Side Effects Of Mango Artificially Tipened :आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे. उन्हाळा सुरू झाला की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आंब्यावर तुटून पडतात. पण, अनेकांना आंबा खाल्ल्यावर त्रास होतो. अनेकदा आंबे कृत्रिमरीत्या पिकवले जातात. असे आंबे खाल्ल्यास अनेकांना त्रास होतो. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ज्ञ वाणी कृष्णा यांनी सांगितले,”एक दिवस एक व्यावसायिक तरुणी पोट फुगणे आणि मळमळ होण्याच्या समस्येमुळे त्रस्त असताना माझ्याकडे आली. ती घरचे जेवण आणि स्वतःची पाण्याची बाटली घेऊन जाण्याबाबत खूप काटेकोर होती. तरीही तिला हा त्रास होत होता. तिने स्वतः आंब्याचे सॅलड बनवले होते आणि कामाच्या ठिकाणी जेवणाच्या सुटीत ते खाल्ले होते. त्या दिवशी सकाळी तिने घेतलेल्या ताज्या आंब्याचा थोडासा भाग खाल्ला होता.”

पण त्यात नेमके असे काय होते, ज्यामुळे तिला हा त्रास झाला याचा खुलासा करताना पोषणतज्ज्ञ वाणी कृष्णा यांनी सांगितले, “त्याच आंब्याचा एक तुकडा घेऊन जेव्हा प्रयोगशाळेत त्याची चाचणी केली आणि तेव्हा आढळले की, तो कॅल्शियम कार्बाइड वापरून कृत्रिमरीत्या पिकवला गेलेला आंबा आहे. जो भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (FSSAI) बंदी घातलेला पदार्थ आहे. खरं तर, जेव्हा आंब्याच्या हंगामात मागणी जास्त असते तेव्हा बरेच उत्पादक कृत्रिमरीत्या फळे पिकवतात आणि बंदीचे उल्लंघन करतात. अशा रसायनांचा तुमच्या आरोग्यावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही प्रकारे परिणाम होऊ शकतो.

आंबे कृत्रिमरित्या कसे पिकवले जातात? (How are mangoes ripened artificially?)

हे कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर करून किंवा इथिलीन ट्रीटमेंटद्वारे केले जाऊ शकते. ही प्रक्रिया फळांना इथिलीन वायूच्या संपर्कात आणते. कॅल्शियम कार्बाइड ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर, ॲसिटिलीन वायू तयार करते, ज्यामुळे पिकण्याची प्रक्रिया वेगवान होते. या वायूमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असू शकतात.

आंबे इथिलीन वायूच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे फळांमध्ये बदल होतात, ते मऊ होतात, त्यांचा रंग आणि चव बदलते.

कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचे पौष्टिक मूल्य किती असते? (What is the nutritional value of an artificially ripened mango?)

अशा कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांच्या पौष्टिक मूल्यांमध्ये लक्षणीय घट होते. फायबरचे प्रमाण कमी होते. तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाणदेखील कमी होते. एस्कॉर्बिक अॅसिड (व्हिटॅमिन सी), सायट्रिक अॅसिड आणि मॅलिक अॅसिडचे प्रमाण झपाट्याने कमी होते. नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यामध्ये लोह, जस्त व तांबे यांसारख्या आवश्यक खनिजांचे प्रमाण जास्त असते; तर कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये हे प्रमाण कमी असते. फोलेट आणि ट्रेस घटकांची गुणवत्ता खराब असते.

रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्याने काय त्रास होतो?(How do chemically ripened mangoes harm you?)

रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे दीर्घकाळ खाल्ल्यास ते मज्जासंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे तुम्हाला चक्कर येते आणि डोकेदुखी आणि मूड बिघडण्याची शक्यता असते. कॅल्शियम कार्बाइडमुळे निर्माण होणारा अ‍ॅसिटिलीन वायू तुमच्या वरच्या श्वसनमार्गावर परिणाम करू शकतो, ज्यामुळे घशात जळजळ, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. कॅल्शियम कार्बाइडमधून आर्सेनिक व फॉस्फरसच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते आणि कालांतराने कर्करोग व त्वचेच्या जखमांचा धोका वाढू शकतो. तोंडात अल्सर होणे हे तर नेहमीचेच आहे.

मी अनेकांना त्वचेवर अनेक फोड येणे आणि आतडे कमकुवत होणे, असा त्रास होत असल्याचे पाहिले आहे, ज्यामुळे उलट्या, पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होतो. कधी कधी रक्तदाबदेखील कमी होतो.

आंबे सुरक्षितपणे कसे खावे? (How to consume mangoes safely?)

प्रयोगशाळेत चाचणीशिवाय कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे ओळखण्याचा कोणताही विश्वासार्ह मार्ग नाही. काही जण सांगतात की, ते नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे पाण्यावर तरंगतात, त्यांच्या देठाभोवती पांढरे ठिपके असतात, ज्यामुळे प्रत्येक फळ देठाला चिकटते, सौम्य चव असते आणि त्यांचे आयुष्य कमी असते. परंतु, यापैकी कोणतेही निकष पुरेसे नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणून तुम्ही आणलेले आंबे काही वेळ पाण्यात (साधारण १० मिनिटे) भिजत ठेवा. नंतर ते वाहत्या पाण्याखाली पूर्णपणे धुऊन घ्या आणि त्याची साल काढून घ्या. कोविडदरम्यान आपल्याला हॅण्ड वॉश वारंवार वापरायची सवय झाली होती. हे हॅण्ड वॉश फळे आणि भाज्या धुण्यासाठी वापरू नका. कारण- त्यात रसायनेदेखील असतात.