वक़्त करता है परवरिश बरसों

हादिसा एक दम नहीं होता… बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि ़काबिल अजमेरीचा हा शेर त्या नादावर अनुरणतो आहे. खरं तर हा मौसम पावसाचा नाही. टक्कं उन्हाच्या वटारलेल्या डोळ्यांचा. पण यंदा पावसानं त्याच्यावर अतिक्रमण केलं. मृगाच्याही आधी तो आषाढाचा स्वभाव घेऊन बरसू लागला. असो. बदल हा सृष्टीनियम, पण या बदलांची दिशा मात्र छातीत कळ आणणारी. त्यामुळे बदल घडण्याची अटळ अपरिहार्यता पटली अन् स्वीकारली जाण्याऐवजी त्याचं फक्त सुविचारिक वा पोकळ वाक्य होऊन कानांवर आदळत राहातं. त्यातून दिलासा वगैरे मिळणं तर दूरच उलट अधिकाधिक खिन्न वाटायला लागतं… ठाणे-मुंबईसाठी गेल्या पाव शतकापर्यंत गाव म्हणून ओळख असलेल्या मूळच्या कल्याणचा माझा जन्म. म्हणजे मला उभ्या-आडव्या महाराष्ट्रात कुठेही दुसरं गाव नाही. आमचा सारा गोतावळाही कल्याण आणि आसपासच्या परिसरातलाच. त्यामुळे मामाचा गाव, आजोळ वगैरे जे काही असेल ते हाकेच्या अंतरावरच. तळ्यात-मळ्यातच्या खेळासारखं. एक पाय इथे अन् एक पाय तिथे. पण असं असलं तरीही मी ‘गाव’ अनुभवलं आणि गावानं अस्ताव्यस्त पसरत शहर होत जाणंही पाहिलं. ठाणे जिल्ह्यातली कल्याण-डोंबिवली ही जुळी गावं. आता या वाढत्या जुळ्या भावांना सांभाळण्याच्या नादात पार टिटवाळ्यापर्यंतचा पसारा महापालिकेला सांभाळावा लागतो. मी जन्मलो ते वाडासदृश घरात. वाड्याच्या अंगणाला लागूनच डाव्या अंगाला आडवी एक मजली चाळ होती. वाड्याची धाकटी बहीणच म्हणा ना! तर दुसरीकडे भिंतीला खेटून गेलेला लाल मातीचा कच्चा रस्ता. ज्याचा एक फाटा चिकणघर नामक भागाला जाऊन मिळे. तिथून पलीकडे एका अंगाला दलदल तर दुसऱ्या अंगाला वाफ्या-वाफ्यांतून केलेल्या शेतीचे तुकडे! मला आठवतं त्यानुसार अगदी तिथून दिवसांतून किमान दोनदा बैलगाडीही जात असे. लाल मातीनं अंगण अन् त्यात लोळून सबंध अंगही लाल रंगात लिंपून जाई. कल्याणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टांगा! घोडागाडी. टिळक चौकातल्या कल्याण गायन समाजाच्या अंगणातून कल्याण रेल्वेस्थानकासाठी दिवसभर टांगे सुटत. हॅक हॅकचा तो नाद त्या मार्गाला लखडूनच गेला होता.

शाळा सुभेदार वाडा. माझं शिक्षण झालं ते जुन्या वाड्यात. भल्या मोठ्या दिंडी दरवाजातून आत शिरायच्या आधीच वाड्याचा परिचित गंध नाकावर टकटक करायचा. गांधी चौकातल्या तायडे आईस्क्रीमचा सूक्ष्म गंधही त्यात मिसळलेला असायचा. हे सगळे अवकाश त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वांसकट आजही स्मृतीत ताजे आहेत.

