कर्जत : ज्येष्ठ नागरिकांची सरकारी कार्यालयातून होणारी अडवणूक तसेच विविध मागण्यांसाठी कर्जतच्या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ व वृद्ध भूमिहीन शेतमजूर महिला संघटनेने आक्रोश मोर्चा काढत एसटी बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बस रोखून धरल्या. तहसीलदार गुरू बिराजदार यांनी ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक होणार नाही, प्रलंबित प्रश्न व मागण्या तत्काळ सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
संघटनेचे पदाधिकारी शब्बीर पठाण, शशिकांत पाटील, सरपंच अशोक जायभाय, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, बाबा भैलुमे, सय्यद मापवाले, जयसिंग निंभोरे, अरुण नेवसे, प्रमोद महामुनी, राजू शेख, जनाबाई कचरे, शोभा पवार, छाया पडळकर, छाया कांबळे, हरिभाऊ कोकाटे, हनीफ शेख, शेरखान पठाण, अंबादास कांबळे, रज्जाक पठाण, शाहिदास झारेकरी, रंजना साळवे, रंजना राऊत, दादा वाघमारे, दत्ता तनपुरे यांच्यासह वृद्ध नागरिक व महिला आंदोलनात सहभागी झाले होते. प्रहार, वंचित बहुजन आघाडी यासह विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
कर्जत बाजारतळ येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा बस स्थानकावर नेण्यात आला, नंतर तहसील कार्यालयासमोरील आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शशिकांत पाटील म्हणाले, एसटी आगार मंजूर आहे, कामही झाले आहे मात्र आगार सुरू करण्यात येत नाही. बसस्थानक परिसरात सिमेंट काँक्रीट नसल्यामुळे अनेक मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वृद्धांना त्रास होत आहे.
निराधारांच्या विविध अनुदानाच्या योजना बंद करू नयेत. त्यांना हयातीच्या दाखल्यासाठी उत्पन्न दाखल्याची अट घालू नये. लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यासाठी दरमहा तहसील कार्यालयात बैठक घ्यावी व विनाकारण अडवणूक करू नये. तहसील कार्यालयात अडवणूक होते. दलालांमार्फत कामे केली जातात. सेतू कार्यालयात दाखल्यासाठी जास्त पैसे घेतले जातात.