राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी बंड झाल्यानंतरची ही सर्वांत मोठी निवडणूक असल्याने दोन्ही पक्षातील दोन्ही गट एकमेकांवर बेछूट आरोप करत आहेत. तसंच, या बंडामुळे महाविकास आघाडी फुटल्याने मविआतील नेतेही फुटीर गटातील नेत्यांवर आरोप करत आहेत. कोकणातील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

भास्कर जाधव सुरुवातीला अमित शाहांची नक्कल करत म्हणाले, “अमित शाह पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारतात की तुम्ही राज्यात काय केलं. पण केंद्रातलं आणि राज्याचं सरकार तुम्ही चालवता आणि प्रश्न येऊन तुम्ही उद्धव आणि शरद पवारांना विचारता?” “अरे जर प्रश्नांची उत्तरे देण्याची योग्यता नसेल तर योग्यता नसलेल्या राज्यकर्त्यांना आज दिल्लीच्या किंवा राज्याच्या तख्तावरू खाली ओढलं पाहिजे की नाही? असा थेट सवालही त्यांनी विचारला.

हेही वाचा >> “शिवसेनेतील बंडाची माहिती अजित पवारांनाही होती, पण…”, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

दादा फक्त नाव उरलंय, हव केव्हाच निघून गेली

पुढे त्यांनी अजित पवारांवरही टीका केली. अजित पवारांवर टीका करत म्हणाले, “अजित पवार पूर्वी फक्त शरद पवारांबरोबर होते तेव्हा दादा कोण म्हणून कोणी विचारला की तेव्हा एका क्षणात अजित पवार असं नाव येत असे. पण आता लोक अजित पवारांना दादा मानायला तयार नाहीत.” पुढे अजित पवारांची नक्कल करत म्हणाले, “काय रे राजेश कुठे आहेस तू. आवाज येतोय की नाही. असं म्हटलं की राजेश भैयाची पॅन्टच हालायची. माझी नाही कधी हलली. तुम्ही सारखे दादा दादा करता. आता मात्र दादा नाव फक्त राहिलंय, दादागिरीतील हवा कधीच निघून गेली आहे”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोकणात अटीतटीची चुरस

कोकणात यंदा अटीतटीची लढत आहे. कारण, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असताना महायुतीने भाजपाला जागा दिली. तर, महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना संधी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत असा सामना यावेळी पाहायला मिळणार आहे. नारायण राणे बऱ्याच वर्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरीही त्यांचा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. तसंच, त्यांच्या प्रचारासाठी खुद्द अमित शाह कोकणात येऊन गेले. त्यामुळे आगामी काळात हा बालेकिल्ला कोणाच्या ताब्यात जातोय, हे पाहावं लागणार आहे.