अहिल्यानगर : गेल्या सुमारे आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीने जिल्ह्याचा दक्षिण भाग बेजार झाला आहे. गेल्या चोवीस तासांत पुन्हा ३५ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे दक्षिण भागात केंद्रीय व राज्य बचाव पथके (एनडीआरएफ व एसडीआरएफ ) तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, रात्रीच्या पावसाने ४१ घरांची पडझड झाली तर १४ पशूधन मृत्युमुखी पडले. शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी तालुक्यातील पुरामध्ये अडकलेल्या सुमारे ५०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाली.

दरम्यान ठिकठिकाणच्या नद्या, ओढे-नाल्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले व तलाव फुटले आहेत. शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत. धरणे ओसंडून वाहत असल्याने नदीपात्रातील विसर्गही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने उद्या बुधवारी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफचे पथक कर्जतमध्ये तर एसडीआरएफचे पथक पाथर्डीत रात्रीपासूनच तैनात करण्यात आले आहे.

या पथकांनी जामखेडमधील तरडगाव, कर्जतमधील निंबोडी, मलठण, सीतपूर, शेवगावमधील आखेगाव, भगूर, खरडगाव आदी परिसरात पुरात अडकलेल्या सुमारे ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. रात्रीच्या पावसाने जामखेडमधील २०, राहुरीतील ६, नगर ४, नेवासा ५, संगमनेर १, कर्जत ५ अशा एकूण ४१ घरांची पडझड झाली तसेच जामखेड ४ राहुरी २, संगमनेर ६, नगर २ अशा एकूण १४ शेळ्या भिंत पडून दगावल्या आहेत.

सलाबतपूरमध्ये चोवीस तासांत ६ इंच अतिवृष्टी झालेली मंडले पुढीलप्रमाणे (आकडे मिमी.) : नेवासा- सलाबतपूर १५०.३, कुकाना ८३.८. पाथर्डी- अकोले १०७.५, खरवंडी १३१, तिसगाव ७५, मिरी ७६.५, करंजी ६६.५, कोरडगाव १०७.५, टाकळी १३१, माणिकदौंडी ६५.३. पाथर्डी ६५.३. शेवगाव- शेवगाव १३१.३, भातकुडगाव ८३.८. बोधेगाव १४८.८, चापडगाव २४८.८ ढोर जळगाव ११२.८, दहिगावने ११२.८, मुंगी १४२.८. जामखेड- आरणगाव ११५.३, खर्डा ७६.८, नान्नज ८५.८, नायगाव ९४.३. पाटोदा ८५.८, साकत ९४.३. कर्जत- कोंभळी ७६.५, मिरजगाव १०१.३, माही जळगाव ८८. श्रीगोंदा- मांडवगण ६८.३. पारनेर- भाळवणी ६९.८. नगर- सावेडी ८४, केडगाव ७०.५, वाळकी ६९.३, नेप्ती ७०.८ व रूईछत्तीशी ६७.८ मिमी.