अभिषेक अरविंद दळवी - response.lokprabha@expressindia.com कोकणात शिमगा अर्थात होळी या सणाचं खूप महत्त्व आहे. आम्ही दरवर्षी या सणासाठी आजोळी येतो. आताही तसेच आलो होतो. अगदी होळीच्या दिवसापर्यंत फक्त एक कुणकुण होती की, जगात एका विषाणूची साथ पसरतेय. आपल्या देशात काही नाही म्हणून सगळे निश्चिंत होतो, पण भराभर ही साथ बाहेरून आपल्या देशात आली आणि एक शब्द कानावर येऊन आदळला, तो म्हणजे ‘लॉकडाऊन.’ झालं! आता आपण आहोत तिथेच अडकणार हे कळल्यावर मन नाराज झालं. गावी राहायला आवडतं, नाही असं नाही, पण सक्तीने रहायचंय आणि किती काळ रहायचंय हे माहीत नसल्यामुळे थोडं वेगळं वाटलं इतकंच. बाकी गावासारखं सुख नाही. निसर्ग, शुद्ध हवा काही विचारू नका. आम्ही साधारण दहा जण आमच्या घरात होतो. छोटय़ा मामाचं घर बाजूलाच होतं. मोठय़ा मामाचं घरही तसं लांब नसल्यामुळे या दिवसांमध्ये आम्ही बऱ्याचदा एकत्रच असायचो. याच काळात मी फेसबुक लाइव्ह जाणून घेतले. पहिल्यांदाच एक ऑनलाइन मेडिटेशन घेतलं, जे लोकांना खूप भावलं. या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच लोकांना आपले बरेचसे छुपे कलागुण सापडले. तसाच हा मला सापडलेला एक गुण. आमच्या घरातले काही वाढदिवस याच काळात ऑनलाइन साजरे झाले. घरच्या घरी केक बनवण्याचा आणि त्याचा आस्वाद घेण्याचा आनंद आम्हाला या लॉकडाऊनच्या निमित्ताने मिळाला. यातल्या मधल्या काही दिवसांत मोबाइलचा अतिवापर झाल्यामुळे माझ्या मोबाइलला क्वारंटाइन करण्यात आलं आणि मला मोबाइलपासून सक्तीची विश्रांती देण्यात आली. झालं! मला जगाशी जोडणारा माझा सोबती माझ्यापासून दूर गेला, जो मला अनेक गोष्टी उपलब्ध करून द्यायचा, अगदी ज्ञानापासून मनोरंजनापर्यंत. आता तो जवळ नाही म्हटल्यावर काय करायचं, हा प्रश्न पडणं साहजिक होतं; पण प्रश्नाला उत्तर असतं. मोबाईल बंद होण्याआधी मी घरातल्या मुलांचा हार्मोनियम क्लास घ्यायला सुरुवात केली होती. तेच काम मी जास्त मनावर घेऊन करू लागलो. ही मुलं म्हणजे माझ्या मोठय़ा मावशीचा मुलगा आणि छोटय़ा मावशीची मुलगी. एक आठवडा झाला नसेल हे सुरू करून, त्यात नवीन विद्यार्थ्यांची भर पडली. तो विद्यार्थी म्हणजे माझे काका, माझ्या छोटय़ा मावशीचे यजमान. संगीतात रुची असल्याने तसंच मेहनत करण्याची आवड आणि तयारी असल्यामुळे त्यांनी शून्यातून बरीच प्रगती केली. असे दिवस जात होते. करोना व्हायरसचे वाढत जाणारे रुग्ण, वाढते मृत्यू यांच्या बातम्या रोज ऐकायला, बघायला मिळत होत्या. नकारात्मकता मनात पसरत होती; परंतु काही बातम्या दिलासा देणाऱ्याही येत होत्या, जसं की लोकं बरे होऊ लागलेत. रोग आटोक्यात येऊ शकतो वगैरे. हे सगळं असं चालू असताना बातमी कानावर आली, की लोकं गावी येतायत. एक नवी चिंता उद्भवण्याच्या शक्यतेबद्दल घरात चर्चा सुरू झाल्या. त्यातच जवळ असणाऱ्या एका गावात एक पेशंट सापडला. मुंबईतून आलेल्या एका पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे तालुक्यात बऱ्याच लोकांना क्वारंटाइन केलं गेलं. गावात नियम कडक करण्यात आले. सुदैवाने आमच्या गावात पेशंट नसल्यामुळे आम्हाला तसा काहीच धोका नव्हता. या लॉकडाऊनच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट घडली. एकमेकांच्या जवळ आल्यामुळे किंवा एकमेकांपासून लांब गेल्यामुळे लोकं एकमेकांचे भाव ओळखू शकले. आम्ही पण याला अपवाद नव्हतो. अंत:करणातले वेगवेगळे पैलू, त्याची जडणघडण याच काळात स्पष्टतेने पाहता आली. मी इतरांबाबत नाही सांगू शकणार, पण मला माझ्या मनाचे बरेच पैलू पाहता आले. वेगवेगळ्या परिस्थितींत होणारी माझी वेगवेगळी अवस्था, दिली जाणारी प्रतिक्रिया सिद्ध करत होती, की स्वत:वर किती काम करणं अजून बाकी आहे. अशाच आत्मनिरीक्षण आणि बा निरीक्षणात लॉकडाऊनचा काळ घालवत असतानाच एक प्रसंग घडला ज्यामुळे करोना आणि लॉकडाऊन यांचं एक विदारक रूप माझ्या समोर आलं. आमच्याच परिचयतील एकाची आई वारली. न्यूमोनिया झाला म्हणून हॉस्पिटलाइज केलं तेव्हा त्यांना करोना झाल्याचं निदर्शनास आलं. सख्खी मुलं-मुली त्याच शहरात असून आईला भेटू शकली नाहीत. त्यांचं शवसुद्धा मुलांना लांबून दाखवलं गेलं आणि शासकीय नियमानुसार अंतिम सोपस्कार केले गेले. संपत्ती, जमीन सगळं असून, मुलं जवळ असून कोणालाच काही करता आलं नाही. ज्यांची आई वारली त्या आमच्या घरातल्या प्रत्येक प्रसंगात आमच्यासोबत हजर रहात आले आहेत आणि आज या लॉकडाऊनमुळे, त्यांच्यावर अशी परिस्थिती आली असताना ना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होतो ना त्या आपल्या भावांना भेटायला जाऊ शकत होत्या. असा हा भयानक व्हायरस- करोना, माणसाला माणसापासून दूर ठेवणारा. टीव्हीवर सगळं ऐकायला सोपं असतं, पण जेव्हा जवळपास असं काही घडून गेलं की मन विषण्ण होतं. असो, घटना घडत जातात. काळ कोणासाठीही थांबत नाही. तेच इथेही झालं. अजूनही लॉकडाऊन चालू आहे. दिवस पुढे सरकताहेत. माझा ऑनलाइन संगीत क्लासही सुरू आहे. आताशा काही बातम्या येतायेत की कुठे लस सापडली, कोणी म्हणतात, औषध सापडलं. थोडक्यात आशेला अजूनही जागा आहे. एक विश्वास वाटतो की, लवकरच ही परिस्थिती निवळेल. आता सरकारही म्हणतंय की आपण दिलेले नियम पाळून आपापली कामं सुरू करायला हवीत. शो मस्ट गो ऑन! आणि खरंही आहे ते, त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती लॉकडाऊन पूर्ण उघडण्याची. एकदा का लॉकडाऊन उघडलं, प्रत्येक जण आपापल्या कर्मभूमीत गेला, की एसएमएस मस्ट.. याने की, सॅनिटायझर लगाए, मास्क चढमए और शारीरिक अंतर बढमए।