आधीच्या नगरपालिकेसमोर अन् नंतरच्या महानगरपालिकेसमोर असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाची इमारत, त्याला खेटून असणारी रसवंती गृह, जरा पुढे गेलं की कल्याणचा सुप्रसिद्ध खिडकी वडा, दूधनाका, पारनाक्यावरचा सरकार वाडा, त्यापुढे जरा मैल-दोन मैलभर अंतरावर असणारी कल्याण खाडी अन् तिच्या किनाऱ्यावर असणारा दुर्गाडी किल्ला – हे कल्याण गावाचे अवयव होते. अर्थात अजूनही भाग होते. सगळंच लिहिणं शक्य नाही…

कालौघात मात्र संध्याकाळच्या सावल्या लांब होत होत अंधारात विरत जाव्यात तशी या गावाची स्वतंत्र ओळख विरत गेली. अगदी झपाट्यानं विरत गेली. आजही हे सगळे अवयव दिसतात, पण त्यात प्राण नाहीत. प्रयोगशाळेत रसायनांमध्ये बुडवून ठेवलेले मृत प्राणी जसे दिसतात, तशी अवस्था झालेली आहे. आधुनिक होण्याच्या नादात आपलं मूळ व्यक्तिमत्त्व या जुन्या गावानं अन् नव्या शहरानं गमावलं. आधुनिकीकरण नीटसं न उमगलं नाही म्हणा वा ते अंगावर येऊन आदळलं म्हणा! अर्थात आधुनिकीकरणाला विरोध कुणाचा असणार? पण सर्प जुनी कात टाकून देतो तेव्हा नव्या नक्षीची नवी देखणी ओलसर त्वचा त्याच्या मांसावर उगवलेली असते. तिचं स्वतंत्र सौंदर्य असतं. इथे मात्र तसं झालं नाही. ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ आलं, पण व्यक्तिमत्त्व हरवलं. शिवाय नव्या चेहऱ्यासोबत नवे प्रश्नही निर्माण झाले. अगदी ‘घी देखा पर बडगा नहीं देखा’ अशीच गत! आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत माणसांनं बुद्धीनं, समजेनंदेखील अधिक प्रगल्भ होण्याची अपेक्षा असते. कल्याण हे आधीच इतिहासात रमलेलं गाव! छत्रपतींचे पाय गावाला लागून गेल्याचा अभिमान, मात्र स्वकर्तृत्व शून्य. आधुनिकीकरणात सोयीसुविधांनी युक्त, पण व्यक्तिमत्त्वशून्य इमारती जशा उभ्या राहिल्या, तसंच कल्याण इतिहासाच्या गाळात अधिकाधिक धसत गेलं. शहराच्या वाहिन्या असणाऱ्या वालधुनी अन् उल्हास नद्यांचे मुळा-मुठेप्रमाणे नाले झाले. त्यांच्या किनाऱ्यांवर रसायनांचा सहन करण्यापलीकडचा दर्प जाणवू लागला. कल्याण खाडीवर गणेशघाट झाला, कोन गाव अन् त्यापलीकडल्या भिवंडीला जोडणारा प्रशस्त पूल झाला, पण खालून वाहणाऱ्या खाडीच्या पाण्यात प्लास्टिक बाटल्यां-पिशव्यांचा खचही वाढला. रिंगरूट झाला, पण आधारवाडी तुरुंगाला लागून असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवरचा कचऱ्याचा डोंगर कळसूबाईशी स्पर्धा करेल की काय, इतपत वाढला. किनाऱ्यावर येऊन नाव बुडावी तसं कल्याण रेल्वेस्थानकाजवळ पोहोचूनदेखील फलाट गाठायला अर्धा तास खर्ची पडू लागला. विविध राजकीय नेत्यांच्या चेल्यांचे बटबटीत मोठ्ठे फ्लेक्स सबंध अवकाश डागाळू लागले. त्यात भर – ‘आय लव्ह कोळसेवाडी’, ‘आय लव्ह चक्कीनाका’, ‘आय लव्ह रामबाग’ सारख्या अत्यंत हिडीस फलकांची. ‘पेव्हर ब्लॉक्स’ने रस्ते, फुटपाथ बनवले जाऊ लागले. एक पडदा सिनेमागृह मल्टिप्लेक्स झाली, पण प्रेक्षकांची संख्या घटल्यानं खेळ रद्द करावे लागले. अत्रे नाट्यगृहात गर्दी रंगमंचावर अधिक की प्रेक्षागृहात अशी स्थिती उद्भवली. तालमींना पूर्वी जागाच नव्हती- ती आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा एक ना अनेक गोष्टी!

