वयाच्या कुठल्यातरी एका टप्प्यावर सगळ्या गोष्टींचं विश्लेषण सुरू होतं. पण त्याआधी? कसलीही भीती वाटल्याबरोबर राम राम करणाऱ्या लेखिकेचा रामाला पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रतिनिधी मानण्यापर्यंतचा प्रवास कधी झाला आणि कसा?

दोन वर्षांपूर्वी, एप्रिल २०१२ मध्ये ह्य़ूस्टन महाराष्ट्र मंडळाने श्रीधर फडके यांचा गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मी मंडळाच्या कार्यकारिणीची सभासद होते. गीतरामायणाच्या कार्यक्रमाला किती लोक येतील असा मला प्रश्न पडला. खरं म्हणजे राम नवमी उत्साहाने साजरी केल्या जाणाऱ्या भागात वाढलेली मी, अरुण गोविल आणि दीपिका यांचं रामायण अगदी न चुकता पाहणारी मी, मला असे प्रश्न पडता कामा नयेत. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं रामायणातल्या पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल मनात अढी बसली. राम, रामायण यांसारख्या पुराणकालीन गोष्टींची आजच्या जगात काय समर्पकता? तसं माझ्यासाठी कमिटीची सभासद म्हणून सहभागी होण्याचा गीतरामायण हा पहिला कार्यक्रम. पुन्हा आपल्या कमिटीने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून तो कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे असं वाटत होतं म्हणून सगळ्या शंका-कुशंका बाजूला सारून मी कामाला लागले.
पटेल ब्रदर्स या हिल्क्रोफ्ट भागातल्या इंडियन ग्रोसरी स्टोरच्या बाहेर मी गीतरामायणाच्या जाहिराती लावत होते. तितक्यात मला माझ्या ओळखीची रामभक्त आर्जेन्टिनियन वकील भेटली. तिला पाहिल्यावर वाटलं, चला गीतरामायणाचं एक तिकीट इथेच खपून जाईल. तिची माझी ओळख २००८ सालची. मी भारतीय आहे हे कळल्यावर तिला प्रचंड आनंद झाला होता. ती सत्यसाईबाबा आणि लॉर्ड रामाची फार भक्त. मी तर तिची रामभक्ती पाहून चक्रावूनच गेले होते. पहिल्या भेटीतच एका छोटय़ाशा वादाला तोंड फुटलं होतं. राम, रामाची भक्ती का, कशासाठी असे मी तिला प्रश्न विचारले. राम हा एक नंबरचा ‘Male Chauvinist’  होता. सीतेला तिच्या पवित्रतेचं प्रमाण देण्यासाठी त्याने तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली. “Which man in his good senses would do that to his wife?” हे मी तिला पुढे विचारलं. माझं बोलणं ऐकताना, तुझी जीभ झडून का पडत नाही या आविर्भावाने ती माझ्याकडे पाहतेय असं मला एक क्षणभर वाटलं. तिने माझ्या प्रश्नाकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. एक स्त्री असूनसुद्धा ही बाई रामासमोर कसं काय हात जोडू शकते असं मला वाटलं. रामायणातल्या या अध्यायावर बरीच टीका झाली आहे. त्यावेळचा काळ कसा वेगळा होता, समाजात नतिकतेचे आदर्श प्रस्थापित करण्याची जबाबदारी श्रीरामावर कशी होती असे राम समर्थक युक्तिवाद मी ऐकले आहेत. पटेल ब्रदर्सकडे भेटलेल्या त्या मत्रिणीला मी गीतरामायणाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. गीतरामायणाची जाहिरात बघताच, अगदी आदरयुक्त आणि भारावलेल्या स्वरात गीतरामायणाला यायची इच्छा तिने प्रदíशत केली. त्या दिवशी तिच्याशी कसलाही वाद न घालता, तिला कार्यक्रमाला येण्याचा आग्रह करून मी पुढच्या तयारीला लागले.
गीतरामायणाचा दिवस उजाडला. आम्हा कार्यकारिणीच्या सभासदांची कार्यक्रमाच्या तयारीसाठी लगीनघाई उडाली. सभागृहातल्या मंचावर सुधीर फडके यांचा फोटो, हार, माईक, खुच्र्या मांडून सगळं झालं. कार्यक्रम सुरू झाला. फोटो आणि व्हिडीयो काढायची जबाबदारी माझ्यावर होती. मी प्रेक्षकांच्या शेवटच्या रांगेच्या मागे उभी होते. श्रीधर फडके यांनी आपल्या सुमधुर आणि आर्त आवाजात ‘‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’’चा स्वर लावला आणि ते गाऊ लागले, ‘‘कुश-लव रामायण गाती..कुश-लव रामायण गाती.’’ त्याक्षणी अंगावर हळुवार आठवणींचे शहारे उमटले. मनाने खूप मागे धाव घेतली.
