चंद्रकांत पाटील यांची टीका राज्यात शिवसेनेची ताकद कमी झाल्याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाल्यानेच त्यांनी हार्दिक पटेलला सोबत घेतले, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी जळगाव येथे केली. भाजपच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा वचननामा पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. यावेळी पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा निष्कर्ष समोर आल्याने शिवसेना सैरभैर झाल्याचे नमूद केले. यामुळेच त्यांना हार्दिकचा आधार घ्यावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निपटण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेने हार्दिक पटेलला का बोलवले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेवरून केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पवार आता काहीही वक्तव्य करायला लागले आहेत. त्यांचे दावे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ‘स्मार्ट व्हिलेज’वर लक्ष केंद्रित करण्यात येत असून ग्रामीण भागाला केंद्रबिंदू मानून विकासाच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दुर्गम खेडय़ाचा विकास तसेच सर्वाना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, आ. सुरेश भोळे, आ. चंदुलाल पटेल, किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते.