काही मित्र आपल्या भाग्यात कसे येतात? त्यांच्यामुळं आपलं आयुष्य कसं काय समृद्ध होतं? असे प्रश्न मला पडतात आणि विचार करताना उत्तर सापडतं.. ही पूर्वजन्मीची सुकृतं!

अशाच एका जिवलग स्नेह्यचा मला गतवर्षी रात्री नऊच्या सुमारास फोन आला. या स्नेह्यचा आवाज घनगंभीर, आपुलकीनं ओतप्रोत भरलेला. ‘‘कुलवंतजी, काय करताय? आम्ही ‘प्रीतम’मध्ये जेवायला येतोय!’’

‘‘अरेच्चा! मी तर वर- म्हणजे घरी आलोय!’’

‘‘ओहो! ठीक आहे. आम्ही दुसरीकडे जातो.’’

‘‘अजी, आप पराये थोडे हो? आप तो घर के ही हो।’’

‘‘माझ्याबरोबर काही पत्रकार मित्र आहेत. घरी भाभीजींना त्रास होईल.’’

‘‘अहो, तुमच्या येण्यानं पौर्णिमेचं चांदणं घरात पसरतं. तिला काही त्रास होणार नाही. तुम्ही या. मी ‘प्रीतम’मधूनच जेवण घरात मागवतो.. मग तर झालं? या.. या.’’

..आणि थोडय़ा वेळानं त्या आपुलकीभऱ्या आवाजाचा मालक- भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या काही पत्रकार मित्रांसह आले. अरुण शेवतेंच्या ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाच्या रौप्यमहोत्सवी अंकाचं प्रकाशन आटोपून सुशीलजींबरोबर मंडळी जेवायला आली होती. एकदम इतके सारे मान्यवर पाहुणे पाहून मी खूश झालो. गप्पांची मफल सुरू झाली. मफिलीत मी व सुशीलजीच जास्त बोलत होतो. त्यांचा थट्टेखोर, दिलखुलास स्वभाव मफिलीला रंगत आणत होता. जुन्यापुराण्या आठवणी निघत होत्या. हसून एकमेकांना टाळ्या दिल्या जात होत्या. या आकस्मिक आनंद मैफलीला कारण ठरले होते आमचे मित्रोत्तम सुशीलकुमार शिंदे! चार सप्टेंबरला या मित्रोत्तमाचा वाढदिवस आहे.

पिंगट डोळ्यांचे, लालसर गोरे सुशीलजी म्हणजे देखण्या पुरुषांचा प्रतिनिधी. बरीच वर्षे सत्तेत राहूनही सत्तेचा कोणताही दर्प न चढलेला हा माणूस. सत्ता ही राबवण्याची गोष्ट आहे, उपभोगाची नव्हे, हे जाणणारा. मी काही दशकांपूर्वी एक मराठी नाटक पाहिलं होतं. ‘राजसंन्यास’ नावाचं. त्यातलं एक वाक्य मला कळलं नव्हतं. मी कोणाकडून तरी ते समजून घेतलं.. ‘राजा हा जगाचा उपभोगशून्य स्वामी असतो. राज्योपभोग म्हणजे राजसंन्यास!’ आज हे लिहिताना मला अचानक ते वाक्य आठवलं. सुशीलकुमारजींना ते नेमकं लागू पडतं. अचूक वागणं आणि अचूक ठिकाणी अचूक बोलणं!

