पंकज मराठे

सध्या इंग्लंडच्या राजधानीमध्ये एक विशेष प्रदर्शन सुरू आहे. त्याच बरोबर नेहमीचे इंडिया दालनही खुले आहे. तसे पाहिले तर कोणत्याही प्रदेशाच्या परंपरा समजून घ्यायच्या असतील तर तिथे जाऊन त्याची माहिती जास्त कळते, नाही का? पण आपल्या भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिशांबरोबर काही काळासाठी जोडले गेलो आहोत. आणि पुरातन गोष्टी जतन करण्याचा एक उपक्रम ब्रिटिशांनी रुजवला. त्यामागे मुख्यत: एका खूप पुरातन आणि सुसंस्कृत समाजाचे आकलन हा हेतू होता.

१७५३ साली स्थापना झालेल्या आणि १७५९ मध्ये नागरिकांसाठी उपलब्ध झालेल्या जगातल्या सर्वात मोठ्या अशा ब्रिटिश म्युझियममध्ये हे प्रदर्शन आहे. या म्युझियममध्ये जगभरातल्या वस्तूंचा संग्रह आहे. अभ्यासकांसाठी तर हे संग्रहालय एक खजिनाच आहे. म्हणजे, भारतामध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीची लढाई जिंकली होती आणि पाय रोवण्यास सुरुवात केली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये इंग्लंड सरकारकडून म्युझियम आकार घेत होते. अर्थात तेव्हा भारतीय वस्तू इथे ठेवण्यास मिळतील असे खुद्द ब्रिटिश म्युझियमलासुद्धा वाटले नसेल. दुसरीकडे, १८०१ साली स्थापन ईस्ट इंडियानेसुद्धा इंडिया म्युझियमची स्थापना केली.

१८५७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्य उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची मालमत्ता ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आली; तेव्हा १८५८ साली इंडिया म्युझियमचा सर्व संग्रह ब्रिटिश म्युझियम, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम आणि किव गार्डन्स म्युझियममध्ये हस्तांतरित केला गेला. प्राचीन वस्त्र आणि पुरातत्त्वीय संग्रह ज्यात अंदाजे २४२० पुरातन नाणी आणि इतर अनेक वस्तू ब्रिटिश म्युझियममध्ये हळूहळू १८८२ पर्यंत हस्तांतरित झाल्या. सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये १५ लाख वर्षांपासून आताच्या आधुनिक भारताच्या वस्तूंचा अमूल्य ठेवा संग्रहित आहे. त्यावर एक स्वतंत्र पुस्तकच उचित ठरेल.

तर त्यातल्या २००० वर्षांपासूनच्या परंपरांचे एक प्रदर्शन सध्या सुरू आहे. त्यात सामाजिक आणि धर्माच्या अनुषंगाने प्राचीन भारताची एक समृद्ध ठेव आपल्याला स्तिमित नक्कीच करते. शिल्प, चित्रे, रेखाटन आणि हस्तलिखिते या प्रदर्शनात मांडली आहेत.

कल्पना करू या, साधारणत: २२००-२३०० वर्षांपूर्वी अलेक्झांडरची सेना परत गेली होती, बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार सुरू झाला होता. सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची पायाभरणी झाल्यापासूनचा उत्तर आणि दक्षिण भारताच्या सामान्य जनतेचे राहणीमान, विचार, समजुती आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी हे समजून घ्यायला हे प्रदर्शन आपल्याला अलगद त्या कालखंडामध्ये घेऊन जाते.

सततच्या लढाया आणि जीवनातली अस्थिरता, जाती व्यवस्था, रोगराई यामुळे यातून माणसे मनाच्या शांतीचा मार्ग धुंडाळत होती. दुसरा असाही विचारप्रवाह आहे की, जेव्हा माणसाला स्थिरता येते आणि प्रमुख गरजा भागतात तेव्हा तो मुख्य गरजांच्या पुढे जाऊन मनाचा विचार करू लागतो. मुख्यत: हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरेचा मागोवा घेता येतो. इस्लाम धर्माचा उदय होण्यास तब्बल ७०० वर्षांचा अवधी होता.

सुरुवातीला २२०० वर्षांपूर्वी, भारत या देशाच्या सीमा वेगळ्या होत्या. देश शेतीप्रधान असल्यामुळे, बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती. गावे दाट अरण्यांनी वेढलेली होती. मान्सून पाऊस आणि नद्यांचे पाणी वापरात येत होते. त्यामुळे पीक पाण्याच्या सुरक्षिततेसाठी लोक देवदेवतांना पुजत असत. दैवी शक्ती, निसर्गदेवता, यक्ष, यक्षिणी, सर्प इत्यादी आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यांना प्रार्थना केली तर आपले रक्षण होऊ शकते हा विचार होता. या निसर्गशक्तींची आराधना करण्यात येत होती. प्रदर्शनात त्यांची शिल्पे आपल्याला पाहता येतात. टेराकोटा, लाव्हा दगड, साधे दगड, तांबे, ब्राँझ यांसारख्या घटकांपासून देवतांची शिल्पे बनवली जात होती.

हे प्रदर्शन ब्रिटिश म्युझियम, भारतीय अर्केओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यामाने भरवण्यात आले आहे. या शिल्पांमधून आपल्याला शिल्पकला, ओतीव काम यात खूप प्रगती भारतीयांनी केली होती याची जाणीव होते. तसेच गणपती देवता हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये उपासण्यात येत होती हे लक्षात येते. तसेच सर्वधर्मसहिष्णुता ही प्राचीन काळापासून शासकांकडून पाळण्यात येत होती हे सम्राट अशोक याच्या आणि गुप्त घराण्याच्या राजवटींच्या स्मृतिस्तंभांमध्ये पाहायला मिळते.

इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून १२०० पर्यंतच्या मथुरा आणि परिसरात २४वे तीर्थंकर भगवान महावीर, रिषभनाथ आणि धरणेंद्र यांच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. त्याच बरोबर आयगपटास (स्मृतिस्तंभ) वर इतर तीर्थंकरांच्या प्रतिमांचे कोरीव काम पाहायला मिळते. विद्योची देवता सरस्वतीची इ. स.१०००-११०० मधील मूर्ती आपणास पाहता येते. जैन धर्मामध्ये ध्यानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते अधोरेखित करणाऱ्या भगवान महावीरांच्या पहिल्या शतकापासूनच्या मूर्ती आपण पाहतो.

आंध्र प्रदेशातील अमरावती येथील स्तुपांच्या स्मृतिस्तंभांवर दान करणाऱ्यांची नावे ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश दिसतो. यावरून स्त्रियांना प्राचीन कालापासून समाजात बरोबरीचे किंबहुना वरचे स्थान होते हे ठळकपणे लक्षात येते. ही शिल्पे इसवीसन पहिल्या शतकापासून आहेत.

एक स्कॉटिश इंग्रज अधिकारी सर वॉल्टर इलियट यांनी परिश्रमाने १८४५ साली अमरावती स्तुपाचे उत्खनन केले. तिथले बरेच अवशेष आजही चेन्नई येथील म्युझियममध्ये आहेत अशी नोंद आहे. तत्कालीन जमीन मालकाने (राजा वासिरेड्डी वेंकटाद्री नायडू) स्तुपातील विटा-दगड यांचा इतर कामांसाठी वापर केला होता. अर्धी मोडतोड झाल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांना ही माहिती कळली आणि त्यांनी उरलेल्या अवशेषांचे जतन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

बौद्ध धर्मातील मंजुश्री, वज्रपाणी, तारा बोधिसत्त्व आणि देवी कुंडा यांच्या सुबक मूर्ती पाहता येतात. इ.स. ७५ ते १०० मधील बुद्धाची पहिली खात्रीशीर प्रतिमा पाहायला मिळते. बोधी वृक्षाखालील गौतम बुद्धांची ध्यानमग्न प्रतिमा आणि त्यावेळी त्यांना त्यापासून रोखू पाहणाऱ्या दुष्ट शक्ती त्यांच्या आजूबाजूला असल्याचे दृश्य एका मूर्तीमध्ये अप्रतिमपणे कोरलेले आहे. एका शिल्पामध्ये राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांच्या आई राणी माया यांच्या पोटी जन्मापासून ते राजपुरोहितांकडे सुपूर्द करतानाचा प्रसंग कोरलेला आहे. तसेच तिन्ही धर्मांमध्ये त्याकाळी काही देवता सामायिक पुजल्या जात होत्या ही माहिती कळते.

१५१२ मधील एका जैन हस्तलिखितामध्ये २३वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांच्या जीवनातील प्रसंग सुंदरपणे चित्रित केले आहेत. मुख्यत: जैन धर्मामध्ये सर्व जीवजंतूंना हानी न पोहोचू देण्याची शिकवण आहे, म्हणून या प्रदर्शनामध्ये कोणतेही प्राणिज रंग अथवा पदार्थ न वापरण्याची काळजी घेतलेली आहे. हिंदू धर्मामधील गणेशाची प्रथम मूर्ती ही इ.स. पहिल्या शतकामधील असल्याची नोंद दिसते. त्या नंतर चौथ्या शतकापासून आकारात सुबकपणा आणि विविध मुद्रांच्या (नाचणारा गणपती) मूर्तीचे कोरीव काम दिसते. गणेशाची सातव्या शतकामधील पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती, अग्निजन्य खडकामध्ये घडवलेली मूर्ती आपल्याला पाहता येते.

भगवान विष्णू, भगवान शिव यांच्या पहिल्या शतकातल्या मूर्ती आपणास पाहता येतात. कोरीव काम, आभूषणे खूप सुंदर आहेत. मथुरेतील किरात रूपातील शिवाची मूर्ती, अर्ध नारीनटेश्वर मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. विविध शतकातील श्री विष्णू, श्री लक्ष्मी, श्री कृष्ण, श्री वराह रूप यांच्या मूर्ती पाहता येतात. विशेषत: सर्प प्रतिमा निसर्ग रक्षणकर्त्या म्हणून पूजन केल्या जात होत्या असे दिसते. वासुकी (एकापेक्षा जास्त फणा असलेला) सर्पाची प्रतिमा हिंदूंबरोबर बौद्ध आणि जैन प्रतिमांमध्येसुद्धा दिसतात. गुप्त काळामध्ये नाण्यावर देवतांच्या प्रतिमांचा वापर केलेला दिसतो. कुबेर देवतेचे एक शिल्प छान कोरलेले आहे.

हिंदू आणि बौद्ध धर्म पुढे पूर्वेकडे (थायलंड, कंबोडिया) आणि चीन देश, गांधार देश (आजचे अफगाणिस्तान) या ठिकाणी विस्तारला.

२००० वर्षांपासून मथुरा हे या तिन्ही धर्माचे स्थान होते याचा प्रत्यय प्रदर्शन पाहताना येत राहतो. तसेच कोसम्बी, पितळखोरे येथील गुहा, सारनाथ, चंद्रकेतुगड, अमरावती येथील उत्खननामधून तिन्ही धर्मांचा इतिहास लक्षात येतो.

या प्रदर्शनांमधून नकाशांद्वारे काही गोष्टी अशा लक्षात येतात की जसे हिंदू (काशी, मथुरा), जैन (रिजुपालिका नदी काठचे जरिंभिकाग्राम) आणि बौद्ध (बोधगया, सारनाथ) धर्मांची मुख्य ठिकाणे एकमेकांपासून जवळपास ३०० कि.मी. परिघात आहेत.

मूर्तिपूजा, निसर्गतत्त्वांचा आणि शक्तिशाली प्राण्यांचे देवस्वरूपात आदरपूर्वक पूजन, मनावर नियंत्रण आणण्यासाठी स्पिरिच्युअॅलिटी, ध्यान यांचे महत्त्व, दुसऱ्या धर्माबद्दल आदर या तिन्ही धर्मामधील काही सामायिक परंपरा म्हणता येतील.

प्रदर्शन तयारी करताना ब्रिटिश म्युझियमने त्या त्या धर्माच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आखणी सुबक केली आहे. शेवटी बाहेर आल्यानंतर भारतीय वैशिष्ट्य असलेल्या वस्तू आणि पुस्तके, आभूषणे इत्यादी सोव्हेनिअर म्हणून खरेदी करता येतात. एकूणच हे प्रदर्शन चुकवू नये असे आहे यात शंका नाही.

जर इंग्लंडात आणलेल्या वस्तूंचे इतके छान संवर्धन होत असेल तर भारतभर विखुरलेल्या अमूल्य प्राचीन वस्तूंचे जतन आणि त्यातून आपल्या समृद्ध वारशाचे संवर्धन आणि आपल्या संस्कृतीचा रास्त अभिमान जर आपल्याला करता आला तर तो सुदिन! आणि तो एक मोठा प्रकल्प ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज मराठे – marathe_pan_am@yahoo.com