प्रतिनिधी - response.lokprabha@expressindia.com भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचे दोन ठळक कालखंड मानले जातात. पैकी पहिल्या कालखंडाचे समर्थ नेतृत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले, तर त्यांच्या पश्चात महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. अर्थात त्यांच्याबरोबर पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आदी अनेक खंदे नेते होतेच. या दोन पर्वाच्या नेतृत्वाच्या धाटणीत आणि त्यांच्या कार्यशैलीतही वेगळेपण होते. गांधीजींचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले हे मवाळपंथीय, तर टिळक जहालपंथीय नेते होते. गांधीपूर्व काळात टिळकांनी ब्रिटिशांशी दोन हात केले ते जहाल भूमिकेतूनच. टिळक प्रखर बुद्धिवादी होते. ते पत्रकार, विचारवंत, कृतिशील नेते होते. जनजागरणासाठी त्यांनी नवनवे मार्ग शोधून काढले. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंत्युत्सव सुरू केले. राष्ट्रवादाची चेतना जागृत करण्याकरता त्यांनी या उत्सवांचा वापर केला. लोकमान्य टिळकांनंतर गांधीजींनीही या सगळ्या भूमिका तितक्याच ताकदीने निभावल्या; परंतु त्यांचा भर अहिंसा, असहकार अशा सनदशीर मार्गावर होता. ब्रिटिशांशी होता होईतो सामंजस्याने व्यवहार करण्यावर गांधीजींचा कटाक्ष होता. याउलट, टिळक मात्र आपल्या लेखणी आणि वाणीने ब्रिटिश सरकारला खडे बोल सुनावत. त्यापायी त्यांच्यावर तीनदा देशद्रोहाचे खटले सरकारने भरले. मंडालेचा सहा वर्षांचा कारावास ही त्याचीच परिणती होती; परंतु टिळक ब्रिटिशांच्या या दडपशाहीपुढे कधीच नमले नाहीत. गांधीजींनीही सरकारशी दोन हात केले; तथापि ब्रिटिशांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून त्यांच्यात मतपरिवर्तन करण्याचा त्यांचा मानस असे. अर्थात ब्रिटिश सरकार असल्या सामंजस्यवादी प्रयत्नांना दाद देणं शक्यच नव्हतं. तेव्हा मात्र गांधीजींनी सशस्त्र प्रतिकाराऐवजी नि:शस्त्र प्रतिकाराचं नवं शस्त्र उपयोगात आणलं. त्याद्वारे देशभरात त्यांनी देशप्रेमाची ज्योत पेटवली. त्यांच्या लेखणी, वाणी आणि नित्य नव्या, कल्पक कृती कार्यक्रमांनी सबंध देश त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर उतरला. अशा या दोन उत्तुंग नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. लोकमान्य टिळकांचे सबंध आयुष्य हे एक धगधगते यज्ञकुंड होते. अनेक वादांच्या केंद्रस्थानी ते आयुष्यभर राहिले. त्या सगळ्या वादांत संघर्ष करत त्यांचे नेतृत्व झळाळून निघाले. १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांचे निधन झाले आणि एक संघर्षरत पर्व संपले. १ ऑगस्ट २०२० रोजी त्यांची स्मृतिशताब्दी साजरी होत आहे. यानिमित्ताने आजच्या पिढीच्या विचारकांद्वारे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा नव्याने धांडोळा घेण्याचे ‘लोकसत्ता’ने ठरविले आणि ‘एकमेव लोकमान्य’ या अंकाचा जन्म झाला. टिळकांना मानवंदना देण्याचा हेतू तर यामागे आहेच; त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाच्या विविध पैलूंचे सम्यक विवेचन, विश्लेषण व्हावे, हेही या अंकाचे एक उद्दिष्ट आहे. यास्तव निरनिराळ्या लेखकांना वेगवेगळे विषय देऊन त्यांच्याकडून या अंकासाठी खास लेख लिहवून घेण्यात आले. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी व गणिताच्या मर्मज्ञ अभ्यासक मंगला नारळीकर यांनी टिळकांच्या वेदाभ्यासावर या अंकात प्रकाशझोत टाकला आहे. वेदांचा कालखंड निश्चित करण्यासाठी टिळकांनी कोणत्या कसोटय़ा वापरल्या आणि तो अचूक वर्तवण्यासाठी काय सायास केले याचे सप्रमाण विवेचन त्यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका ज्येष्ठ विधिज्ञांनी टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यांचा आढावा घेतला आहे. १९०८ मधील देशद्रोहाच्या खटल्यात त्यांना सहा वर्षांची मंडालेतील कारावासाची जी शिक्षा ठोठावण्यात आली त्याचा इत्थंभूत वृत्तान्त या लेखात कथन केला आहे. या खटल्यात ब्रिटिशांनी प्रचलित कायद्यांची कशी पायमल्ली केली आणि टिळकांना बेकायदेशीररीत्या तुरुंगात डांबले हे या लेखात तपशीलवारपणे विदित केले आहे. लोकसत्ता ‘एकमेव लोकमान्य’ हा अंक विक्रीसाठी अॅमेझॉनवर, तसेच निवडक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.