कसोटी मालिकेत इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे आधीच भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर रोहित आणि विराट दोघांनी परस्परांना अनफॉलो केले आहे. रोहितने तर विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही अनफॉलो केले आहे.

सोशल मीडियावरील या घडामोडींमुळे टीम इंडियात नेमकं काय सुरु आहे ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे इंस्टाग्राम आणि टि्वटरवर परस्परांना फॉलो करायचे. पण आता दोघांनीही परस्परांना अनफॉलो केले आहे. महत्वाच म्हणजे तिघांपैकी कोणाकडूनही अद्याप याबाबत काहीही खुलासा करण्यात आलेला नाही. वनडे आणि टी-२० संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान देण्यात आलेले नाही.

पहिल्या तीन कसोटीतच नव्हे तर उर्वरित दोन कसोटीसाठी सुद्धा रोहितची संघात निवड करण्यात आलेली नाही. उर्वरित दोन कसोटीसाठी रोहितची संघात निवड होईल अशी अपेक्षा होती. संघ निवडीत कर्णधाराची भूमिका खूप महत्वाची असते. रोहितला संधी न मिळणे हेच दोघांमधल्या नाराजीचे कारण असू शकते अशी चर्चा आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी कर्णधारपदाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या कर्णधार कोहलीला आशिया चषकात विश्रांती देण्यात आली आहे.