केळवा-माहीम परिसरातील रहिवाशांची नाराजी पालघर : केळवा-माहीम परिसरातील बीएसएनलचे दूरध्वनी गेल्या दीड वर्षांपासून बंद असतानाही येथील ग्राहकांना व्याजासह देयक भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. आतपर्यंतची थकबाकी आणि त्यावर १८ टक्के व्याज आकारून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. बंद असलेली दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यासाठी एकीकडे ग्राहक प्रयत्न करत असतानाच त्यांना अशा प्रकारे नोटीस बजावण्यात आल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालघर तालुक्यात अनेक भागात व विशेषत: ग्रामीण भागात बीएसएनएल दूरध्वनी सेवेचा वापर केला जातो. मात्र गेल्या वर्षभरापासून या सेवेत वारंवार खंड होत असे. २०१८ मध्ये मार्च ते जुलै या कालावधीत केळवा-माहीम भागातील अधिकतर दूरध्वनी सेवा बंद होती. याबाबत स्थानिक पातळीवर अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. तसेच बंद असलेल्या दूरध्वनी सेवेचे देयक ग्राहकांना बीएसएनएलने भरणे भाग पाडले होते. मात्र देयक भरूनही वारंवार दूरध्वनी सेवा खंडित होत असल्याने अनेक ग्राहकांनी बीएसएनएलचे कल्याण परिमंडळाचे मुख्य व्यवस्थापक हरिओम सोलंकी यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. याची दखल घेत पंधरा ते वीस दिवसांनी दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र एक-दोन महिन्यातच ही दूरध्वनी सेवा पुन्हा बंद पडली. आपल्या दूरध्वनीवरून एकही कॉल करणे शक्य झाले नसताना बंद असलेल्या दूरध्वनीचे देयक आम्ही का भरावे, असा सवाल दूरध्वनी ग्राहक उपस्थित करत आहेत. मात्र ग्राहकांना न जुमानता बीएसएनएलने काही ग्राहकांना वकिलांमार्फत नोटीस पाठवून बंद असलेल्या दूरध्वनी सेवेचे देयक तसेच बीएसएनएलतर्फे पाठवण्यात आलेल्या नोटीसचे पैसे भरण्याचा तगादा लावला आहे. हे पैसे न भरल्यास ग्राहकांवर न्यायालयात दावा दाखल करून वार्षिक १८ टक्के दर वकील फी लावून संपूर्ण रक्कम वसूल करावी लागेल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीस मागे घेण्याची मागणी एकीकडे फोन सेवा बंद असताना बीएसएनएल देयके भरण्याचा दबाव टाकत आहे. दूरध्वनी सेवा बंद असताना आकारण्यात आलेल्या देयकांची रक्कम पूर्णपणे वगळण्याचे तसेच बजावलेली नोटीस मागे घेण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.