Parenting Styles Impact : अलीकडे ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमध्ये गुजरातमधील एका लहान मुलाने सहभाग घेतला अन् सोशल मीडियावर चर्चेत आला. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना पाचवीत शिकणाऱ्या या मुलाच्या वर्तणूकीमुळे ही चर्चा सुरू झाली. काहींनी त्या मुलाची बोलण्याची शैली आत्मविश्वासपूर्ण होती असे मानले, तर काहींनी ती बेशिस्त किंवा उद्धट होती असे मानले. सोशल मीडियावर या मुलावर आणि त्याच्या पालकांवर टीका करण्यात आली. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी काही क्षणांच्या टेलिव्हिजन क्लिपवरून पालकांच्या “पालकत्वशैली”वर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.या पाश्वभूमीवर, मुलांच्या आत्मविश्वासूपणे बोलण्याला उद्धटपणा समजला जातो का? किंवा काही मुलं असे उद्धटपणे का वागतात? पालकांनी अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे? अशा काही प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी लोकसत्ताने तज्ज्ञांशी संवाद साधला.
मुलांच्या वर्तनामागील मानसिक आणि कौटुंबिक कारणे समजून घेणे (Understanding the Mental and Family Reasons Behind Children’s Behavior)
मुंबईतील अंधेरी येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी-शेट्टी यांनी लोकसत्ताला माहिती देताना सांगतात,”जेव्हा एखादे मूल जेव्हा उद्धटपणे वागते तेव्हा ते तसे का वागते समजून घेणे आवश्यक असते. त्या मुलांची मानसिक स्थिती काय आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही मुलांच्या वर्तणूकीमागे अनेक कारणे असतात. त्यांच्या घरातील वातावरण काय आहे, घरात आई वडील, आजी-आजोबा कसे वागतात, घरात वाद होतात का? या सर्व गोष्टी मुलांच्या मनावर परिणाम करतात.
पालकांचे एकमत आणि घरातील वातावरणाचे मुलांवर परिणाम (Parental Unity and Home Environment Impact on Children)
आई वडिलांचे किंवा घरातील लोकांचे एकमत होते का? हे देखील अत्यंत महत्त्वाचे ठरते कारण जेव्हा एखादे मुल चूक करते तेव्हा त्याला जर आई जर त्याला ती गोष्ट करू नको समजावत असेल तेव्हा वडील आईच्या भूमिकेचे समर्थन केले पाहिजे. पण जर वडीलच “एवढं काही नाही झाले करून दे” असे बोलत असतील तर ते मुलांना त्यांची चूक समजून घेण्याची संधीच देत नाही. तसेच आई आणि वडीलांचे एकमत नसेल तर मुलांच्या मनातही गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे त्यांना चूक काय किंवा बरोबर काय हे समजत नाही. मुलांबाबत कोणताही निर्णय घेताना आई-वडीलांसह घरातील सर्वांचे एकमत असले पाहिजे.
घरातील वातावरणाचे मुलांवर परिणाम (Parental Unity and Home Environment Impact on
अनेकदा घरातील वातावरण देखील मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करते. पालकांमध्ये खूप वाद होत असतील, मदभेद असतील तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. अनेकदा पालक एकमेकांबद्दल मुलांसमोर बोलतात त्यामुळे मुलांच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होतो कारण त्या वागण्यामुळे त्यांच्या मनावर खूप ओझे येते कारण त्यांना ती भावनाच माहित नसते. अशा वेळी त्यांच्या मनात खूप गोंधळ निर्माण होतो कारण त्यांच्या मनात तुम्ही त्यांच्यासाठी आदर्श असता.
शिक्षाऐवजी संवादाचे महत्त्व (Importance of Dialogue Over Punishment )
मुलांची वर्तणूक जेव्हा चुकते तेव्हा त्या क्षणी त्यांना काहीही बोलू नका, रागावू नका, मारू नका पण नंतर शांतपणे त्यांच्याशी बोला. मुलांमध्ये अशा वेळी काय बोलायचे अशी उत्सूकता निर्माण होते. दुसरे कारण शिक्षा देणे हा काही पर्याय नाहीये कारण असे वागल्याने मुलं आणखी चुकीचे वागतात, खोटे वागतात.
