राज्यातील करोना परिस्थिती अजूनही चिंताजनक अशी आहे. मुंबईसह राज्यातील काही शहरात आढळून येणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारची भूमिका मांडली होती. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. टीव्ही ९ ने हे वृत्त दिलं आहे.

राज्यातील लॉकडाउन अजूनही पूर्णपणे शिथिल करण्यात आलेला नाही. काही शहरात करोना प्रसार अजूनही थांबलेला नसल्यानं लॉकडाउन लागू केलेला आहे. त्यामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही नकारात्मक भूमिका मांडली आहे. मुलाखतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडाउन न वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

“उद्धव ठाकरे, यांना विनंती… खुदा होऊ नका. करोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. मी सुद्धा त्यावेळी घाबरलो होतो. ४० टक्के लोक बाधित होतील, असं अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीनं म्हटलं होतं. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितलं की भारतात करोना व्हायरस पसरु शकणार नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली आहे. ऑस्ट्रेलिया जिंकत आहे, असं दिसतंय” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं.

“कोरोना मृत्यूदर आज दोन टक्के किंवा त्याच्या थोडावर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण निश्चित. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावं. तरच माणसं जगतील, नाहीतर उपासमारीनं माणसं मरतील, अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, लॉकडाऊन आपण वाढवू नका” असा सल्ला आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला.