मुख्यमंत्र्यांच्या महा जनादेश यात्रेचे रविवारी सातारा येथे आगमन होण्याअगोदर, त्यांच्या वाहन ताफ्याच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या होत्या. शिवाय अनेक ठिकाणच्या वीज तारा देखील काढण्यात आल्याने संबंधित परिसरातील वीजपुरवठा पाच ते सहा तास खंडित होता. इतरवेळी नेहमी आंदोलनाच्या पवित्र्यात असणारे पर्यावरणवादी मात्र झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असताना गायब झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा रविवारी दुपारी सातारा जिल्ह्यात आली. या अगोदर पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या सुरूर महाबळेश्वर, वाई शहर, वाई पाचवड व सातारा शहर रस्त्यावरील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडसर ठरणाऱ्या १८ फुटांवरील झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्या. यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला होता. महाजनादेश यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या विशेष वाहनाची उंची २२ फूट असल्याने या मार्गावरील वाहन मार्गात अडचणीच्या ठरणाऱ्या वीजवाहक तारा देखील या काळात काढण्यात आल्या होत्या. परिणामी संबंधित परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.

अनेकदा वृक्ष तोडीच्या मुद्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळणारे पर्यावरणवादी मात्र याप्रसंगी गायब असल्याचे दिसले. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गात येणाऱ्या अनेक झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याने व यासाठी सरकारी यंत्रणेने पुढाकार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.