आंबोली घाटात दरड कोसळण्याच्या भीतीने पावसाळी पर्यटनावर भीतीचे सावट कायम आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेते व पर्यटन व्यावसायिकांना यंदाचा हंगामही चिंतेतच घालविणे भाग आहे. हल्ली वरचेवर घाटात भलीमोठी दगड कोसळत असल्याने प्रशासनही दक्षता घेत आहे. दक्षिण कोकणचे प्रतिमहाबळेश्वर म्हणून आंबोलीला ओळखले जाते. आंबोळी, चौकुळ व गेळे या गावांत पावसाळी पर्यटन हंगामात पर्यटकाची जत्रा भरते. पण या पर्यटनाचे नियोजन नसल्याने स्थानिक व्यावसायिक कायमच चिंतेत असतात. आंबोलीच्या धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा फायदा पर्यटन व्यावसायिकांना मिळतोच असे नाही. पर्यटक सकाळी येतात आणि धबधब्यावर मस्ती, मौजमजा करून परत जातात. या मस्ती करणाऱ्या पर्यटकांमुळे पर्यटन व्यावसायिकांना फायदा होत नाही. उलट असे पर्यटक आपल्यासोबत सर्व प्रकारचे खाद्यान्न घेऊन येतात.
आंबोली धबधब्याजवळ असणाऱ्या स्टॉलवर गर्दी असते. त्या ठिकाणी काही प्रमाणात फायदा होतो. पण दरडीची भीती या व्यावसायिकासमोर कायम आहे. दरडीचे दगड पडत असल्याने पर्यटनावर परिणाम होत असल्याचे वनखात्याच्या जंगलात ब्रिटिशकालीन गटर्स आहेत. हे गटर्स साफ केले नसल्याने पाणी दरडीत घुसते. त्याशिवाय माकडाच्या हालचालीमुळे सैल झालेले दगड खाली कोसळतात असे सांगण्यात येते. सार्वजनिक बांधकाम व वनखात्याने समन्वय साधून गटर्स साफ करून किमान घाटाची सुरक्षितता राखली पाहिजे, असे सांगण्यात येते. आंबोलीत दरड कोसळण्याची पर्यटन व्यावसायिकांच्या मनात भीती कायम आहे. गेल्या काही वर्षांत पर्यायी रस्त्याचा पुढाऱ्यांच्या गोल थापांनी लोकांत नाराजी आहे. आंबोली, चौकुळ व गेले पर्यटनाचे नियोजनशून्य पायाभूत सुविधांची कमतरताही भासत आहे. आंबोलीमध्ये पावसाळी हंगामात पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. या पर्यटकांमुळे पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत करतानाच स्थानिकांना त्याचा कसा फायदा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आंबोलीचे थंड हवेचे पर्यटनाचे नियोजन अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यासाठी राजकीय गोल थापा आता पुरे झाल्या असे लोक म्हणतात.