पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वी म्हणजे देहूच्या पालखीने प्रस्थान ठेवण्यापूर्वी दोन दिवस आधी आणि आषाढी यात्रा संपल्यावर शहराची संपूर्ण स्वच्छता करणार आहे. लोकसहभागातून हे स्वच्छता अभियान करणार आहे. तसेच यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. दरम्यान, आषाढी एकादशी ६ जुलै रोजी आहे.
येथील केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, तहसीलदार सचिन लंगुटे, मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गोरे म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुविधेसह पंढरपूरची आषाढी वारीत स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र कायम स्वच्छ राहील, यासाठी यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत स्वच्छतेसाठी एक महिन्याचे टेंडर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वारीपूर्वी पंढरपूर शहरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
तसेच शहरातील पार्किंगच्या ठिकाणी मुरमीकरण व रोलिंग करावे. पालखी मार्ग तळ तसेच पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधून संयुक्तपणे कार्यवाही करावी. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पालखी मार्ग तसेच शहरातील रस्त्यावर बंद पडलेली वाहने काढण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावी. वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांना राहण्यासाठी व इतर सुविधेचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला. दरम्यान, बैठकीआधी पालकमंत्री यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून शहरातील कामांची पाहणी केली. त्यातील त्रुटी बाबत अधिकाऱ्यांना तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना गोरे यांनी दिल्या. दरम्यान, आषाढी सोहळ्याचा मुख्य दिवस म्हणजे एकादशी ६ जुलै रोजी आहे. त्यामुळे एकीकडे प्रशासनाची कामे पूर्ण करण्याची व भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.