Raj and Uddhav Thackeray Parties Alliance : मागील काही दिवसांपासून राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेबरोबर (ठाकरे) एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या. त्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांना अनुकूल प्रतिसाद दिला. आता यावर दोन्ही पक्षांचे नेते प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) विधान परिषद सदस्य अंबादास दानवे व मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज (७ जून) जालना जिल्ह्यातील बदनापूर, अंबड, परतूर, घनसावंगी आणि मंठ्याच्या दौऱ्यावर असून ‘क्या हुआ तेरा वादा?’ या आंदोलनाअंतर्गत ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा होत असलेला प्रश्न दानवे यांना यावेळी विचारण्यात आला. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतील का? या प्रश्नावर दानवे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा आम्हाला आनंदच होईल. ते दोघे एकत्र येण्याची आमचीही इच्छा आहे”.

दरम्यान, सरकारविरोधातील आंदोलनाबाबत दानवे म्हणाले, “सरकारने निवडणुकीआधी घोषणा फार केल्या, मात्र अंमलबजावणी शून्य आहे. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन सरकारने पाळावं, लाडकी बहीण योजना बंद झाली तर आम्ही आवाज उठवू. तसेच निवडणुकीआधी जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना सरकारने दर महिन्याला २१०० रुपये द्यावे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे – शिवसेना (ठाकरे) युतीबाबत बाळा नांदगावरकर काय म्हणाले?

बाळा नांदगावकर म्हणाले, “मनसे आजवर ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत राहिली आहे. आम्ही सध्याही त्याच भूमिकेत आहोत. तर, युतीचा विषय हा पक्षप्रमुखांच्या अखत्यारित आहे. त्यावर मी बोलणं उचित नाही”. दरम्यान, त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून युतीसाठी विचारणा झाली असल्याची चर्चा आहे. याबाबत मनसे काय निर्णय घेणार आहे? यावर नांदगावकर म्हणाले, “मी नेहमी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. कोणीही नकारात्मक विचार करू नये असं मला वाटतं. येत्या निवडणुकीत आमच्या पक्षाला, आमच्या कार्यकर्त्यांना काय फायदा होईल याचा विचार करावा लागेल. त्यानुसारच निर्णय घेतला जाईल. मात्र युतीबाबत मी बोलणं उचित नाही”.