Bhagat Singh Koshyari Controversial Comment on Mumbai in Marathi : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.

 शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींच्या या वक्तव्यावरून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी राज्यपालांचा हा वादग्रस्त व्हिडीओ ट्वीट टीका केली. तर दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी “राज्यपालांनाच नारळ दिला पाहिजे” म्हणत निशाणा साधला आहे.

Live Updates
18:55 (IST) 30 Jul 2022
आनंद दिघेंसोबत ज्या घटना घडल्या त्याचा मी साक्षीदार, योग्य वेळी नक्की बोलेन- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. सध्या मुलाखती दिल्या जात आहेत. पण मी जेव्हा मुलाखत देईन देव्हा राज्यात आणि देशात भूकंप होईल असे शिंदे म्हणाले आहेत. ते मालेगावमध्ये संभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावरही भाष्य केले आहे. दिघेंसोबत काय झाले ते योग्य वेळी नक्की सांगेन, असेही शिंदे म्हणाले. वाचा सविस्तर

18:03 (IST) 30 Jul 2022
कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर

17:26 (IST) 30 Jul 2022
चित्रा वाघ यांच्याकडून राज्यपालांचा बचाव; टीका करणाऱ्यांवरच बरसल्या

मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक जण मुंबईकर असून मुंबईला किंवा महाराष्ट्राला घडविण्यामध्ये सगळ्यांचे योगदान आहे, अशी भूमिका राज्यपालांनी मांडली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्याकडे त्याच दृष्टीने बघितले पाहिजे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यपालांचा बचाव केला.

सविस्तर वाचा

17:22 (IST) 30 Jul 2022
राज्यपालांच्या विधानावर संभाजी छत्रपतींनी नोंदवाला आक्षेप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी तसेच त्यांना पदावरुन दूर करावे, अशी मागणी केली जात आहे. असे असताना संभाजी छत्रपती यांनीदेखील कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे तसेच या पदावर महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर

16:40 (IST) 30 Jul 2022
ठाणे : राज्यपालांनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे – जितेंद्र आव्हाड

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विधान हे केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान करणारे आहे. राज्यपालांना मराठी माणसाची किमंत कळलेली नाही. मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान हा कदापी सहन केला जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

सविस्तर वाचा

15:09 (IST) 30 Jul 2022
राज्यपालांच्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘राज्यपाल हटाओ… महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

राज्यपाल भगतिसंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात असताना. आज (शनिवार) पुण्यातील अलका चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल हाटाओ… महाराष्ट्र बचाओ, असं आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या देखील उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…

14:27 (IST) 30 Jul 2022
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

सविस्तर वाचा –

14:23 (IST) 30 Jul 2022
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा – नाना पटोले

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे, हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तसेच कोश्यारी यांची राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावरून उचलबांगडी करावी.” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. वाचा सविस्तर बातमी…

14:08 (IST) 30 Jul 2022
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मराठी माणसाच्या मेहनतीवरच…”

गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही आणि देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. ते शनिवारी (३० जुलै) नाशिकल जिल्ह्यात मालेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 30 Jul 2022
राज्यपालांना घरी पाठावयाचं की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपाल हटाव अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांना इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाला कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:23 (IST) 30 Jul 2022
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “”भगतसिंह कोश्यारींना कोल्हापुरी जोडे…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला चढवला. ते शनिवारी (३० जुलै) मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 30 Jul 2022
राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपाल हटाव अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांना इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

सविस्तर वाचा

13:00 (IST) 30 Jul 2022
चंद्रपूर : तर शिवरायांचे मावळे राज्यपालांना सळो की पळो करून सोडतील!

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे, मराठी माणसांचे राज्य आहे. ज्या दिवशी शिवाजी महाराजांचे मावळे रस्त्यावर उतरतील त्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सळो की पळो करून सोडतील, असा इशारा काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी दिला.

सविस्तर वाचा

12:25 (IST) 30 Jul 2022
“महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट- सुप्रिया सुळेंची टीका

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सं राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना या पदावरून हटवण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सविस्तर बातमी

12:14 (IST) 30 Jul 2022
“मराठी माणसाला डिवचू नका, आत्ता…” वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. “मराठी माणसाला डिवचू नका” म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांना पत्र लिहलं आहे. ठाकरेंनी हे पत्र ट्वीट करत राज्यपालांना इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा

12:07 (IST) 30 Jul 2022
महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट – सुप्रिया सुळे

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्थरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना या पदावरून हटवण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सविस्तर वाचा

11:20 (IST) 30 Jul 2022
“नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये” मनसेचा राज्यपालांवर निशाणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका भाषणात मुंबई शहराबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यपालांवर टीकेची झोड उठत आहे. “राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये”, असं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

10:56 (IST) 30 Jul 2022
“५० खोकेवाले आता…”, राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींच्या या वक्तव्यावरून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. “५० खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत”, असं म्हणत राऊतांनी हल्ला चढवला. संजय राऊत यांनी राज्यपालांचा हा वादग्रस्त व्हिडीओ ट्वीट करत चार ट्वीट करत टीका केली.

सविस्तर वाचा

10:55 (IST) 30 Jul 2022
VIDEO : गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही – भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

सविस्तर वाचा