पावसाळ्यात वातप्रकोप का होतो याचे एक कारण आचार्य सुश्रुत संहितेमध्ये सांगितले आहे ते म्हणजे ‘क्लिन्नत्व’. क्लिन्न या शब्दाचा अर्थ होतो ओले आणि क्लिन्नत्व म्हणजे ओलसरपणा (ओले झालेले). सांगण्याचा अर्थ असा की, पावसाळ्यात जेव्हा शरीरामध्ये ओलसरपणा वाढतो तेव्हा वातप्रकोप होण्याचा धोका बळावतो.

ओलसरपणामुळे होणारा वातप्रकोप प्रावृट्‌ ऋतूमध्ये (पावसाळ्याच्या आरंभी) होतो. तर जसजसा पावसाळा वाढत जातो तसतशी शरीराला पावसाळी-ओलसर वातावरणाची सवय होते आणि त्या ओलाव्याचा तितकासा त्रास होत नाही. वसंत ऋतूमधला उन्हाळा हा ग्रीष्मातल्या उन्हाळ्यापेक्षाही त्रासदायक होतो तसेच आहे. शिशिरातल्या कडक थंडीनंतर जेव्हा वसंतात ऊन पडू लागते, तेव्हा तो गारव्यानंतरचा उन्हाळा शरीराला सहन होत नाही आणि जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतशी त्याची शरीराला सवय होऊ लागते.

अगदी तसेच पावसाच्या ओलाव्याबाबत प्रावृटानंतरच्या वर्षा ऋतूमध्ये होते. असे असले तरी काही व्यक्तींना मात्र जोवर पाऊस सुरु आहे, तोवर वाताचा (वातप्रकोपाचा) त्रास होत राहतो. ज्यांच्या शरीरामध्ये मुळातच वात वाढलेला असतो, ज्यांना आधीच वातविकार झालेला असतो, जे किडकिडीत-बारीक-हाडकुळ्या शरीरयष्टीचे आणि अस्थिर, वाचाळ, धांदरट व्यक्तिमत्त्वाचे असतात असे वातप्रकृतीचे लोक त्यांना याचा अधिक त्रास होतो. ज्या व्यक्ती वातप्रकोप होईल (शरीरामध्ये वात वाढेल) असा आहार घेतात (यात तेल-तूप-लोणी विरहीत अन्न व कोरड्या, थंड गुणांचा आहार,अल्प आहार, सातत्याने उपवास करणारे त्यांनाही वाताचा त्रास होतो. त्याचप्रमाणे आपल्या क्षमतेपेक्षा अधिक कृती, काम, व्यायाम करणारे किंवा सातत्याने एकाच अंगावर-अवयवावर ताण पडेल अशा कृती करणाऱ्यांनाही वाताचा त्रास होतो.

हेही वाचा… खोकल्यावर कफ सिरप घेताना फक्त एक्सपायरी डेट नव्हे तर ‘या’ गोष्टी तपासा; DCGI चा सावधानतेचा इशारा

पावसाळ्यात शरीरामध्ये ओलसरपणा का वाढतो? तर त्याचे कारण स्पष्ट आहे ते म्हणजे हवेतला ओलावा. पावसामध्ये आकाशातून पाण्याचा वर्षाव होत असताना वार्‍यांमुळे पाण्याचे तुषार सगळीकडे वाहतात आणि त्यातले सूक्ष्म थेंब सर्वत्र पसरतात. जे सभोवतालच्या वातावरणामध्ये ओलावा वाढवतात, अगदी घरादारांमध्ये सुद्धा. या हवेमधील पाण्याचे सूक्ष्म थेंब श्वसनावाटे शरीरात शिरतात व शरीरातला ओलावा वाढवतात. परिणामी शरीरातला ओलावा वाढतो. याशिवाय पावसात भिजल्याने शरीर ओले होते हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण.

पाऊस असताना सुद्धा चालत कामावर जाणारे लोक, बैलगाडी-सायकल- स्कूटर- मोटरसायकलवरुन प्रवास करणारे, रस्त्यावर-उघड्यावर व्यवसाय-धंदा करणारे, शेती-बागकाम करणारे, नगरपालिकेची उघड्यावरील विविध कामे करणारे कर्मचारी, बाजाररहाट करायला बाहेर पडणार्‍या गृहीणी -गृहस्थ, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, उघड्यावर खेळणारे खेळाडू, घरातल्या घरात सुद्धा धुणीभांडी वगैरे घरकाम करणार्‍या स्त्रिया आदी अनेक जण पावसात भिजतात किंवा त्यांना भिजावे लागते; त्यांच्या शरीरात ओल वाढण्याचा व त्यामुळे वात बळावण्याचा धोका असतो. त्यातही जे अचानक भिजतात आणि त्याच ओल्या कपड्यांवर बराच वेळ राहतात, त्यांना शरीरामध्ये ओल वाढण्याचा आणि त्यामुळे तत्काळ वाताचा त्रास होऊन अंगदुखी सह थंडीताप, कोरडा खोकला, दमा, शरीर आखडणे, पाय आखडणे, सांधा धरणे वगैरे त्रास होण्याचा धोका असतो.

दुसरीकडे असेही लोक असतात ज्यांना दीर्घकाळापासून पावसात भिजण्याची सवय आहे आणि तत्काळ त्याचा त्रास झालेला दिसत नाही. अशा पावसाळ्यात नित्यनेमाने भिजणार्‍या व त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही असे समजणार्‍या काही जणांना सुद्धा पुढे जाऊन वाताचे त्रास होऊन सांध्यांची- हाडांची-स्नायुंची- नसांची विविध दुखणी जडतात. सातत्याने शरीरामध्ये ओलावा वाढणे हे आज नाही तर उद्या शरीरामध्ये वातप्रकोप करुन वातविकारांना कारणीभूत होणारच. याशिवाय सततच्या पावसामुळे भितींना आलेली ओल हे सुद्धा शरीरातला ओलावा वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण असते.

हेही वाचा… Antibiotics : तुम्ही सर्दी-तापासाठी अँटीबायोटिक्स घेता का? आताच थांबवा, नाहीतर भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

याचबरोबर आधुनिक जगातल्या फरशा सुद्धा ओल व थंडावा धरुन ठेवतात, जो पायांच्या तळव्यांमधुन शोषला जातो. शरीरात ओलावा वाढण्याचे पुढचे कारण हे आयुर्वेदाने वर्षा ऋतुचर्येमध्ये मुद्दाम अधोरेखित केले आहे, ते म्हणजे अति प्रमाणात जलपान. वातावरणातला ओलावा,शरीरात वाढलेला ओलावा, तो ओलावा मूत्रविसर्जन वाढवून बाहेर फेकण्याचा शरीराचा प्रयत्न, ओलाव्यामुळे आरोग्याला संभवणारा त्रास या सर्वांचाच विचार करुन आयुर्वेदाने या दिवसांत पाणी अल्प प्रमाणात प्या असा सल्ला दिलेला आहे आणि शरीराची पाण्याची पूर्ती करायची ती साध्या पाण्याने न करता उकळवून आटवलेल्या पाण्याने किंवा उष्ण गुणांची सूप्स पिऊन करावी याचेही मार्गदर्शन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र हा सल्ला न मानता पाण्याचे व थंड गुणांच्या विविध द्रवपदार्थांचे प्राशन करणे हे शरीरामध्ये अनावश्यक ओलावा वाढवण्यास कारणीभूत होते, जे रोगकारक होते यात शंका नाही. अपवादात्मक असे काही लोक असतात ज्यांना पावसा-पाण्याचा शरीरामध्ये ओलावा वाढण्याचा काहीच त्रास कधीच होत नाही. शरीरामध्ये वाढलेल्या ओलाव्याला आरोग्याला बाधा होऊ न देता शरीराबाहेर कसे काढावे याची त्या शरीरांना सवय असते अर्थात त्यांच्या शरीराला ओलावा सात्म्य (अनुकूल) झालेला असतो. अशा लोकांची गणना आयुर्वेदाने खर्‍याखुर्‍या स्वस्थ व्यक्तींमध्ये केली आहे.तुमची गणना त्या ’स्वस्थ’ व्यक्तींमध्ये होत असेल तर निश्चिंत राहा, अन्यथा पावसातल्या ओलसर-गारव्यापासून स्वतःला जपा.