Anand Mahindras Fitness Secrets : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करत असतात जे युजर्समध्ये चांगलेच चर्चेत असतात. दरम्यान, आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत; पण अनेकदा ते त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही अनेकदा चर्चेत असतात. आता आनंद महिंद्रा यांचे वय ७० वर्षं आहे; पण या वयातही ते कोणत्याही फिटनेस ट्रेनरशिवाय आरोग्याची ज्या प्रकारे काळजी घेतात ते फार कौतुकास्पद आहे. दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी २०२२ मध्ये एका एक्स पोस्टच्या माध्यमातून फिटनेस रुटीनविषयीची माहिती दिली होती. त्यांचे हेच फिटनेस रुटीन आपण जाणून घेऊ…
आनंद महिंद्रा म्हणाले की, मी फिटनेस गुरू नाही; पण दर आठवड्याला मी फिटनेस रुटीन बदलत असतो, मी कार्डिओ- व्हॅस्क्युलर (पोहणे/ Ellipticals) मसल टोन (वजनांसंबंधित व्यायामप्रकार) स्ट्रेचिंग (योग) अशा प्रकारचे व्यायाम करतो. या फिटनेस रुटीनचा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे दररोज सकाळी मी २० मिनिटे ध्यानधारणा करतो.
दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या फिटनेस रुटीनमधून एक जाणून घेणं गरजेचे आहे, ती म्हणजे ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी रोज २० मिनिटं ध्यान (मेडिटेशन) केल्यास नेमका काय फायदा होत असेल.
इवोल्व फिटनेसचे संस्थापक वरुण रतन म्हणाले की, अनेक वृद्ध लोकांच्या फिटनेस रुटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा अभाव असतो. ६० वर्षांनंतर व्यक्तीच्या स्नायूंची मजबूती आणि हाडांची घनता कमी होते. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत करणं फार गरजेचं असतं. आठवड्यातून २ ते ४ दिवस वेट लिफ्टिंग किंवा रेसिस्टेंट बँडचा वापर करा. वेट लिफ्टिंगमुळे वृद्धांमध्ये इंडिपेंडन्सी आणि आकलनशक्ती सुधारते, असे रतन म्हणाले.
योगासह तुम्ही हे व्यायामप्रकार केल्यास शारीरिक लवचिकता आणि संतुलन राखण्यासाठी मदत होते. शरीरात शांतता आणि ऊर्जा विकसित करण्यासाठी श्वास आणि हालचालींचे समन्वय साधून तुम्ही हे व्यायाम प्रकार केल्यास बरेच फायदे मिळू शकतात, असेही रतन म्हणाले.
तज्ज्ञांच्या मते, पोहणे आणि एलिप्टिकलसारखे व्यायामप्रकार सांध्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे ह्रदयाचे आरोग्य आणि सहनशक्ती सुधारते. आठवड्यातून ३ ते ५ वेळा केल्यास हृदय निरोगी राहते, असेही रतन म्हणाले.
रतन म्हणाले की, दररोज सकाळी २० मिनिटे ध्यान केल्यास शरीराच्या आतील यंत्रणा चांगल्याप्रकारे सक्रिय होतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते, तुमचं मन, डोकं शांत राहतं. त्यामुळे काय करायचे हे निश्चित करता येते. जसं अन्नपदार्थ शरीरास पोषण देण्याचे काम करतात, तसं ध्यानामुळे मन आणि आत्म्याला पोषण देता येते. ही एक भावनिक उपचारपद्धती आहे. वयानुसार मनात भीती, सतत विचार, काळजी आणि हरल्याची, खचल्याची भावना निर्माण होत राहते. पण ध्यानामुळे मनातील सर्व भीती, विचार, काळजी दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, असे रतन म्हणाले.
पण, याची सुरुवात कशी करावी?
१) गादी किंवा खुर्चीवर बसा, पाठीचा कणा सरळ करून बसा.
२) डोळे बंद करा आणि तुमच्या श्वसनक्रियेकडे लक्ष द्या. श्वसनक्रिया सहज असू द्या.
३) मनात विचार येताच, त्यांचे निरीक्षण करा. हे विचार टाळण्यासाठी तुम्ही जप, तपदेखील करू शकता.
४) ही पद्धत तुम्ही निरंतर फॉलो करू शकता. ध्यान ही, साध्य करण्याची गोष्ट नाही, तर ती सतत करण्याची गोष्ट आहे.
कालांतराने तुम्हाला याचे बरेच फायदे दिसून येतील. तुम्ही दिवसाची सुरुवात अधिक शांततेने करू शकता. शांतता तुमच्या आयुष्याचा भाग होऊन जाते. तुम्ही विचारपूर्वक सर्व ध्येये साध्य करू शकता. तुम्हाला आहाराच्या चांगल्या सवयी लागतात आणि सर्वांशी दयाळूपणे बोलू लागता, असेही रतन म्हणाले.