मागील ऋतू संपून नवीन ऋतू सुरु होण्याचा काळ म्हणजे “ऋतूसंधी-काळ”. हा काळ साधारण पंधरा दिवसाचा गृहित धरला जातो. मागील ऋतूचे आठ दिवस आणि पुढील ऋतूचे आठ दिवस असा मिळुन पंधरवड्याचा काळ म्हणजे ऋतूसंधिकाळ. वर्षा ऋतूमधला पाऊस संपून शरद ऋतूचा उन्हाळा (ऑक्टोबर-हिट) सुरु होणे, हा ऋतूसंधिकाळ आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने या ऋतूसंधिकाळाला अतिशय महत्त्व असते.

या दिवसात निसर्गात व वातावरणात अनेक बदल होतात. मानवी शरीराच्या बाह्य (external environment) वातावरणात होणारा बदल शरीराच्या आभ्यन्तर (internal environment) वातावरणावर सुद्धा आपला प्रभाव दाखवतोच दाखवतो. पावसाळ्यात पाण्याचा वर्षाव, आजूबाजूला जमलेले पाणी, थंड वारे, दाटून येणारे ढग, त्यामुळे सूर्यदर्शनाचा अभाव किंवा कमी, त्यामुळे काळोखी वा अर्धवट उजेडी वातावरण अशी स्थिती असते. थोडक्यात एकंदर सभोवतालचे वातावरण ओलसर व थंड असते. मात्र जसा शरद ऋतू सुरु होतो तसा वातावरणात बदल होतो. सूर्यदर्शन होऊ लागते, सर्वत्र उजेड होतो, सूर्याची उष्ण किरणे वातावरणात पसरतात, उष्ण वारे वाहू लागतात आणि उष्णतेचा प्रभाव वाढतो.

Konkan Planned Policy Continuity Major lack of enforcement Maharashtra Day 2024
कोकण: अभाव नियोजनबद्ध धोरण सातत्याचा..
It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

बरं हा वातावरणीय बदल सावकाशीने झाला तरी शरीराला त्या बदलांशी जुळवून घ्यायला अवकाश मिळेल, मात्र मानवाच्या स्वार्थी उचापतींनी निसर्गचक्रात झालेल्या अनपेक्षित बदलांमुळे अचानक एक वा दोन दिवसात वातावरण बदलते. काल-परवा पर्यंत ओलसर-थंड असलेले वातावरण अकस्मात गरम होते. याचा निसर्गावर आणि शरीरावर परिणाम होणे स्वाभाविकच आहे. मानवाच्या शरीराला हा अकम्स्मात बदल अनुकूल होत नाही आणि स्वास्थ्य बिघडते.

हेही वाचा… Mental Health Special: मोबाईलमुळे झोपेशी वैर?

पाऊस संपून शरदाचा उष्मा वाढल्याने शरीरामध्येही उष्णता वाढते, तापमान वाढते, घामाच्या धारा सुरु होतात. या ऋतूसंधिकालात तुम्हाला लोक विविध रोगांनी ग्रस्त झालेले दिसतील, त्यातही विशेषकरुन शरीरात उष्णता (पित्त) वाढल्याने होणार्‍या विकारांनी. अम्लपित्त, तोंड येणे, जीभ सोलणे, जठराच्या,लहान वा मोठ्या आतड्याच्या अन्तस्त्वचेला लालसर सूज येणे, अर्धशिशी(मायग्रेन), अंगावर लालसर पुरळ उठणे, शीतपित्त (अर्टिकेरिया), डोकेदुखी, चक्कर, गुदमार्गावाटे रक्त पडणे, मासिक पाळीला अधिक स्त्राव होणे इतकंच नव्हे तर मस्तिष्कामध्ये सूक्ष्म रक्तस्त्राव होणे अशा समस्या उद्भवतात किंवा असल्यास बळावतात. शरीरामध्ये आतल्या आत होणार्‍या प्रतिकूल घडामोडींमुळे होणार्‍या या विविध रोगांमागे मुख्य कारण असते ते शरीरात वाढलेले उष्णत्व (पित्त).

ऋतूसंधिकाळामध्ये रोग बळावण्याचे कारण वातावरणातला बदल हेच नसते,तर आहार-विहारात झालेला अकस्मात बदल हे यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. आचार्य वाग्भट स्पष्ट सांगतात की “असात्म्यजाः हि रोगाः स्युः सहसा त्यागशीलनात्‌” अर्थात शरीराला सात्म्य (अनुकूल) असलेला आहार-विहार अचानक त्यागल्याने असात्म्यज आजार होतात. इथे अनुकूल (सात्म्य) याचा अर्थ वातावरणाला, शरीराला, स्वास्थ्याला अनुकूल आणि असात्म्य म्हणजे याच्या विरोधी.

