Hardik Pandya Injury and Team India: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरला आहे. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) सरावही सुरू केला आहे. याबाबत बीसीसीआय किंवा टीम इंडियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र हार्दिक दुखापतीतून सावरल्याचा इनसाईड स्पोर्ट्सच्या एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. मात्र, तो पूर्ण ताकदीनिशी सराव करत नाही आणि संघ व्यवस्थापनाला त्याच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. संघ व्यवस्थापन त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त ठेवू इच्छित आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळणे कठीण आहे.

भारताने आपले सर्व सामने जिंकले असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त ठेवू इच्छिते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही हार्दिकला कोणतेही योगदान देता आले नाही. केवळ तीन चेंडू टाकल्यानंतर तो जखमी झाला. असे असतानाही भारताला तो सामना जिंकण्यात यश आले. यानंतर टीम इंडियाने हार्दिकशिवाय न्यूझीलंड आणि इंग्लंडलाही हरवले.

हेही वाचा: PCB on Babar Azam: “हे खोटं असून…”, पीसीबीने बाबरच्या लीक व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर केले मोठे विधान; वकार युनूसने दिली प्रतिक्रिया

भारताचे पुढील तीन सामने श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्ससोबत आहेत. यापैकी दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ आहे ज्याविरुद्ध जिंकणे कठीण होऊ शकते. भारतीय संघ श्रीलंका आणि नेदरलँड्सपेक्षा खूपच मजबूत आहे. अशा स्थितीत भारताची उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळेच संघ व्यवस्थापन हार्दिकला या तीन सामन्यांसाठी प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट करू इच्छित नाही. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त राहावा याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत होण्यापूर्वी हार्दिकने या विश्वचषकात तीन सामने खेळले आणि पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या तंदुरुस्तीबाबत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे म्हणाले, “वैद्यकीय पथक याकडे लक्ष देत आहे आणि हार्दिक त्यांच्यासोबत एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) येथे उपचार घेत आहे. आम्हाला काही दिवसांत त्याच्याबाबत माहिती मिळण्याची आशा आहे. पण आम्ही वाट पाहत आहोत.”

हेही वाचा: SL vs AFG : फारुकीची शानदार गोलंदाजी! ‘करो या मरो’ सामन्यात श्रीलंकेचं अफगाणिस्तानपुढे माफक आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे नॉकआऊट सामन्यांना अजून १५ दिवस शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीत हार्दिककडे तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ आहे. विश्वचषक २०२३चा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे होणार आहे.