ऋतुचर्या डॉ. अश्विन सावंत, आयुर्वेदतज्ज्ञ

मागील काही वर्षांपासून लोकांना थंड हवेच्या प्रदेशामध्ये सहलीला जायला आवडू लागले आहे, विशेषतः उन्हाळ्यामध्ये. जसे की देशाबाहेर स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, इंग्लंड, युरोप वगैरे थंड हवामानाच्या देशांमध्ये, काश्मीर, मनाली, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग वगैरे उत्तर भारतातील; तर उटी, कूर्ग, मुन्नार या दक्षिण भारतामधील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी; तर माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी या महाराष्ट्रामधील थंड हवेच्या ठिकाणी लोक थंड हवेचा आनंद घ्यायला जातात. आता लोक असे थंड हवेच्या ठिकाणी का जातात, याचा कोणी मुळातून शोध घेऊ म्हटले तर त्याचा संबंध मुसलमानी राजवटीशी आणि ब्रिटिशांशी जोडावा लागेल.

जे इथले गरम हवामान सहन होत नाही, म्हणून उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहात असत. पुढे त्यांचे अनुकरण केले खानदानी रहिजांनी व उद्योगपतींनी, विसाव्या शतकात त्यांचा कित्ता गिरवला नवश्रीमंतांनी, पुढे त्यांच्या पावलावर पाऊल टाकले. उच्च मध्यमवर्गीयांनी आणि आज २१व्या शतकात तर गरीब-श्रीमंत, लहान-थोर असे सगळेच उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जातात, आपापल्या कुवतीनुसार! आणि ही जी कुवत आहे ना, ती वाढली की थंड हवेची ठिकाणे बदलत जातात, अधिकाधिक महागडी होत जातात; समाजामधील आर्थिक स्तरांचा आरसाच जणू!

हेही वाचा… दिवसाची सुरुवात Detox Drink घेऊन करावी का? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

वास्तवात जुन्या काळामध्ये राजेमहाराजे व ब्रिटिश संपूर्ण उन्हाळा थंड हवेच्या ठिकाणी राहायला जायचे. थंड हवेच्या ठिकाणी त्यांची घरे असायची, जिथे ते संपूर्ण उन्हाळाभर थंड हवेचा आनंद घेत राहायचे. तशा प्रकारे संपूर्ण उन्हाळा किंवा महिनाभर थंड प्रदेशामध्ये राहणे काही शक्य नसतानाही, आजच्या समाजाने केलेले त्यांचे अंधानुकरण मात्र इतके अर्धवट असते, की त्यामागचा नेमका हेतू कोणता असा प्रश्न पडतो.

हेही वाचा… Health Special: नाश्त्यातील पोह्यांचे महत्त्व काय?

सध्या लोक साधारण आठ-दहा दिवसांच्या सहलीवर निघतात आणि प्रत्यक्षात त्या थंड हवेच्या ठिकाणी फार फार तर चार किंवा पाच दिवस राहतात. उरलेला दोन-तीन दिवसांचा प्रवास त्या थंड हवेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी करावा लागतो, जो गरम प्रदेशामधूनच असतो. मग अशा प्रकारे चार-पाच दिवस थंड हवेच्या ठिकाणी शरीराला गार वातावरणामध्ये राहण्याचे नेमके काय व कसे फायदे मिळतात? का केवळ “आम्ही थंड हवेच्या ठिकाणी गेलो,” या समाधानासाठी (जे स्वतःपेक्षा इतरांना सांगण्यासाठीच असते) लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून, लाखो रुपये खर्च करून जातात. या अशा अर्धवट पर्यटनाचा आरोग्याला लाभ होतो की तोटा?

थंड प्रदेशाची छोटी सहल….अनारोग्यकर!