पालकांचे नियंत्रण, सहभाग आणि भावनिक संवाद मुलांच्या विकासावर कसा परिणाम करतो (How Parental Control, Involvement, and Emotional Communication Affect Child Development)
अनेकदा काही पालक असतात जे मुलांना अत्यंत नियंत्रणात ठेवतात, काही पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होतात आणि मुलांसाठी निर्णय घेतात ज्यामुळे मुलांना स्वत:ला काय बरोबर काय चूक हे ठरवताच येत नाही. तर काही पालक अत्यंत बिनधास्त असतात जे मुलांनी काहीही केले तरी काहीच बोलत नाही त्यामुळे त्यांना चूक काय बरोबर काय हे कधी कोणी सांगतच नाही. त्यामुळे मुलांच्या घरात काय वातावरण आहे, पालक कसे वागतात हे अत्यंत महत्त्वाचे असते. काही पालक मुलांशी कोणत्याही विषयावर गप्पा मारतात पण भावनिक संवाद साधत नाही. पालक मुलांशी सामान ज्ञान, टेक्नॉलॉजी, मनोरंजन अशा विविध विषयांवर बोलतात पण मुलांना काय वाटते, त्यांचा दिवस कसा गेला? तुला कोणी काय बोलले का? असा भावनिक संवाद साधत नाही. आजकालचे पालक स्पर्धेच्या जगात हरवलेले असतात कि त्यांना वाटते आपल्या मुलांनी नेहमी काहीतरी साध्य केले पाहिजे. ते ध्येय साध्य करण्याच्या नादात पालक मुलांना आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी शिकवत नाही.
पालकांना दोष न देता मुलांच्या वर्तनामागील कारण समजून घेणे गरजेचे (Understanding the Reasons Behind Children’s Behavior Without Blaming Parents)
असे नाही की, प्रत्येक वेळी पालकच जबाबदार असतात अनेकदा मुलं देखील अजिबात ऐकत नाही. पालक अनेकदा समजावतात तरी मुलाचे वागणे बदलत नाही. काही मूल एका जागी शांत बसत नाही, वर्गात गोंधळ घालतात, काही मुलांचे हस्ताक्षर चांगले नसते, काही मुलं शाळेतील गृहपाठ पूर्ण करत नाही किंवा काही ना काही वस्तू विसरतात तेव्हा पालकांनी १० वेळा सांगितले तरी ती काही मुलांना त्यांचे वागण्यावर नियंत्रित करता येत नाही. अनेकदा मुलं पटकन कोणालाही काहीही बोलतात, किंवा पटकन मारतात तेव्हा पालकांनी अत्यंत काळजीपूर्वक वागले पाहिजे
आवेगपूर्ण किंवा लक्ष विचलित असल्यासारखी वर्तणूक: ADHD ची शक्यता (Impulsive or Distracted Behavior: Possibility of ADHD
काही मुले एखादी गोष्ट बोलताना समोरच्याचे अजिबात ऐकून घेत नाही. ते समोरच्याचे बोलणे पूर्ण होण्या आधीच मध्ये बोलतात तर तिथे त्यांची चूक नसते कारण ते मुद्दाम करत नाही. काही मुलांना Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) आजार असू शकतो. याच आजाराचे एक लक्षण म्हणजे विचार न करता तात्काळ कृती करणे ज्याला आवेगपूर्ण (impulsive) वर्तणूक म्हणतात. अशा मुल त्यांची बोलण्याची वेळ येईपर्यंत वाट पाहू शकत नाही त्यात त्यांची चूक नाही कारण त्यांचा मेंदू त्या पद्धतीने कार्य करतो. अशा परिस्थितीमध्ये पालकांना समुपदेशन केले जाते आणि मुलांना वयानुसार औषध दिली जाते आणि त्यानंतर त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल होतो पण त्यासाठी मुलांचा वैद्यकीय इतिहास, वैद्यकिया चाचण्या केल्यानंतर उपचार केले जातात. तसेच मुलांची ADHD संबधीत तपासणी केली जाते.
मुलांच्या चुका आणि अपयशावर दोष न ठेवता कारण समजून घेणे (Understanding the Reasons Behind Children’s Mistakes Instead of Blaming Them)
त्याबरोबर मुलांमध्ये आणखी काही दोष आहेत का मुलांना नवीन गोष्टी समजून घेण्यात अडचण येते का, मुलांकडून स्पेलिंग किंवा व्याकरणात चुका होतात का? साधे बेरीज वजाबाकी करताना त्याचा अडचणी येतात का हे बघितले पाहिजे. मुलांचे हे वर्तन लर्निंग डिसॅबिलटीजमुळे (Learning Disability) असू शकते ज्याचे निदान रुग्णालायत चाचणी करून करता येते. पण मुलांच्या अशा वागण्यासाठी दोष देण्याऐवजी ते असे का वागत आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पण सहसा पालक असे वागत नाही, मुलांकडून अशा चूका झाल्यास ते मुलांचे अपयश म्हणून पाहिले जाते. एखादे मुलं चुकीचे वागले, बोलले किंवा एखादी गोष्ट चुकीची केली तर ती त्याने का केली याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत नाही उलट मुलांनाच दोष दिला जातो. मुलांमधील अशा लक्षणांचे लवकर निदान झाले तर मुलांना वेळी मदत करता येते. कुठे तरी जर त्या मुलांची मदत करता आली तर पालकांची मदत करता येते.
मुलांवर टीका करण्याऐवजी मुलांचे कौशल्य पहा (Focus on Children’s Skills, Not Social Media Criticism)
असे नाही ते मूल मानसिक दृष्या कमकुवत आहे किंवा त्याला मानसिक आजार आहे पण कुठेतरी त्या मुलांच्या वागण्यामागे काहीतरी कारण असू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. पण सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून एखाद्या मुलाला चूक ठरवण्याची किंवा टिका करण्याची आवश्यकता नाही. आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाला आपलं मत मांडायचे असते पण एखादा व्हिडिओ चर्चेत येतो तेव्हा लोक त्यांच्या मूल्यांनुसार त्या गोष्टीकडे पाहतात. अशा वेळी टिका करण्याऐवजी मुलांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे, अनेकदा एखाद्या मुलांकडे असलेले ज्ञान, कौशल्य यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांना कदाचित मदतीची गरज असू शकते हे देखील लक्षात ठेवले पाहिजे
वर्तन सुधारण्यासाठी सुरुवातीपासून मदत (Early Support for Better Behavior)
या शिवाय काही मुलांना वेगवगेळ्या कारणामुळे मेंदूला इजा पोहचलेली असते अशावेळी काही मुलांमध्ये खोटे बोलणे, चोरी करणे अशा सवयी दिसतात. जर अशा गोष्टींचे योग्य वेळी निदान करून उपचार नाही केली तर त्यांना समाजात वावरताना टिकेचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा मुलांमध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात व्हायला लागतात तेव्हा पालक त्याकडे लक्ष देतात पण तेव्हा परिस्थिती आणखी अवघड झालेली असते पण वेळीच त्यावर उपचार केले तर ते टाळता येते.
पहिल्यांदा जेव्हा असे मूल चोरी करते किंवा खोटे बोलते तेव्हा ते देखील घाबरलेले असते तेव्हा त्याला ओरडण्याऐवजी आधी त्याला जवळ घ्या त्याला शांत करा आणि मग त्याला समजवा. त्यामुळे मुलांचा पालकांवर विश्वास निर्माण होतो त्यामुळे पुढच्या मुलं स्वत:हून पालकांना एखादी गोष्ट हवी असेल तर मागतात किंवा खोट बोलत नाही.
मुलांबरोबर अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यांच्या संवाद कसा आहे हे महत्त्वाचे असते. जर संवाद साधूनही मुले तसेच वागत असेल तर ते अनुवांशिक असते किंवा त्यांच्यामध्ये तो आजार असू शकतो त्यामुळे Antisocial personality म्हणजेच “समाजाविरुद्ध वर्तणूक करणारे व्यक्तिमत्व’ निर्माण होण्याची शक्यता असते त्याच्यावर एक सतत समुपदेशन, वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते.
डॉक्टर जोशी सांगतात की, “मुलांच्या वर्तणुकीबाबत असे अनेक समस्या आहे जे फक्त एक व्हिडिओ पाहून कोणालाही समजत नाही. जे कोणी अशा व्हिडीओवर कमेटं करणाऱ्यांना एकच विनंती आहे की थोडं शांत राहा, मुलांना त्याच्या आयुष्यातील सर्व पैलूंचा अनुभव घेऊ द्या आणि त्यांना काय चुकीचे आहे किंवा काय बरोबर आहे हे त्यांना समजून घेऊ द्या. प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे शक्य नसेल तर तशा मुलांना त्यांच्या पालकांच्या मदतीने किंवा मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने समजून घेऊ द्या.”
पालकांनी काय करायला पाहिजे?
मुलांच्या चुकीच्या वर्तनावर सुरुवातीच्या टप्प्यात समजावणे महत्त्वाचे (Early Guidance is Key for Children’s Misbehavio
प्रत्येक मुलं हे वेगवगेळ्या पद्धतीने वागते किंवा प्रतिक्रिया देत असते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्यात जेव्हा मुलं चुकीच्या पद्धतीने वागते तेव्हा त्यावर पालक कशी काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे असते. अनेकदा लहान मुलांचे चुकीचे वागणे गोंडस समजतात किंवा त्यावर हसून दुर्लक्ष करतात पण तेच वागणे पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा मुलं असे वागतात तेव्हा त्यांना समजावणे आवश्यक असते. पालक सुरुवातीलाच मुलांना समजावू शकतात. उदां. “त्यांच्या वागण्यामुळे समोरच्याला वाईट वाटू शकते किंवा तू तुझे मत वेगळ्या पद्धतीने मांडू शकला असता तर तुला काय वाटते” या पद्धतीने संवाद साधू शकता. त्यामुळे त्यांच्या वागण्याबाबत ते बरोबर होते की चुकीचे होते हे त्यांना समजते.
