Vegetables in Monsoon Avoid These: पावसाळा जसा मनाला आल्हाददायक वाटतो, तसाच तो शरीरासाठी काही वेळा धोकादायकही ठरतो. हवेत वाढलेली आर्द्रता, जागोजागी साचलेलं पाणी व वातावरणातील बुरशी-जीवाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोगप्रतिकार शक्तीवर थेट परिणाम करतो. अशा वेळी खाण्यापिण्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. विशेषतः काही भाज्या ज्या वर्षभर आरोग्यदायी मानल्या जातात, त्या पावसाळ्यात खाल्ल्यास तुमच्या पचनसंस्थेपासून ते त्वचेपर्यंत त्रासदायक ठरू शकतात. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी कोणत्या भाज्या पावसाळ्यात खाणं टाळलं पाहिजे. याविषयीची माहिती दिली आहे. चला तर मग, जाणून घेऊ अशा कोणत्या भाज्या आहेत, ज्या पावसात टाळणं तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं…

पावसाळ्यात या भाज्या खाणे टाळा

१) हिरव्या पालेभाज्या- पालक, पत्ता कोबी

पालेभाज्या म्हणजे आरोग्याचा खजिना मानल्या जातात. त्यात आयर्न, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, आणि आवश्यक जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत या पालेभाज्या खाणं आरोग्यासाठी फायदेशीर न ठरता, धोकादायक ठरू शकतं. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता अधिक असते आणि याच ओलसर हवेमुळे जीवाणू, बुरशी, कीटक वगैरे अतिशय वेगाने वाढतात. हवेतील ओलावा, चिखल, साचलेलं पाणी व उष्णता यांचा एकत्रित परिणाम म्हणजे अन्नपदार्थ विशेषतः पालेभाज्या या वेगानं संक्रमित होण्याचा धोका वाढतो.

२) मशरूम

प्रोटीनचा खजिना असलेला हा पदार्थ पावसाळ्यात तितकाच लवकर कुजतो. बाहेरून तजेलदार दिसला तरी आतल्या आत सडलेली बुरशी फूड‑पॉयझनिंगचा स्फोट घडवते. पावसाळ्यातील ओलावा आणि दमट वातावरण यांमुळे मशरूममध्ये बुरशी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मशरूम खाणे टाळायला हवे.

३) फूलकोबी आणि ब्रोकोली

पावसाळ्यात फ्लॉवर (फूलकोबी), कोबी व ब्रोकोली यांसारख्या भाज्यांमध्ये जीवाणू, बुरशी आणि कीटक वाढण्याचा धोका अधिक असतो. या भाज्यांमध्ये असलेल्या लहान-लहान फटींमध्ये ओलावा साचतो आणि त्यातून सूक्ष्म जीव वाढतात. धुतल्यावरही या भाज्या पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्यांचे सेवन केल्यास फूड पॉयझनिंग, पाचनतंत्र बिघडणे यांसारखे त्रास होऊ शकतात. म्हणूनच या दिवसांत या भाज्या टाळणेच शहाणपणाचे आहे.

४) वांगी

पावसाळ्यात वांग्यांमध्ये किड्यांची झपाट्याने वाढ होत असते. त्यामुळे जर पावसाळ्यात वांगी खाल्ली, तर अनेक अनारोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. वांग्यात अल्कलॉइड असतं आणि या अ‍ॅसिडचं प्रमाण पावसाळ्यात वाढतं. त्यामुळे त्याचा शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो.  वांग्यातील अल्कलॉइडचं प्रमाण वाढल्यानं शरीराला खाज सुटणं आणि पुरळ येणं या समस्या निर्माण होतात. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) कांदा‑लसूण

कांदा‑लसूण हे पदार्थ ओलसर हवेत ठेवले, तर बुरशीचा जाळ तयार होतो. या बुरशीतील अ‍ॅफ्लॅटॉक्सिन्स यकृतावर थेट हल्ला चढवू शकतात. त्यामुळे दिवेकर, पावसात कांदा‑लसूण साठवणूक टाळा आणि ते दिवसभरातच संपवा, असा सल्ला देतात.