विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला. महाराष्ट्राचा महानिकाल असंच या निकालाला म्हटलं गेलं. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच एकाही आमदाराला त्यांनी अपात्र ठरवलेलं नाही. यामुळे राहुल नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या केली अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून येते आहे. अशात अंजली दमानिया यांनी निकालाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन केलं पण तो लिहिला कुणी होता? असा प्रश्न अंजली दमानियांनी विचारला आहे. काय आहे अंजली दमानियांची पोस्ट? महाराष्ट्राचा महानिकाल चक्क इंग्रजीत ? कोणी ड्राफ्ट केलं? सुप्रीम कोर्टाच्या तुषार मेहतांनी ? नक्कीच कोणीतरी सुप्रीम कोर्टाचे वकील असतील. ह्यांनी फक्त वाचण्याचे काम केले. इंग्रजीत का वाचलं? कारण त्याचे मराठीत भाषांतर येत नसावे. विधान सभा अध्यक्षांना त्यातले धड शब्द पण वाचता येत नव्हतं अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे. आणखी काय म्हणाल्या अंजली दमानिया? "आपण सगळेच निकाल ऐकत होतो. टीव्ही सुरु केला आणि राहुल नार्वेकर इंग्रजीत बोलू लागले. आधी प्रस्तावना इंग्रजीत करतील आणि नंतर मराठीत बोलतील. पण निकाल इंग्रजीत वाचला त्यामुळे कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. कारण निकाल त्यांनीच लिहिला असता तर इतक्या शब्दांवर ते अडखळले नसते. महाराष्ट्राचा निकाल मग सर्वोच्च न्यायालयातल्या कुठल्या वकिलांनी लिहून दिला का? की भाजपाने त्यांना ड्राफ्ट बनवून दिला की एकनाथ शिंदे यांनी लिहून दिला? कारण ते शब्द त्यांचे नव्हते." असा दावा अंजली दमानियांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधत असताना अंजली दमानियांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. अंजली दमानिया यांनी केलेल्या पोस्टवर युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही जणांनी अंजली दमानिया यांना ट्रोल केले आहे तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळणार की का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.