तालिबानच्या मुद्द्यावरून जगभरात राजकारण तापत आहे. देशातही सध्या या मुद्द्यावरून विविध प्रतिक्रिया येत असून त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नुकतंच लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी यावर मत मांडलं आहे. मात्र, यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. एनडी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी एक खळबळजनक विधानं केलं आहे. ते म्हणाले कि, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे आहेत.” दरम्यान, यावरून आता टीका-टिपण्ण्याचं सत्र सुरु झालेलं असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील हे आज (४ सप्टेंबर) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “जावेद अख्तर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुराष्ट्र कळलेलंच नाही.”दरम्यान, आपल्या मुलाखतीदरम्यान जावेद अख्तर म्हणाले होते कि “जगभरतील उजव्या विचारसरणीच्या लोकांना हेच हवं आहे. ज्याप्रमाणे तालिबानला इस्लामिक राज्य हवे आहे, त्याचप्रमाणे इथे अनेकांना हिदू राष्ट्र हवं आहे. हे सर्व एकाच विचारसणीचे आहेत. मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असो.”

तालिबानी रानटी तर RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे अशाच मानसिकतेचे – जावेद अख्तर

काय म्हणाले जावेद अख्तर?

जावेद अख्तर असं देखील म्हणाले होते कि, “मला त्यांची वक्तव्य लक्षात नाही मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचं त्यांनी समर्थन केलंय. पण समर्थन करणारे हे देशातील काही मोजकेच मुसलमान आहेत. मी ज्या अनेक मुस्लीमांशी बोललो त्यांना समर्थन करणाऱ्यांची वक्तव्य ऐकून धक्काच बसला.” यापुढे बोलताना ते म्हणाले कि, ”निश्चितच तालिबानी रानटी आहेत मात्र जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देत आहेत ते देखील अशाच मानसिकतेचे आहेत.”

हिंमत असेल तर अफगाणिस्तानला जा आणि…; भाजपा आमदाराचे जावेद अख्तर यांना आव्हान

भारत कधी तालिबानी देश बनू शकत नाही!

हा देश मुळात धर्मनिरपेक्ष देश आहे. इथली बहुसंख्य लोकसंख्या धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे तालिबान्यांच्या विचारसणीचा भारतीयांवर प्रभाव पडणार नाही. भारत कधीही तालिबानी देश बनू शकत नाही असं जावेद अख्तर म्हणाले आहेत. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे तालिबानने अफगाणिस्तानमध्ये एका आठवड्यामध्ये उद्रेक करत सत्ता मिळवली ते पाहता हे पूर्व नियोजित असल्यासारखं वाटतंय. अमेरिका सरकार आणि तालिबान यांचा डाव असल्याचं हे वाटत आहे.” असं ही ते म्हणाले.