अत्यंत गरीब परिस्थितीतून अतिशय कष्टानं वर आलेले सुशीलजी म्हणजे ‘उत्तम कष्टांना उत्तमच फळं येतात’ या उक्तीचा नमुना. त्यांची आणि माझी पहिली भेट मला नेमकी आठवते. त्या काळातील एका विख्यात हॉटेलच्या मालकांमुळे आमची पहिली भेट झाली. पोलिसातली नोकरी सोडून ते नुकतेच आमदार झाले होते. त्यांचं नाव हळूहळू समाजाला परिचित होत होतं. आमच्या गप्पा रंगल्या. कोणावरही कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह टिपण्णी न करता सभ्य, सुसंस्कृत वागण्यानं त्यांनी उपस्थितांना सहज जिंकून घेतलं होतं. मी त्यांना ‘प्रीतम’ला येण्याचं निमंत्रण दिलं. तर ते म्हणाले, ‘‘मी खूपदा तुमच्या इथे जेऊन गेलोय.’’ मला आश्चर्य वाटलं. ‘‘मी तर काऊंटरवरच असतो. आपली भेट कशी झाली नाही? आता पुन्हा या. हॉटेल तुमचंच आहे.’’

गेली पाच दशकं सुरू असलेला अतूट स्नेह असा सुरू झाला. सुशीलजी म्हणजे निखळ मत्र! त्यांच्याकडे दोस्तांचा कायम राबता असायचा. प्रत्येकालाच ते आपले वाटत. प्रारंभीच्या काळात सुशीलजींकडे रानडे रोडवर एक खोली होती. एखाद्या सुट्टीच्या दिवशी काही खास मित्रमंडळी तिथं जमायची. मीही त्यात असे. त्या रविवारी दुपारी दीड-दोनच्या सुमारास मी ‘प्रीतम’मधून जेवण घेऊन जायचो. गप्पा मारत, कॅरम खेळत किंवा नुसतीच गाणी ऐकत आम्ही बसायचो. गप्पांना विषयाचं बंधन नसे. तिथं कोणीच आपापल्या व्यवसायातल्या कटकटी घेऊन येत नसे. सुशीलजींचे संघर्षांचे दिवस होते ते. पण त्यांच्या हसतमुख चेहऱ्यावर कधीही ताण नसे. सर्वाना सोबत घेऊन जाणारे मुशाफीर आहेत ते!

सुशीलजींनी अतिशय झपाटय़ानं राजकारण आत्मसात केलं व भराभर यशाची शिखरं ते चढत गेले. आमदार ते केंद्रीय मंत्री ते सभागृहाचे नेते ते राज्यपाल अशा सर्वच पदांवर त्यांनी काम केलं आणि आपला ठसा उमटवला. तो इतिहास सर्वज्ञात आहेच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मित्रांना ते कधीही विसरले नाहीत. जमिनीत खोलवर रुजून आकाशापर्यंत वाढत गेल्यामुळे हा वृक्ष आजही ठामपणानं उभा आहे.

मी फिल्मी जगताला जेव्हा वित्तपुरवठा आणि वितरणाचं काम करत होतो तेव्हा ते नेहमी म्हणायचे, ‘‘कुलवंतजी, हे क्षेत्र अत्यंत बेभरवशाचं आहे आणि दुसऱ्याचा घात करणारं आहे. तुमच्यासारखा माणूस इथं फार काळ रमणार नाही. काळजी घ्या प्रत्येक गोष्टीची.’’

आम्ही ‘मिडटाउन प्रीतम’ बांधायचं ठरवलं. आम्हाला त्याच्या भव्यतेसाठी वाढीव एफएसआय लागणार होता. त्यासाठी बऱ्याच परवानग्यांची गरज होती. मी सुशीलजींकडे विषय काढला. ते महत्त्वपूर्ण खात्याचे मंत्री होते. वसंतदादा पाटील तेव्हा मुख्यमंत्री होते. अंतिम परवानगी दादाच देणार होते. माझा व दादांचा फारसा परिचय नव्हता. पण सुशीलजी परिचयाचे होते. वाढीव एफएसआयसाठी ‘मिडटाउन प्रीतम’ हे फोर स्टार हॉटेल असायला हवं हे त्यांनी लक्षात आणून दिलं. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व परवानग्या मिळवा. मग मुख्यमंत्र्यांकडे मी तुम्हाला घेऊन जातो. दादा कदाचित मंजुरी देतील.’’ मी फोर स्टार हॉटेलसाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळवल्या. सुशीलजींनी त्यासाठी कोणतीही नियमबा गोष्ट केली नाही. आपली ओळख दिली नाही. सर्व परवानग्या मिळाल्यावर मी सुशीलजींकडे गेलो. त्यांच्या बंगल्याकडून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणारा एक रस्ता होता. मला घेऊन ते वसंतदादांकडे गेले. दादा त्यांची सुप्रसिद्ध बंडी परिधान करून घरात आरामात फाइलींचा निपटारा करत होते. सुशीलजींनी माझा परिचय करून दिला. दादा लगेच म्हणाले, ‘‘हो, मला ऐकून माहिती आहेत. शिवाय मी काही वेळा भेटलोयही ह्य़ांना.’’ माझ्या कामाची माहिती देऊन सुशीलजींनी त्यांना सांगितलं, ‘‘कुलवंतजींना वाढीव एफएसआय हवा आहे.’’ दादांनी विचारलं, ‘‘मग मी काय करायला हवंय त्यासाठी? तुम्ही परवानगी देऊन टाका.’’ ‘‘नाही दादा, तो अधिकार माझ्याकडे नाही, तो मुख्यमंत्र्यांकडे आहे.’’ दादांनी झटक्यात कागदांवरून नजर फिरवली. ‘‘तुम्ही पाहिली आहेत ना कागदपत्रे?’’ असं विचारून त्यांनी वाढीव एफएसआयला मंजुरीही दिली.

हे बांधकाम सुरू असताना (इंदिराजींच्या हत्येनंतर) दोन्ही ‘प्रीतम’च्या मधल्या जागेत बॉम्बस्फोट झाला होता. थोडंसं नुकसानही झालं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंसह प्रमोद महाजन आदी मला बळ देऊन गेले. त्यावेळी सुशीलजी बाहेरगावी होते. पण मुंबईत परतल्यावर ते वेळात वेळ काढून भेटायला आले. आमची विचारपूस केली. धीर दिला.

‘मिडटाउन प्रीतम’चं बांधकाम पूर्ण झालं. एक ऑगस्ट हा उद्घाटनाचा दिवस निश्चित केला. सुशीलजी उद्घाटनाला येतील याची खात्री होतीच. पण मुख्यमंत्र्यांनी यावं म्हणून त्यांना आणि इतरांना निमंत्रण देण्यासाठी मी विधानभवनात सुशीलजींकडे गेलो. त्यांना भेटलो व म्हटलं- ‘‘एक ऑगस्टला ‘मिडटाउन प्रीतम’चं उद्घाटन आहे. तुम्ही यायला हवं. मुख्यमंत्रीही आले पाहिजेत.’’

सुशीलजी लगेच म्हणाले, ‘‘मी तर येणारच, पण आपण आत्ताच मुख्यमंत्र्यांकडे जाऊ या.’’ मुख्यमंत्र्यांनी येण्याचं मान्य केलं. मी त्यांना विनंती केली.. ‘‘सुशीलजी, मंत्रालयात सगळे आपले स्नेही, परिचित आहेत. त्यांना बोलावलं पाहिजे.’’ स्वत: सुशीलजी माझ्याबरोबर प्रत्येकाकडे आले. सर्वच जण ‘प्रीतम’मध्ये या ना त्या निमित्ताने आले होते. सुशीलजींमुळे उद्घाटनाला आठ मंत्री आले. असं कधीच घडत नाही. एक मंत्री येताना मारामार! पण आमच्याकडे रामानंद सागर, बी. आर. चोप्रा यांच्याबरोबर हेही सगळे आले. उद्घाटनाच्या दिवशी सकाळी सकाळी सुशीलजींचा फोन आला- ‘‘दोन ऑगस्टला पंतप्रधान राजीव गांधींनी काही महत्त्वाच्या बठकीसाठी त्यांना व विलासराव देशमुखांना बोलावलं आहे.’’ त्यासाठी एक ऑगस्टच्या रात्री १० च्या विमानानं त्यांना दिल्लीला जावं लागणार होतं. मी काहीसा हिरमुसलो. एवढय़ा मोठय़ा सोहळ्याला ही घरातली दोन माणसं नाहीत.. असं कसं चालेल? मी तसं बोलूनही दाखवलं. पण काम ते काम. त्याला पर्याय नाही. पण बरोब्बर साडेचार वाजता सुशीलजी आणि विलासराव दोघंही नव्या ‘प्रीतम’मध्ये आले. वास्तू नीट पाहिली. माझ्या कार्यालयात तासभर बसले. चहापाणी घेतलं व निघताना म्हणाले, ‘‘कुलवंतजी, आज जर आम्ही इथं आलो नसतो तर कायमची मनाला टोचणी लागून राहिली असती.’’ आपल्या मित्राच्या आवाजातला किंचितसा बदलही त्यांना हळवा करायला पुरेसा ठरला होता.

