दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती तसेच या दंगलीचा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपाने रचला होता, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरपूर येथे राष्ट्रसंत सेना महाराज यांच्या ८३० व्या जयंतीनिमित्त नाभिक समाजाच्या पहिल्या अधिवेशनात ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, “दिल्लीतील दंगल पूर्वनियोजित होती त्यामुळे अशा दंगली पुन्हा झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण, एका अहवालानुसार, २५ लाख सैनिकांच्या गणवेशांची विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.”

सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीबाबत अपुरी माहिती असल्याने राज्यातील नेते वायफळ बडबड करीत असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले. हे प्रश्न केंद्राचे आहेत त्यात राज्ये काही करु शकत नाहीत, अशी विधान करणाऱ्या या मंत्र्यांना या प्रश्नांच गांभीर्यच नाही. सत्तेविना राहू न शकणाऱ्या या मंडळींना ही गावरान सत्ता असल्याचे वाटत आहे, अशा शब्दांत त्यांनी सीएए, एनआरसीचे समर्थन करणाऱ्या मंत्र्यांना टोला लगावला.

दरम्यान, या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर बाहेरुन आलेल्या नागरिकांना इथून हाकलून लावल्यानंतर त्यांची मालमत्ता इतर मागास वर्गीयांमध्ये वाटून देण्यात येणार असल्याची आमिषही दाखवण्यात येत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. या कायद्याच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी या समाजातील जातींचे मेळावे आणि बैठकाही सुरु झाल्याचे ते म्हणाले.

सोलापूरात पोटनिवडणूक होणार नाही

सिद्धेश्वर स्वामी यांच्या खोट्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांची खासदारकी अडचणीत आल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. कारण, सिद्धेश्वर स्वामी यांची पाच वर्षे न्यायालयीन लाढाईतच जातील असे आंबेडकर म्हणाले.