रामाचं, गीतरामायणाचं, राम नवमीचं आणि माझं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं. मला आठवलं ते रामाचं देऊळ, राम नवमीला सक्काळी लाउडस्पीकरवर लावलेली सुधीर फडके यांची गीतरामायणातली गाणी. देऊळ आम्ही राहत होतो त्या कॉलनीपासून २-३ मिनिटांच्या अंतरावर होतं. राम नवमी दिवशी आजूबाजूच्या वातावरणात एक वेगळंच चतन्य असायचं. देऊळ अगदी खुलून जायचं. त्याचबरोबर आठवलं राम नवमीच्या दिवशी येणारं आजोबांचा वर्षश्राद्ध आणि त्या तयारीसाठी सुट्टी घेऊन घरी राहिलेले पप्पा-मम्मी. दुपारी देवळात रामाचा जन्म व्हायच्या आत घरात जेवण आटपून, कावळ्याला बाहेर पान ठेवायची तयारी सुरू असायची. श्राद्धाचा मेनू ठरलेला-वरण, भात, भाजी, तांदळाची खीर, तांदळाचे वडे, हिरव्या मिरच्यांचं रायतं वगरे. दुपारी बरोब्बर बारा वाजता रामाला देवळाबाहेर बांधलेल्या मंडपात एका छोटय़ाशा फुलांनी सजवलेल्या पाळण्यात घालायचं. मला ती वेळ गाठायची घाई आणि खासकरून तिथे वाटल्या जाणाऱ्या सुंठवडय़ाची उत्सुकता. गर्दीतून वाट काढत मी पाळण्याच्या बरीच जवळ जाऊन बसायचे. रामाला पाळण्यात घातल्या घातल्या लाउड स्पीकरवर ‘‘राम जन्मला ग सखे, राम जन्मला..राम जन्मला.’’ गाणं सुरू व्हायचं.

देऊळ घरापासून इतकं जवळ होतं की शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी सगळे खेळ तिथेच. ‘‘कुठे जातेस गं’’ असं विचारल्यावर, ‘‘खेळायला, रामाच्या देवळात’’ अशी आरोळी ठोकून पळत सुटायचे. िरगा-िरगा रोझेस, अटीसकेट-अतास्केट ग्रीन एंड येल्लो बास्केटपासून लपाछपी, छ्प्पी, दोरीच्या उडय़ा, पकडापकडी, खांब खांब हे सगळं आम्ही तिथे खेळायचो. देवळात आल्या आल्या मी कुलूप असलेल्या गाभाऱ्याजवळ जायचे आणि लामणदिव्याच्या अंधूक प्रकाशात, मंद स्मित करणाऱ्या त्या शुभ्र संगमरवरी मूर्ती गाभाऱ्याच्या गजातून पाय उंच करून एकटक पाहायचे. देवळाचा सगळा परिसर इतका परिचयाचा होता की कधी कसली भीती वाटलीच नाही. देवळाच्या शेजारी राहणारेही ओळखीचे. उजव्या बाजूला मोहनचं घर आणि जरा पुढे श्रीपादभाईचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर भरदुपारी रस्त्यात चिटपाखरूही नसायचं तेव्हा आम्ही देवळात खेळत असायचो. मिनिटाला ३००-४०० दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धा करणाऱ्या तुलु, साविका, नीतू, आमिता या मत्रिणी आठवल्या. त्या रामाला माझ्या मत्रिणींचा धर्म ख्रिस्ती की मुसलमान आहे याची बिलकुल पर्वा नव्हती. कदाचित आमचं कारंज्यांसारखं थुई थुई नाचणं, खिदळणं आणि फुलपाखरांसारखं बागडणं त्याला हवं हवंसं वाटत असावं.
श्रीधर फडक्यांचं गीतरामायण पाहताना ही वेगळी चित्रफीत माझ्या डोळ्यांसमोरून झरकन गेली. वाटलं, कॅमेरा तिथेच टाकावा, व्हिडीयो शूटिंग तिथेच थांबवावं आणि त्या रामाच्या देवळात धाव घ्यावी. पण तसं नाही करता आलं, मी तिथेच उभी होते, ओल्या झालेल्या पापण्या टिपत. कार्यक्रम संपल्यानंतरही श्रीधर फडक्यांच्या गीतरामायणाची माझ्यावरची जादू काही उतरली नव्हती. दुसऱ्या दिवशी सासू-सासऱ्यांना फोन केले, पप्पा-मम्मीशी बोलले. गीतरामायणाच्या कार्यक्रमात मी जे काही अनुभवलं ते विलक्षण होतं, तो आनंद काही वेगळाच होता. जिवाचा अगदी आटापिटा करून मी त्यांना सगळं सांगत होते, त्यांना मला नेमकं काय वाटलं ते कळावं म्हणून. ते सगळं शब्दात सांगणं कठीणच होतं.
रामाच्या देवळापासून इथपर्यंतचा प्रवास फार मोठा होता. रात्री चोर येईल या भीतीने राम राम म्हणत झोपणारी ती मी, परीक्षेच्या निकाला दिवशी चांगल्या ग्रेड्स मिळाव्यात म्हणून राम राम करत देवळात प्रदक्षिणा घालणारी ती मी, रात्री लाइट गेला की राम नामाचा जप करणारी ती मी कधीच कुठे तरी नाहीशी झाले होते. राम, रामायण ऐकताना आणि त्याचे भक्त पाहिल्यानंतर भक्तिभाव जागृत होण्याऐवजी ‘‘ओह माय गुडनेस’’ तोंडून येऊ लागलं. प्रभू श्रीरामाचं मर्यादापुरुषोत्तमातून मेल शॉविनिस्ट Male Chauvinist  मध्ये कधी रूपांतर झालं कळलंच नाही. कीव कुणाची करावी कळत नाही, माझी की त्या श्रीरामाची? पुन्हा ते रामायण होणं नाही आणि माझं त्या रामासमोर कदाचित हात जोडणंही होणं नाही.