मुख्य म्हणजे हे सगळं होताना दोन गोष्टी घडल्या. या शहराच्या मूळ अन् बाहेरून येणाऱ्या रहिवाशांना या व्यक्तिमत्त्वशून्य ओबडधोबड वाढणाऱ्या शहराबद्दल नेमकं काय वाटतंय, याचा आवाज कधीच ऐकू आला नाही. किंबहुना तो मारला गेला. शिवाय कल्याण पूर्व अन् पश्चिम यात जमीन-अस्मानाचा फरक जाणवावा, असे बदल घडले. पश्चिम भागात जितक्या सोयीसुविधा पुरवल्या गेल्या तितक्या पूर्वेकडील भागात पुरवल्या गेल्या नाही. वाढत्या शहरीकरणात आजही हा भाग पाण्याच्या समस्येशी दोन हात करतो आहे. माझ्या माहितीनुसार तिथे ग्रंथालयाची एकही शाखा नाही. आजही कल्याण पश्चिमेकडले नागरिक पूर्वेकडील नागरिकांना गावकरी वा ‘देहाती’ असल्याच्या नजरेनं बघतात अन् ती नजर चांगल्या अर्थानं आहे, असं मुळीच म्हणवत नाही. त्यात सुप्त अन् बोचरी तुच्छता आहे.

पुनर्विकास, मेट्रोची बांधकामं यामुळे सबंध शहर निळे पत्रे अन् बॅरिकेड्सचा वेश अंगावर परिधान करून आहे. प्रचंड धुरळा, प्रदूषण सर्वत्र आहे. जुने रेन ट्रिज तोडले गेल्यामुळे उष्मा भयंकर वाढला आहे. जागांचे भाव पश्चिम उपनगरांच्या तोंडात मारतील, असे वाढले आहेत. या सगळ्या उलथापालथीत मात्र कल्याणकर अजूनही इतिहासाचे गोडवे गातो आहे. जय श्रीरामाच्या कर्कश्श आरोळ्या देत पूर्वेकडल्या नागरिकांकडे वेशीबाहेरचे असल्यासारखं बघतो आहे. ही नव्या विषमतेची व्यवस्था आहे, एका अर्थानं नवी अस्पृश्यता आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही.

गावाकडल्या असुविधा, अभाव संपायलाच हवेत. विकास तिथवर पोचायलाच हवा. गावं मुख्य धारेत यायलाच हवीत. कच्चे रस्ते पक्के व्हायलाच हवेत. कच्ची बांधकामं भक्कम व्हायलाच हवीत. मात्र हे घडतानाच्या प्रक्रियेत त्यांची मूळ, स्वतंत्र ओळख विरून जायला नकोत. किंबहुना त्यांचं सौंदर्य अजून लखलखीत व्हायला हवं. अळी ज्या सहजतेनं कोश टाकून फुलपाखरू होते, तसंच गावाची शहरं होताना घडायला हवं.

मुख्य म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत कुणीही मुळापासून उखडून जायला नकोत. त्यांना हुसकावून केलेला विकास कुणासाठी केलेला असेल, हा प्रश्न विचारायला हवा. उत्तरं मिळायला वेळ लागला तरी विचारायला हवा. अन्यथा गावाची शहरं होताना फक्त कचकड्या विकासाची बटबटीत वाळवंट उरलेली असतील. असो. हज़ारों ख़्वाहिशें ऐसी…

…बाहेर पाऊस उघडला असला तरी मळभ आहेच. सावकाश सावकाश तेदेखील दूर होईल. आकाश निरभ्र होईल. फक्त तोवर टिकून राहायला हवं. साऱ्यांनीच…

अमीर कज़लबाशचा शेर अंधारून आलेल्या दिवसावर विजेचा वळ उमटवत चमकून गेला.

मेरे जुनूँ का नतीजा ज़रूर निकलेगा

इसी सियाह समुंदर से नूर निकलेगा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

akshayshimpi1987@gmail.com\