जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन प्रकल्पाच्या थकीत वीजबिलासाठी राज्य शासनाने टंचाई निधीतून १० कोटी उपलब्ध करून दिल्याने येत्या दोन दिवसांत या योजना सुरू करण्यात येणार असल्याचे आ. सुरेश खाडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. म्हैसाळ योजनेंतर्गत डोंगरवाडी योजनेचे उद्घाटन शनिवार दि. १४ मार्च रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मिरज तालुक्यातील पाणीपातळी खालावली असून तलाव कोरडे पडले आहेत. शेतकऱ्यांकडून म्हैसाळ योजना सुरू करण्याची आग्रही मागणी होत आहे. तथापि, म्हैसाळ योजनेचे वीजबिल थकीत असल्याने पाणी योजना सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. म्हैसाळ योजनेचे सुमारे साडेसहा कोटीचे वीजबिल थकीत असून, हे बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यास वीज वितरण कंपनीने असमर्थता दर्शवली आहे.गतवर्षी या योजनेचे वीजबिल टंचाई निधीतून देण्याचे मान्य करण्यात आल्याने शासनाकडून निधी उपलब्ध होणे गरजेचे होते. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर टंचाई निधीतील थकीत रक्कम देण्यास शासनाने सहमती दर्शवली असून, १० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हे पसे वीज वितरण कंपनीला देऊन वीजपुरवठा सुरू करण्यात येणार असून त्यानंतर म्हैसाळ योजनेचे पंप सुरू करण्यात येणार आहेत.म्हैसाळ योजनेंतर्गत डोंगरवाडी योजना नव्याने कार्यान्वित करण्यात येत असून, या योजनेचे उद्घाटन १४ मार्च रोजी जलसंपदामंत्री महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. संजयकाका पाटील उपस्थित राहणार असल्याचे आ. खाडे यांनी सांगितले.