नीलिमा जोरवर – nilamjorwar@gmail.com    

कळसूबाई परिसरातील  दोन आदिवासी जमातींनी आपल्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नधान्याला देशभरातील बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यातूनच उभा राहिलाय, महाराष्ट्रातील पहिला सामूहिक ‘मिलेट प्रक्रिया उद्योग’. नाचणी, वरई, सावा, राळा, भादली या मिलेट अर्थात भरडधान्य पिकापासून ‘कळसूबाई वरई चकली’,  रागी पापड, रागी- ज्वारी  देसी घी कुकीज, नाचणीच्या शेवया,  मिलेट इडली- डोसा, मिलेट उपमा, मिलेट पुलाव,  मिलेट भाजी असे विविध पदार्थ येथील लोकांनी बनवायला सुरुवात केली असून ही उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. आरोग्यदायी अन्नाची लोकचळवळ बनलेल्या या उपक्रमाच्या प्रवासाबद्दल तसेच मिलेट या जादुई धान्याच्या पौष्टिक मूल्यांविषयीचा खास लेख..  ‘वल्र्ड फूड डे’च्या निमित्ताने..

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

निसर्गाची आवड तर सर्वानाच असते, तशीच ती मलाही आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य हा निसर्गरम्य जंगलभाग माझ्या राहत्या ठिकाणापासून अगदी जवळच. शिवाय फोटोग्राफी हा माझा आणखी एक आवडीचा भाग. त्यामुळे इथे जंगलात येणे, भटकणे सुरूच असायचे. इथला निसर्ग हा अनोख्या सौंदर्याने नटलेला आहे. वेगवेगळ्या ऋतूंत त्याच्या निसर्गकळा वेगवेगळ्या आणि अद्भुत असतात. त्यामुळे वर्षभर इथे फिरता येते. निसर्ग अनुभवता येतो. या बासौंदर्याबरोबरच इथली जीवसृष्टी, वनस्पतीवैविध्य आणि इथले डोंगर मला जादूई वाटतात.. त्यांच्याशी माझे एक आत्मिक नाते असावे.. त्यामुळे पुन:पुन्हा मी इथे खेचत जाऊ लागले. दरम्यान महाविद्यालयीन युवांसोबत ‘नेचर क्लब’च्या माध्यमातून ‘निसर्ग संवाद’ सुरू केला होता. या विद्यार्थ्यांना निसर्ग समजून द्यायचा असेल तर तो वर्गाच्या बाहेर जाऊन, प्रत्यक्ष अनुभवातून समजला तर ते जास्त प्रभावी असेल, यातून भंडारदरा परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास हा प्रकल्प वर्षभर राबवला आणि या काळातच मी इथल्या निसर्गाला, तेथे राहणाऱ्या आदिवासींना, त्यांच्या निसर्गसंस्कृतीला जास्त जवळून समजू शकले.

सह्यद्रीच्या दुर्गम भागात, जंगलाच्या कडेने राहणारे हे लोक. मुख्यत: ठाकर आणि महादेव कोळी या दोन आदिवासी जमाती. महादेव कोळी हे शेती करणारे तर ठाकर हे शेतीबरोबरच जंगलावर जास्त निर्भर असलेले. अन्न मिळवण्यापासून ते औषधीपर्यंत, लाकूडफाटय़ापासून ते घर बांधण्यासाठी सर्व काही जंगलातून मिळवणार. पावसाळ्यात जास्त पडणारा पाऊस आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची वणवण. शेती पिकते तीही फक्त पावसाळ्याचे चार महिने, नंतर जमिनीच्या शिल्लक असलेल्या ओलीवर काही कोरडवाहू वाल, हरभरा ही पिके. या सर्व संमिश्र पर्यावरणाचा परिणाम इथल्या संस्कृतीत दिसून येतो. म्हणजे यांची शेती, यांचे खान-पान, यांची कला, यांचे स्वतंत्र पण समूहाधारित सहजीवन हे सगळेच इतरांपेक्षा वेगळे.

