सोलापूर : शहरातील इंग्रजी शाळांचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांनी शिक्षण घेणे हा सामाजिक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. परंतु, यातून ग्रामीण भागातील अनेक पिढ्यांची नाळ जोडलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या हळूहळू घटत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन जी मुले गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतील, त्यांच्या पालकांना घरपट्टी माफ करण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. त्याची चर्चा जिल्ह्यातील ग्रामीण भागात होत आहे.
शिक्षणाचा प्रसार बहुजन समाजात होण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे मोठे योगदान राहिले आहे. गोरगरीब, कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांसह सर्व जातीधर्माच्या मुला-मुलींच्या अनेक पिढ्या याच जिल्हा परिषद शाळांमध्ये घडल्या आहेत. परंतु, अलीकडे शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचे वारे वाहू लागले आणि इंग्रजी शाळांचे स्तोम माजले आहे. तालुका पातळीवरील राजकीय नेत्यांनी गावात पारंपरिक मराठी शाळांऐवजी आधुनिक इंग्रजी शाळा सुरू केल्या आहेत. अशा शाळांमध्ये पदरमोड करून आपल्या पाल्यांना दाखल करणे हे सुद्धा सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वरचेवर घडत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा चांगले दिवस यावेत आणि आपले अस्तित्व राखावे म्हणून धडपड करावी लागत आहे. या धडपडीला सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने हातभार लावत अनुकरणीय आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गावातील आपल्या मुला-मुलींना खासगी इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही शाळेत दाखल न करता जिल्हा परिषद शाळेत दाखल करणारे पालकांना त्यांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा निर्णय एका ठरावाद्वारे या ग्रामपंचायतीने घेतला आहे. यातून जिल्हा परिषद शाळांना वाचविण्याची धडपड दिसून येते. या माध्यमातून पालकांमध्येही सकारात्मक संदेश पोहोचविला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या एकूण २७७७ एवढ्या प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे एक लाख ९० हजार विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
अभिमानास्पद उपक्रम
जवळा ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पाल्यांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेऊन आश्वासक पाऊस उचलले आहे. हा उपक्रम स्तुत्य आणि अभिमानास्पद वाटतो.- दीपक साळुंखे-पाटील, माजी विधान परिषद सदस्य
जिल्हा परिषद शाळा वाचाव्यात
जिल्हा परिषद शाळा गोरगरीब आणि बहुजन समाजातील मुलांसाठी आधार आहेत. या शाळा ओस पडून बंद पडल्यास त्याचा मोठा फटका समाजाला बसणार आहे. हा सामाजिक चिंतनाचा विषय आहे. त्याचा विचार करून या शाळा वाचविण्यासाठी आणि या शाळांमध्ये मुले शिकण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आपल्या ग्रामपंचायतीने पालकांना घरपट्टी माफीचा निर्णय घेतला आहे. त्याचे अनुकरण इतर ग्रामपंचायतींनी करावे, अशी अपेक्षा आहे.- सज्जन गावडे, सरपंच, जवळा ग्रामपंचायत