१ ऑगस्ट २०२१ च्या दिवशी आम्ही बीडीडीचं काम सुरु केलं होतं. महाविकास आघाडीने तो निर्णय घेतला होता. आम्ही प्रत्येक महिन्याला या कामाची पाहणी करतो. पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. ज्यांना पहिल्या टप्प्यात लॉटरी लागली आहे त्यांना डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान घरं मिळतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. ही आमची वचनपूर्ती आहे. अनेक राजकीय पक्षांनी यामध्ये अडचणी आणायचा प्रयत्न केला असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला, तसंच त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“जे घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात आहे, त्यांनी बीडीडीच्या कामाचा वेग करण्याचा प्रयत्न करु नये. इथले लोक हे चांगल्या घरांच्या अपेक्षेत आहेत. वरळीत चांगली घरं तयार होत आहेत. कमीत कमी लोक ट्रान्झिट कँपमध्ये आहेत. ना.म. जोशी मार्गावरही काही गोष्टी पूर्ण होत आहेत. आम्ही पाठपुरावा करतो आहोत.” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
हे पण वाचा- इंडिया आघाडीला सत्ता मिळत नाही या वास्तवाचं भान दाखवणारी आदित्य ठाकरेंची पोस्ट, म्हणाले…
कोस्टल रोड आणि भाजपाचा काही संबंध नाही
कोस्टल रोड आणि भाजपाचा काहीही संबंध नाही. आता दर ५०० मीटरच्या उद्घाटनाला घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जातात ही मोठी गंमत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१७ या त्यांच्या कालावधीत कोस्टल रोडला संमती देण्यास उशीर केला. कोस्टल रोडचं काम आमचं आहे. भाजपाचा काही संबंधच नाही. कोस्टल रोड सकाळी ८ ते संध्याकाळी ५ असा सुरु केला होता. मग दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं काम चाललं आहे. आज महाविकास आघाडीचं सरकार असतं तर डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोडचं पूर्ण काम झालं असतं.
मुंबई, पुण्यात पावसाळ्याच्या आधीचं नियोजन नाही
मुंबई, पुणे या ठिकाणी कुठेही पावसाळ्याच्या आधीचं नियोजन करण्यात आलेलं नाही. दोन वर्षांपासून हेच चाललं आहे. मुंबईत २४ वॉर्ड्स आहेत त्यापैकी १५ वॉर्ड्स वॉर्ड ऑफिसर नाहीत. हिंदमाता परिसरात रेन वॉटर होल्डिंग टँक केला होता त्याचे पंप सुरु होते का? पावसाळ्यापूर्वीच्या बैठका घेतल्या गेल्या नाहीत. अनेक ठिकाणी कामं बाकी आहेत. रस्त्यांची कामं बाकी आहेत. अशा परिस्थितीत वॉर्ड ऑफिसर नाहीत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
ज्यांनी दिली साथ त्यांचा करतो घात, हे भाजपाचं ब्रीदवाक्य
ज्यांनी दिली आम्हाला साथ त्यांचा करतो आम्ही घात हे भाजपाचं ब्रीदवाक्य आहे. भाजपाशी जे मैत्री करतात त्यांना जे जवळचे असतात, त्यांचाच घात भाजपाकडून केला जातो. आम्ही तसे नाही. रघुकुल रित सदा चली आये, प्राण जाये पर वचन न जाए हे आमचं म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं ब्रीद आहे. त्यांनी ४०० पारचा दावा केला होता त्यांना देशाने २४० जागांवर आणलं आहे. आता कुणी काय मागणी करतं त्यांना जनता उत्तर देईल असं म्हणत त्यांनी ८० जागांची मागणी करणाऱ्या अजित पवारांनाही टोला लगावला आहे.