इथे असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाईने माझे लक्ष वेधले ते इथल्या पीकविविधतेमुळे. ठरावीक उंचीवर, पावसाळ्यात जेव्हा अगदी धुकट वातावरण असते तेव्हा त्या परिस्थितीत उत्तमरीत्या येणारे असे काही पारंपरिक बियाणे यांच्याकडे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भात आणि मिलेट आणि काही कडधान्यांचे प्रकार अशी ही धान्ये. शिवाय परिसरात अनेक रानभाज्या आणि रानफळांचा मेवा वर्षभर असतोच.

पुढे मी दोन गोष्टींसाठी ठरवून इथे भटकंती करू लागले. मला इथल्या रानभाज्यांनी वेड लावले होते, त्यामुळे त्यांचा शोध घेऊन छायाचित्र घेणे व त्याची माहिती मिळवणे हा माझा एक उद्देश ठरला होता. आणि दुसरे म्हणजे इथला निसर्ग, इथली जंगलसंपदा आणि इथली पीकविविधता ही सर्व टिकवायची असेल तर इथल्या लोकांना यात सहभागी करून घेणे जास्त महत्त्वाचे होते. यासाठी कळसूबाईच्या पायथ्याशी असलेली दोन गावे मी निवडली. एक उडदावणे, तर दुसरे बारी-जहागीरदारवाडी. दोन्ही कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणारी गावे. या गावातील लोकांना भेटणे, त्यांच्यासोबत बठका घेणे सुरू केले. पुढे जास्त बठका बारी-जहागीरदारवाडी या गावात होऊ लागल्या. दर आठवडय़ाला शनिवार रात्री आमची ही बैठक व्हायची. मी स्वत:च्या जेवणाचा डबा घेऊन रात्रीच्या राहण्यासाठीच या गावात जात असे. पुष्कळ लोक बठकीला जमायचे. मी माझ्या मनात कितीही आदर्श कल्पना घेऊन गेलेली असले तरी जोपर्यंत त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत माझ्या कामासाठी हे पुढे येणार नाहीत, हे उघड होते. एकतर माझ्याकडे ना कुठला प्रकल्प होता की यांना देण्यासाठी मोठे अनुदान.

बेरोजगारी आणि पाणी या इथल्या दोन मोठय़ा समस्या आहेत. यासाठी सुरुवातीला शासकीय योजनेमार्फत रोहयोच्या कामातून पाण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. कामाच्या मागणीचे अर्ज भरूनही गावात रोहयोचे काम सुरू झाले नाही. याला कारणीभूत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनास्था हेच होते. दोन छोटय़ा बंधाऱ्यांशिवाय फार काही यात आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. हळू हळू लोकांना आमच्या बठकीत काही मिळणार नाही असे वाटू लागले व त्यांचा प्रतिसाद कमी झाला. पण तरीही माझे गावात जाणे, चर्चा करणे सुरूच होते. शेवटी गावातील काही तरुण शेतकऱ्यांच्या सहभागातून छोटय़ा गटाचा विचार करून त्यासाठी काही करावे असा निर्णय पुढे आला. आणि प्रवास सुरू झाला तो महाराष्ट्रातील पहिल्या सामूहिक ‘मिलेट प्रक्रिया उद्योगाचा’.

काळभात, जिरवेल, लालभात ही काही पारंपरिक वैशिष्टय़पूर्ण तांदूळपिके तर नाचणी, वरई, सावा, राळा, भादली ही इथली मिलेट अर्थात भरडधान्य पिके. निरोगी आणि पौष्टिक. या सर्व धान्यांचे महत्त्व एकंदरच मानव जातीसाठी खूप मोठे आहे. यालाच शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी जोडून संवर्धन कसे करता येईल याचा विचार मनात आला. त्यावर अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्याबद्दलची पुष्कळ माहिती मिळवली. या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी या धान्यांबद्दल बोलले. याआधी पारंपरिक बियाणांचे महत्त्व माहीत होतेच, शिवाय अनेक कार्यशाळांतही सहभागी झाले होते. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लवकरच लक्षात आले. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: पिकवलेल्या मिलेट धान्यावर स्वत:च प्रक्रिया करावी असे ठरवण्यात आले.

‘शेतीपासून ते ताटापर्यंत’ असा हा प्रवास होता. या भरडधान्यांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यकता होती अशा यंत्राची. अर्थातच हे असे यंत्र (मशीन) महाराष्ट्रात कुणी बनवलेलेही नव्हते, राज्याबाहेरून ते मागवले गेले आणि सुरूझाले स्वत: पिकवलेल्या धान्यावर स्वत: प्रक्रिया करणे. प्रक्रिया करून हा शेतमाल प्रत्यक्ष ग्राहकांना विकला जाऊ लागला. त्याचा योग्य मोबदला मिळू लागला. ज्यांच्या शेतात वरई पिकवली जाते ते लोक घरी खाण्यासाठी वरई तयार करून नेऊ लागले. बाजारातून आणून साबुदाणा खाण्यापेक्षा स्वत:च्या शेतात तयार झालेली पौष्टिक भगर ते खाऊ लागले, हे यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.

कळसूबाईची भगर ग्राहकांच्या पसंतीला उतरू लागली. यानिमित्ताने आलेले ग्राहक उत्कृष्ट चवीच्या पारंपरिक भाताची मागणी करू लागले. नाचणी, राळा अशा भरडधन्यांचीही मागणी करू लागले. एक दिवस शेतकऱ्यांच्या असे लक्षात आले की, आपल्या पारंपरिक पिकांना जितक्या प्रमाणात मागणी आहे तितक्या प्रमाणात आपण शेतात ते पिकवत नाही. पुढल्या वर्षीच्या पेरणीसाठी गटाचे एकत्रित नियोजन झाले. जुने पारंपरिक भात व भरडधान्य पिकांचे नियोजन केले गेले. याशिवाय शेती विषमुक्त होणेही गरजेचे होते. त्यासाठी सेंद्रिय खते, जीवामृत यांचा वापर सुरू झाला. सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. सर्वाची शेती १०० टक्के सेंद्रिय झाली असे म्हणता येणार नाही, पण माफक नत्राशिवाय इतर रासायनिक खते देणे बंद झाले.

तयार झालेले उत्पादन ग्राहकांपर्यंत योग्य भावात पोहोचवणे महत्त्वाचे होते. परंतु चार वर्षांपूर्वी ‘मिलेट’ हा शब्दही अनेकांना माहीत नव्हता. त्यामुळे ग्राहकांचे याविषयी शिक्षण करणे हेही मोठेच आव्हान होते. शिवाय लोकांना हे धान्य कसे शिजवायचे, कसे खायचे हेही मोठय़ा प्रमाणात माहीत करून देणे महत्त्वाचे होते.

यासाठी ‘मिलेट-जादूई धान्य’ ही मिलेटची सर्व माहिती देणारी रंगीत पुस्तिका मराठीत मी लिहिली. याशिवाय फेसबुकसारखे माध्यम लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी वापरले. माहितीपत्रके तयार केली, ज्यात एका बाजूला संपूर्ण पाककृती छापलेल्या आहेत.

याशिवाय ग्राहकांच्या पसंतीला उतरेल असे चविष्ट मूल्यवर्धित पदार्थ बनवणेही आवश्यक होते. त्यासाठी स्त्री शेतकऱ्यांना तसे प्रशिक्षण दिले. आजही इथले प्रक्रिया यंत्र हे स्त्रियाच चालवत आहेत. कळसूबाई वरई चकली, विविध पिठं, रागी पापड अशी उत्पादने स्त्रिया तयार करू लागल्या. वेगवेगळ्या गावांतील स्त्रियांचा तसेच काही शहरी प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांची मदत घेऊन रागी देसी घी कुकीज, ज्वारी कुकीज, नाचणीच्या शेवया, ज्वारीच्या शेवया, नाचणी, ज्वारी शेव असे विविध प्रकार बनवायला सुरुवात केली. आज ‘कळसूबाई मिलेट आणि ट्रॅडिशनल फूड’ या नावाने ही उत्पादने उपलब्ध आहेत. वरईसोबतच राळा, सावा, बर्टी, कोदो अशा धान्यांवरदेखील प्रक्रिया करून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या सर्व मिलेट्सच्या वेगवेगळ्या पाककृती बनवल्या. ज्यामध्ये मिलेट इडली, डोसा, मिलेट उपमा, मिलेट पुलाव, मिलेट पराठा, मिलेट खीर, मिलेट भाजी असे विविध प्रकार बनवले. कळसूबाई मिलेट महोत्सवाचे आयोजन, अन्नदाता-भीमथडी, सेफ फूड फेस्टिव्हल याद्वारे ‘मिलेट थाळीचा’ प्रसार सुरू केला. दैनंदिन आहारात हे चविष्ट व आरोग्यदायी पर्याय घरच्या घरी बनवता यावेत यासाठी मिलेट कुकिंग कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लोकांना या अन्नाची चव चांगलीच आवडत आहे.