उन्हाळ्यातल्या दिवसांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी जेमतेम ४-५ दिवसांसाठी जाणार्‍या आजच्या लोकांना त्याचा आरोग्याला नेमका काय लाभ होत असेल याचा आपण विचार करीत आहोत. तुम्ही जेव्हा तुमच्या गावामधून निघता, तेव्हा तिथले वातावरण उष्ण असते. त्या विशिष्ट थंड हवेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही प्रवास करता तोसुद्धा गरम हवामानाच्या गावांमधून. काश्मीर, मसुरी, मनाली वगैरे थंड प्रदेशामध्ये जाण्यासाठी दिल्लीसारख्या, दार्जिलिंग, काठमांडू अशा थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी कलकत्तासारख्या तर उटी-कुर्गला जाण्यासाठी बंगळूरूसारख्या गरम शहरांमधून जावे लागते, तेव्हाच तुम्ही त्या थंड प्रदेशामध्ये पोहोचता.

बरं, तुम्ही विमानाने थेट थंड हवेच्या गावाला पोहोचलात तरीसुद्धा इथल्या गरम वातावरणातूनच थंड वातावरणामध्ये शिरता. गरम हवामानातून थंड हवामानामध्ये असा सभोवतालच्या तापमानामध्ये झालेला अकस्मात बदल शरीराला उपकारक होईल काय? शक्यच नाही. उष्ण वातावरणाशी जुळवून घेतलेल्या शरीराला अकस्मात थंड वातावरणामध्ये गेल्यावर स्वतःमध्ये अनेक बदल करावे लागतात.

हेही वाचा… Health Special: कोकणच्या ‘या’ मेव्यातून सर्वाधिक लोह मिळते!

उष्ण वातावरणामध्ये परिसरीय (त्वचेजवळील) रक्तवाहिन्या विस्फारल्या जातात, जेणेकरून अधिकाधिक रक्त त्वचेजवळ पोहोचावे आणि रक्ताला व पर्यायाने शरीराला थंडावा मिळावा. स्वेदन (घाम) वाढवून त्याचे बाष्पीभवन होऊन त्वचेवर व शरीरामध्ये थंडावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. मूत्रविसर्जन नियंत्रणात आणले जाते. तहानेचे प्रमाण वाढवले जाते. शरीरातले पाणी वाचवण्याचा व वाढवण्याचा हा प्रयत्न असतो.हअधिकाधिक प्रमाणात द्रवपदार्थांचे व शरीराला थंडावा पुरवणार्‍या पदार्थांचे सेवन वाढवले जाते.अचानक एके दिवशी तुम्ही शीत वातावरणामध्ये शिरलात म्हणजे शरीराला वर सांगितलेल्या सर्व गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल करावा लागतो, ते आरोग्याला बाधक होतेच.

शिवाय ते काही लगेच साध्य होत नाही, त्याला काही तास लागतात. तीन-चार दिवसांमध्ये शरीर कसेबसे आता नवीन थंड वातावरणाशी जुळवून घेतच असते की तुम्ही त्या थंड वातावरणामधून बाहेर पडून पुन्हा गरम वातावरणामध्ये शिरता. आता मात्र शरीराला समजत नाही, “सभोवताली नेमके काय चालले आहे व आता पुढे काय करायचे?” या सगळ्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतोच. तापमान नियंत्रण यंत्रणा, चयापचय सगळंच बिघडतं. शरीराचा हा गोंधळ सुरू आहे तोवर, लोक आपापल्या घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यावर मात्र शरीराचा तो गोंधळ वेगवेगळ्या आजारांच्या स्वरूपात व्यक्त होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थंड हवेच्या प्रदेशाची सहल करून आल्यावर फार घाम येणे, अवास्तवरीत्या गरम होणे, शरीरातून घामाच्या धारा वाहू लागणे, गरम मूत्रविसर्जन होणे, सारखा एसी-पंखा हवाहवासा वाटणे, हुडहुडी भरून ताप येणे, थंडी वाजणे, नाक वाहू लागणे, नाका-घशातून कफ पडायला लागणे, खोकला-दमा, त्वचा काळवंडणे, झोपेच्या नैसर्गिक चक्रामध्ये बिघाड, अशक्तपणा, भूक न लागणे वगैरे तक्रारींनी लोक त्रस्त होतात.अशा प्रकारे चार-पाच दिवस थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी हजारेक किलोमीटरचा प्रवास करून अनेक दिवस काम करून कष्टाने कमावलेले लाखभर रुपये घालवून, वर अजून आपले आरोग्य बिघडणार असेल तर आपण नेमके का जातो अशा सहलींना?