नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाच्या जबर धक्क्याच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासन दक्ष असून, आपत्ग्रस्त भागाशी व नेपाळशी प्रोटोकॉलनुसार संपर्क साधला जात आहे. या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांबरोबरच भारतीय पर्यटकांसंदर्भात माहिती देण्याचे आपण आवाहन करीत असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिक्षण क्षेत्राबद्दल ते म्हणाले, शिक्षण हे केवळ पदव्यांपुरते मर्यादित न राहता सामाजिक विषमता नष्ट करणारी अन् ज्ञानसंपन्न समाज घडवणारी चळवळ ठरली पाहिजे असे फडणवीस यांनी नमूद केले. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निधीतून होणारी कामे रखडली असल्याबाबत त्यांना विचारले असता, ही कामे पूर्ण झाली पाहिजेत. पण ती थांबली असल्यास त्याबाबतची माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.