नंदूरबारमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना थेट एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही पंतप्रधान मोदींच्या या प्रस्तावावर भाष्य केलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले अनिल देशमुख :

“संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहिती आहे की गेल्या दोन वर्षांपासून भाजपाकडून फोटफोडीचं राजकारण सुरू आहे. आधी त्यांनी शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आज विदर्भात दोन्ही टप्प्याचे मतदान पूर्ण झालं आहे. तिथे चमत्कार घडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर भाजपाच्या विरोधात वातावरण आहे. आज राज्यातील शेतकरी आणि तरुण नाराज आहेत. अशा परिस्थित जर नरेंद्र मोदी एनडीएत येण्याचा प्रस्ताव देत असतील, तर ते हास्यास्पद आहे. मोदींच्या या प्रस्तावाचे उत्तर महाविकास आघाडी ४ जूनच्या निकालाने देईल”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या एकत्र येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मोदींच्या प्रस्तावावर शरद पवारांनीही केलं भाष्य :

महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या या प्रस्तावावर खुद्द शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. “आज देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली गेली. केंद्र सरकारचा यात सहभाग असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही.” असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, नंदूरबारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.