथ दिल्यानंतरही चिरागचा संघ एमपी टायगर्स संघाने दिलेले लक्ष्य गाठू शकला नाही. युपी ब्रिजचा संघ ५ बाद १६८ धावा करू शकला. ज्यामध्ये चिरागने ५८ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली होती. त्याने आर्यन कुमारसह (४२) ११२ धावांची भागीदारी रचली होती. युसूफ पठाणच्या नेतृत्त्वाखालील एमपी टायगर्सने वादळी खेळी केली. संघाकडून साकेत शर्माने २ चेंडूत १०१ धावांची खेळी केली, तर पवन नेगीने नाबाद ८७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.