नागपूर लोकसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपाच्या नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसने विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. धडाकेबाज नेता अशी नागपुरात ओळख असलेल्या विकास ठाकरे यांचा जनसंपर्कही तगडा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता बराच चर्चेत राहू शकतो. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे हा मतदारसंघ व्हीआयपी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यावर विकास ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एएनआयशी बोलत होते.

विकास ठाकरे म्हणाले, “काँग्रेसने माझ्यावर विश्वास दाखवला हे मी माझं भाग्य समजतो. कोणतीच जागा व्हीआयपी नसते. कोणत्या निवडणुकीत आव्हान नसतं. ही त्या-त्या वेळेची गोष्ट असते. मतदार कोणाला मतदान करणार आहे हे सांगत नाही. नाहीतर १३ वेळा येथे काँग्रेस जिंकून आली नसती”, असंही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> गडकरींच्या विरोधात लढणारे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आहेत तरी कोण?

“आता विकासाच्या मुद्द्यावर प्रचार सुरू होईल, चर्चा सुरू होईल. लोकसभेची निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे. ही देशभरात निवडणूक सुरू आहे. नागपूर शहरातील जनता कोणत्या विचारधारेची आहे हे माहितेय”, असंही विकास ठाकरे म्हणाले.

ठाकरे आणि बर्वे २६ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे आणि रश्मी बर्वे यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. २६ मार्च रोजी उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. नामांकनापूर्वी दोन्ही उमेदवार संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढणार आहेत.

विकास ठाकरे यांची पार्श्वभूमी काय?

२००२ मध्ये नगरसेवक, त्याचवर्षी महापौर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते, त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्षपद, २०१९ मध्ये पश्चिम नागपूरमधून आमदार असा विकास ठाकरे यांचा आजवरचा राजकीय प्रवास आहे. अत्यंत धाडसी, धडाकेबाज नेता अशी काँग्रेस व इतर पक्षात त्यांची ओळख आहेत माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते विलासराव मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक ही त्यांची दुसरी ओळख. समाजातील सर्व घटकांमध्ये वावर, समर्थक, मदतीला धावून जाण्याची वृत्ती आणि अरे ला कारे ने उत्तर देण्याचा स्वभाव यामुळे संपूर्ण नागपुरात त्यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नागपुरातील लोकसभा निवडणूक प्रचाराची मुख सुत्रे ठाकरे हेच सांभाळत असत. त्यामुळे ते प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवणार असले तरी ती कशी लढवायची याचा अनुभव यांना आहे.