मुलांना नकार स्वीकारण्याची सवय लावणे आवश्यक (Teaching Children to Handle ‘No’)
अनेकदा पालक मुलांना हवे त्या गोष्टी देतात त्यामुळे त्यांना नकार ऐकण्याची सवयच नसते त्यामुळे जेव्हा अचानक त्यांना एखाद्या गोष्टीसाठी नकार मिळतो तेव्हा तो पचवता येत नाही. त्यामुळे मुलांना नकार ऐकायची सवय असली पाहिजे. त्यांच्या चूका होतात तेव्हा त्यांना त्यांच्या चूका सांगितल्या पाहिजेत त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांचे चांगल्या गोष्टींचे कौतुकही केले पाहिजे. म्हणजे त्यांचा पालकांवरील विश्वास वाढतो. पालकांना दोन्हींचे संतलून ठेवता आला पाहिजे. त्याचबरोबर मुलांना समोरच्याचे ऐकून घेण्याची सवय लावली पाहिजे. मुलांना जसे नकार ऐकण्याची सवय असली पाहिजे तसेच त्यांना कुठे नकार द्यावा याची समज देखील असली पाहिजे. कारण मुल जेव्हा प्रत्येक गोष्टीला होकार देत राहतात ते त्यांचा स्वत:वरील विश्वास देखील कमी होतो. गरज असेल तेव्हा मुलांना नकारही देता आला पाहिजे.
रोज संवाद साधल्यास विश्वास आणि समज वाढतो (Daily Communication Builds Trust and Understanding)
मुलांना कुठे होकार द्यायचा किंवा कुठे नाही बोलायचे हे समजण्यासाठी त्यांच्या नियमित संवाद साधला पाहिजे. रोजच्या धावपाळीत थोडासा वेळ काढून त्यांच्याशी बोलले पाहिजे ज्यामुळे त्यांचे कोणीतरी ऐकून घेत आहे, त्यांना समजून घेत आहे ही भावना निर्माण आहे. अनेकदा पालकांनी मुलांच्या चुकीच्या गोष्टींवर हसणे किंवा काहीही वागले तरी काहीही न बोलणे किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणे टाळले पाहिजे. मुलांच्या चूका तिथल्या तिथे सांगितले पाहिजे किंवा एक दोन दिवसांनी शांतपणे संवाद साधून त्यांना समजावणे आवश्यक असते.
प्रत्येक मुल वेगळा असतो: तुलना टाळा आणि स्वतःला स्वीकारा (Every Child is Unique: Avoid Comparison and Embrace Individuality)
सोशल मीडियावर अनेकदा पालक आणि मुलं व्हिडिओ पोस्ट करतात तेव्हा जसे त्यांचे कौतुक मिळते तशीच त्यांना टीकेचा देखील सामना करावा लागतो. अनेकदा आसपासचे मुल एकमेकांना चिडवतात किंवा नाव ठेवतात पण अशावेळी मुलांना समजावले पाहिजे की, प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते. ते स्वत: सर्वांपेक्षा वेगळी व्यक्ती आहे. त्यांना समजेल अशी उदाहरणे देऊन समजावले पाहिजे. जसे की, आकाशाता सूर्य आणि चंद्र दोन्ही आहे पण दोघांचे वेगळी ओळख आहे. दोघे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहे. सूर्य प्रकाश देतो तसा तो त्याच्या उष्णतेमुळे चटकेही बसतात. म्हणजे कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकाच्या काही ना काही दोष असतात त्याचप्रमाणे ते स्वत: एक वेगळी व्यक्ती असले तरी त्यांच्यातही काही चांगले गुण आहेत आणि काही वाईट गुण असतात पण आपण जसे आहोत तसे आपण स्वत:ला स्वीकारले पाहिजे. मुलांनी जर चांगल्या गोष्टी काय आहेत यावर जर लक्ष दिले तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे पालकांनी त्यांच्या चांगल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे.
सोशल मीडियावर ट्र्रोलिंगचा मुलांवर कसा परिणाम होतो? (Impact of Social Media Trolling on Children)
सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना मुलांना करावा लागल्या त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो. त्यांसाठी ही परिस्थिती एखाद्या मानसिक आघात ठरू शकते ज्यामुळे त्यांना वाटते की काहीतरी चूकत आहे त्यामुळे असे घडते. त्यामुळे ते जास्त बोलत नाहीत आणि आपल्या भावनांना आतच ठेवण्याची सवय लागते. तसेच ते कायमचा आत्मविश्वास गमावतात. त्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना मुलांच्या मनावर आणि त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे.