३ लाखांचे कर्ज डोंगर वाटल्याने आणि नापिकी त्यातून येणारी निराशा या सगळ्याला कंटाळून यवतमाळच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आपल्या सुसाइड नोटमध्ये या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले आहे. शंकर भाऊराव चायरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते घाटंजी तालुक्यातील राजूरवाडीचे रहिवासी होते. सहा पानी सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव लिहून शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवले आहे. शंकर चायरे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून ते वाचले. त्यानंतर विष प्राशन करून त्यांनी आपले आयुष्य संपवले यातच त्यांचा मृत्यू झाला.

शंकर भाऊराव चायरे यांची सहा एकर शेती होती. त्यांनी यावर्षी कापूस आणि तूर याची लागवड केली होती. मात्र बोंड अळीने त्यांचे सगळे पिक उद्धवस्त केले. त्याआधी २०१६-१७ या वर्षातही त्यांच्यावर ८० हजारांचे कर्ज होते. या सगळ्यातून आलेल्या निराशेतून आणि हतबलतेतून शंकर चायरे यांनी त्यांचे आयुष्य संपवले.

काय लिहिले आहे पत्रात?
शेतकरी शंकर चायरे यांनी लिहिलेल्या पत्रात, मी कर्जबाजारी झालो त्यामुळे आत्महत्या करतो आहे, या आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे. माझ्या मुलांकडे आणि घरातल्यांकडे लक्ष ठेवा, असे चायरे यांनी म्हटले आहे. चायरे यांच्यामागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब आहे.