काँग्रेसने सुशीलजींवर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या व त्या त्यांनी दक्षपणे सांभाळल्या. त्या सांभाळताना त्यांनी दोस्तीही निभावली. माझ्यावर त्यांचं जरा जास्तच प्रेम! कोणतीही अडचण आली की मी त्यांच्याकडे धावायचो व अडचणीतून सोडवणाऱ्या श्रीकृष्णाप्रमाणे ते मला त्यातून सोडवायचे. एकदा आमच्या गुरू नानक हॉस्पिटलमध्ये परदेशातील शंभरएक भारतीयांचे एक प्रतिनिधी मंडळ येणार होतं. मी गुरू नानक हॉस्पिटलबरोबरच इंटरनॅशनल पंजाबी असोसिएशनचाही अध्यक्ष होतो. या भेटीनिमित्त एक कार्यक्रम करण्याचं आम्ही ठरवलं. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील येणार होते. पण अचानक त्यांना पुण्याला जावं लागणार होतं. त्यांनी रात्री नऊ वाजता मला फोन करून तसं कळवलं. माझी पंचाईत झाली. आता काय करावं, असा प्रश्न पडला. मला माझा श्रीकृष्ण आठवला. मी सुशीलजींना फोन लावला. त्यांना कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं व दादा येऊ शकणार नाहीत, हेही सांगितलं. ते म्हणाले, ‘‘मलाही तिथं जावं लागणार होतं. पण मी जात नाहीये.’’ मी मनातल्या मनात आनंदानं टाळी वाजवली व त्यांना म्हणालो, ‘‘अच्छा हुआ. मग उद्या तुम्हीच पाहुणे म्हणून या ना!’’ ते पटकन् म्हणाले, ‘‘अरे, वा रे वा! दोस्त आहे म्हणून काय असं अचानक बोलावता काय? मी मंत्री आहे! असा वेळ कसा काढता येईल?’’ मी एकदम दचकलोच! सुशीलजी आणि असं म्हणताहेत? तेवढय़ात पलीकडून दिलखुलास हास्य ऐकू आलं. ‘‘कुलवंतजी, तुम्ही सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं कधी झालंय का? सांगा, किती वाजता येऊ? मी अर्धा तास देऊ शकेन.’’  आणि सुशीलजी दुसऱ्या दिवशी सकाळी दिलेल्या वेळेवर बरोबर अकराच्या ठोक्याला हजर झाले. कार्यक्रम झकास झाला. त्यांचं भाषणही चांगलं झालं. आमचं प्रतिनिधी मंडळही आनंदी झालं. अशी आनंदी माणसं आनंदाचाच परिमळ देत राहतात.

सुशीलजी नंतर मुख्यमंत्री झाले. खासदार झाले. केंद्रीय मंत्री झाले. राज्यपाल झाले. पण त्यांच्या वृत्तीत कोणताही फरक पडला नाही. त्यांच्याकडे कायम लोकांचा राबता असे. लोक त्यांच्याकडे येत व तेही लोकांकडे जात. मला कधी कधी या राजकीय लोकांचं मोठं आश्चर्य वाटतं- की यांना हजारो लोकांची नावं, त्यांच्या गावांसह, व्यवसायांसह कशी लक्षात राहतात? बाळासाहेब ठाकरे, वेदप्रकाशजी गोयल, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या माझ्या राजकीय क्षेत्रातील स्नेह्यंना मी विचारत असे.. ‘हे कसं जमतं?’ सुशीलजीही हसून वेळ मारून नेतात आणि म्हणतात, ‘अहो, ते लक्षात राहतं.’ आणि विषय संपवतात.

एकदा ते मला सहज म्हणाले की, ‘‘एक-दोन दिवसांत तुमच्याकडे एक बातमी येईल.’’ मी विचारलं, ‘‘काय, मुख्यमंत्री म्हणून येताय का?’’ ते फक्त हसले. बोलले काहीच नाहीत. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत त्यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून झाली. त्यांनी गोपनीयता तर पाळली; पण मित्रकर्तव्यही पार पडलं.

सुशीलजी मंत्री असताना वा मुख्यमंत्री झाल्यावरही मी त्यांच्याकडे कधी गेलो तर त्यांनी मला कधीच बाहेर थांबवलं नाही. मी थेट त्यांच्या केबिनमध्ये जात असे. अनेकदा अतिमहत्त्वाच्या व गोपनीय बठका सुरू असतानाही मला ते तिथं बसवून ठेवत, इतका त्यांचा माझ्यावर विश्वास होता. दिल्लीत प्रोटोकॉल थोडा अधिक सांभाळावा लागे. पण दिल्लीत त्यांच्याकडे मी जाणार असेन त्यावेळी ते एखाद्या सचिवाला बाहेर पाठवत असत. भारत सरकारचे गृहमंत्री होते ते! संपूर्ण देशाच्या सुरक्षेचं ओझं डोक्यावर असूनही ते तणावपूर्ण चेहऱ्याने कधीही वावरत नसत. प्रशासनावरची त्यांची पक्की पकड हे त्याचं कारण होतं. गरिबीशी झुंज देत ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन मोठे झाल्याने त्यांना देशातल्या सर्व प्रश्नांची चांगलीच जाण होती.

एकदा आमच्या एका स्नेह्यच्या मुलीचं दिल्लीत लग्न होतं. मी मुंबईहून गेलो होतो. केंद्रीय गृहमंत्री असलेले सुशीलजीही लग्नाला आले होते. वरात यायला वेळ होता. आम्हाला थोडं थांबावं लागलं. सुशीलजी मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, मला सोडून जाऊ नका कुठे. मी इथं कुठल्या पट्टसिंगला ओळखत नाही. थांबून राहा.’’ वरात येईस्तोवर भारताचे गृहमंत्री मित्रप्रेमासाठी तिथे थांबले.

पुण्यात गोपीनाथ मुंडेजींच्या प्रीतमचं लग्न होतं. मी तिचा मामाच! सर्व वऱ्हाडी जमत गेले. सुशीलजीही लग्नाला आले होते. गोपीनाथजी मला म्हणाले, ‘‘आमच्या वतीनं सुशीलकुमारजींकडे लक्ष द्याल का?’’ जैन म्हणून एक उद्योगपती, मी व सुशीलजी अशी एक छोटी मफल जमली. छान गप्पा झाल्या. लग्न लागलं. वधू-वरांना आशीर्वाद देऊन ते गेले.

ते जेव्हा केव्हा येतात, भेटतात तेव्हा पहाटवाऱ्याची एक हळुवार झुळूक येऊन जाते. आणि जातात तेव्हा पौर्णिमेच्या चांदण्याची शीतलता मागे सोडून जातात. या शीतलतादायी स्नेह्यला आयुष्यातील ९२५ व्या पौर्णिमेनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. आणि येणाऱ्या किमान २७६ पौर्णिमांचं स्वागत करण्याचं बळ त्यांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

ksk@pritamhotels.com

* शब्दांकन : नीतिन आरेकर