विराट कोहली मैदानात उतरतो तेव्हा तो काही विक्रम मोडून स्वतःचे नवे विक्रम बनवतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरचा त्याचा हा दबदबा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही पाहायला मिळत आहे. विराटच्या आधी भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक मोठमोठे विक्रम केले होते. विराट हा बऱ्याचदा सचिनचे विक्रम मोडीत काढताना दिसतो. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आज (बुधवार, १५ नोव्हेंबर) उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. विराट कोहलीला या सामन्याद्वारे सचिन तेंडुलकरचे चार विक्रम मोडण्याची संधी आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला सुरुवात झाली असून भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीला उतरलेल्या रोहित शर्माने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. परंतु, रोहित २९ चेंडूत ४७ धावा फटकावून बाद झाला. रोहित बाद होताच विराट कोहली मैदानात उतरला. विराटने मैदानात उतरताच सचिन तेंडुलकरचा खास विक्रम मोडीत काढला आहे.

विराट कोहली हा विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. विराटआधी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक उपांत्य सामने खेळण्याचा (भारतीय खेळाडू) विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकर त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत तीन विश्वचषक स्पर्धांच्या उपांत्य फेरीचे सामने खेळला आहे. तर विराटने सचिनचा हा विक्रम मोडून विश्वचषक स्पर्धेतील चार उपांत्य सामने खेळण्याचा विक्रम रचला आहे.

सचिन तेंडुलकरने १९९६, २००३ आणि २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तर विराट कोहलीने २०११, २०१५, २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आज विराटने या स्पर्धेतील चौथ्या उपांत्य सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिनच्या दोन विक्रमांवर विराटची नजर

यासह सचिन तेंडुलकरचे आणखी दोन विक्रम विराटच्या निशाण्यावर आहे. सचिन तेंडुलकरने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत ६७३ धावा फटकावल्या होत्या. एका स्पर्धेतली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सचिनचा हा विक्रम गेल्या १६ वर्षापासून कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाही. विराटला सचिनचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे. विराटने यंदाच्या स्पर्धेत ९९ च्या सरासरीने ५९४ धावा फटकावल्या आहेत. विराटने आजच्या सामन्यात ८० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी साकारली तर तो सचिनचा ६७३ धावांचा विक्रम मोडू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन आणि विराट या दोघांनी ४९ शतकं झळकावली आहेत. सचिनचा हा विक्रमदेखील विराट आज मोडू शकतो.