पोपट घोडे हा तरुण शेतकरी ज्याने त्याची स्वत:ची संपूर्ण शेती गेल्या तीन वर्षांत संपूर्ण विषमुक्त केली आहे. तो म्हणतो, ‘‘मी रासायनिक पद्धतीने शेती करत होतो तर रोख वार्षिक उत्पन्न रुपये ३० ते ३५ हजारच्या पुढे जात नव्हते; परंतु आता माझे उत्पादन थोडे कमी झाले असले तरी विषमुक्त शेती आणि भरडधान्य प्रक्रिया यामुळे माझे उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त झाले आहे.’’

बाळू घोडे या शेतकऱ्याने परिसरातून जुन्या बियाणांचे संकलन करून स्वत:ची बीज बँक तयार केली आहे. यात स्थानिक २२ प्रकारची फक्त भरडधान्य पिकांचीच बियाणी आहेत. सफेद नाचणी, काळी वरई, लाल रंगाचा राळा व भादली ही यातील काही विशिष्ट पिके. ही बियाणी सुरुवातीला डेमो प्लॉटमध्ये व नंतर दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतात लावली गेली. त्यातून या बियाणांचे संवर्धनही होत आहे.

ज्या माझ्या फोटोग्राफीच्या आवडीमुळे हा माझा प्रवास सुरू झाला होता, त्यातून रानभाज्या-मिलेटस अशी एक ओळख माझी स्वत:ची होत गेली. नुकतेच इथल्या १६० रानभाज्यांच्या गोष्टी छायाचित्र आणि पाककृतीसह सांगणारे ‘बखर रानभाज्यांची’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याचा वापर सर्वानी आपल्या रोजच्या आहारात केला तर पुस्तक लिहिण्याचं सार्थक होईल.

माझे इंग्रजी साहित्य आणि समाजशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे, किंवा मी काही वर्ष महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवले आहे. कदाचित पुढे जाऊन मी माझे करिअर तिथेच करू शकले असते. परंतु माझ्या आवडीच्या विषयात मी जास्त रमते असे मला वाटते आणि तेच माझे करिअरही होऊ शकते याची जाणीव मला यातून झाली.

हा पारंपरिक अन्नाचा प्रयोग अजून खरंतर पूर्ण झालेला नाही, परंतु शाश्वत शेतीतून शाश्वत उपजीविका, आरोग्य आणि उत्तम पर्यावरणाची हमी यासाठीचे एक पाऊल आहे. शेतकऱ्याचे शेतीतील आदानासाठी बाजारावरचे अवलंबित्व कमी करून स्वावलंबनाचा पाया घातला जाणार आहे. तसेच आज प्रत्येक वस्तूचा ब्रँड बघणाऱ्या शहरी ग्राहकालाही आपल्या खाद्यान्नाचा ब्रँड निवडण्यासाठी चविष्ट व आरोग्यदायी पर्याय याद्वारे उपलब्ध झाला आहे.

ग्राहक आणि त्याचा अन्नदाता शेतकरी यांच्यातील प्रस्थापित झालेल्या नात्याचा ‘कळसूबाई मिलेट’ हा एक आदर्श नमुना ठरावा. हे आता एका छोटय़ा गटासोबत सुरू झालेले काम न राहता ती आरोग्यदायी अन्नाची लोकचळवळ बनली आहे.

chaturang@expressindia.com