राज्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठीकीमध्ये घेण्यात आला आहे. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.

हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्याची राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता, यंदा ते नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ७ डिसेंबर २०२० रोजी अधिवेशन घेता येईल का? किती दिवस घ्यायचे? याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.

या बैठकीस विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या अगोदर ‘करोनाच्या वातावरणात मुंबईतून आणि राज्यातून हजारो लोक अधिवेशनासाठी नागपूरला येणे धोक्याचे आहे’, असा सूर नागपुरमध्ये उमटत असल्याचे काही मंत्र्यांनी सांगितले होते. अधिवेशनासाठी कागदपत्रे, मनुष्यबळ नागपूरला हलवणे आणि तेथे येणाऱ्या अभ्यागतांची मोठी संख्या याचा ताण नागपूरवर पडू शकतो. त्यामुळे अधिवेशन मुंबईतच घ्यायचे की नागपूरला यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत लवकर निर्णय घ्यावा असे ठरले होते.