पावसाळ्यात तुम्ही सहसा शीत-त्याग करता म्हणजे थंड आहार-विहाराचा त्याग करता. शरीरामध्ये ओल व थंडावा वाढेल असा आहार व विहार टाळता, जे पावसाळ्यातील वातावरणाला अनुसरुन असते. पावसाळ्यानंतर जेव्हा शरदाचा उष्मा सुरु होईल तेव्हा त्या शीत-आहारविहाराचा हळूहळू त्याग करुन उन्हाळ्याला अनुरुप असा आहारविहार स्वीकारणे अपेक्षित असते. मागील ऋतूच्या आहार-विहाराचा त्याग आठ दिवसात करावा आणि पुढील ऋतूचा आहारविहार पुढच्या आठ दिवसात हळूहळू स्वीकारावा, एवढे नेमके मार्गदर्शन पाच हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये केले आहे हे विशेष! प्रत्यक्षात मात्र आपण चूक करतो.

हेही वाचा… आरोग्य वार्ता : कर्करोग टाळण्यासाठी न्याहरी महत्त्वाची

पावसाळ्यात ओलसर-थंड वातावरणाशी जुळवून घेतलेल्या शरीराला शरद सुरु होताना उष्ण वातावरणाशी जुळवून घ्यायचे असते. त्यात काही जण अचानक उष्म्याच्या विरोधात थंड आहार सुरु करतात. जसे की थंडावा वाढवेल असा थंड गुणांचा आहार, सरबतं, शीतपेयं, आईस्क्रीम, थंड पाण्याचे स्नान वगैरे. अशा मंडळींच्या शरीराला उभय बाजूंनी होणारा हा बदल गोंधळात पाडतो. शरीर मागील थंड ओलसर वातावरणाला अनुरूप केलेले, बाहेर उष्मा वाढत चाललेला आणि थंडावा वाढवणार्‍या आहाराचे सेवन, मग शरीराने काय करावं नेमकं? कोणते बदल करायचे?

दुसरीकडे काही लोक पावसाळ्याच्या थंड-ओलसर वातावरणाला अनुरूप आहार शरदाचा उष्मा सुरु झालेला असूनही थांबवत नाहीत. त्यात हा सण-उत्सवांचा मोसम. खाद्यपदार्थांची रेलचेल असते. श्रावण संपलेला असल्याने तिखट, मसालेदार सामिष अन्न खाण्याची स्पर्धाच लागते आणि हे सगळे नेमकं ऋतूसंधिकाळात. शरीराने नेमकं काय करावं? शरीरात वाढणार्‍या या अकस्मात उष्णतेचा (पित्ताचा) सामना कसा करावा? याच्या परिणामी शरीराचा अग्नी (भूक,पचन व चयापचय) बिघडवतो, रोगप्रतिकारयंत्रणा कोलमडते आणि त्याचा फायदा उठवतात रोगजंतू; त्यातही शरीरामध्ये वाढलेली उष्णता ज्यांना सोयीस्कर वाटते असे विषाणू. ही उष्णता शरीरात प्रवेश करण्यास आणि फैलावण्यास या विषाणूंना अनुकूल होते. डोळा येणे(कन्जक्टव्हायटीस), नागीण(हर्पिस झोस्टर),कांजिण्या (चिकनपॉक्स),डेंग्यू अशा रोगांचे विषाणू वाढतात ते या उष्म्याच्या दिवसांमध्येच.

हेही वाचा… Health Special: पिगमेंटेशन म्हणजे काय?

हे सुद्धा स्वाभाविक आहे की ज्यांच्या शरीरामध्ये निसर्गतःच उष्णता जास्त असते अशा ज्या पित्तप्रकृती व्यक्ती असतात,त्यांना उष्णताजन्य (पित्तजन्य) विकृती होण्याचा धोका अधिक असतो आणि कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये स्वास्थ्य बिघडत नाही अशा दुर्मिळ ’स्वस्थ’ व्यक्तींमध्ये तुमची गणना होत असेल तर निर्धास्त राहा. इतरांनी आणि त्यातही खासकरुन पित्तप्रकृती व्यक्तींनी या ऋतूसंधिकाळात आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी.